मुंबई, दि.११ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात रेल्वे संरक्षण दलाला यश आले आहे. त्यामुळे नन्हें फरिश्ते हे रेल्वे स्थानकावर हरविलेल्या बालकांसाठी सुरु करण्यात आलेल्या अभियानाला यश मिळत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
काही भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात. दि. १ एप्रिल ते दि. ३१ ऑक्टोबर २०२४ याकालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने एकूण ८६१ मुलांना त्यांच्या कुटुंबियांसह पुन:र्मिलनास मदत केली असल्याची आकडेवारी मध्य रेल्वेने दिली आहे.
अलीकडेच दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी आरपीएफ कर्मचारी ईश्वर चंद जाट आणि आर के त्रिपाठी हे खंडवा स्थानकावर गस्त घालत असताना, प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ वर एक अल्पवयीन मुलगा शांतपणे बसलेला दिसला. सुमित नावाच्या या मुलाचे समुपदेशन करण्यात आले. त्याच्या उजव्या हातावर मोबाईल क्रमांक टॅटू केलेला आढळून आला. आरपीएफ टीमने त्या नंबरवर कॉल केला आणि त्याच्या भावाशी बोलून या बालकाविषयी माहिती दिली. या मुलाला स्मृतिभ्रंश आहे आणि तो गोष्टी विसरतो. चाईल्ड लाईनचे दीपक लाड आणि मयूर चोरे यांच्या मदतीने मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचा भाऊ त्याला ताब्यात घेण्यासाठी येईपर्यंत नवजीवन बालगृह येथे पाठवण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलांचे तपशील
महिना मुले मुली एकूण
एप्रिल २९ २७ ५६
मे ६१ ३२ ९३
जून ५५ ४० ९५
जुलै १३७ ६५ २०२
ऑगस्ट ९७ ४४ १४१
सप्टेंबर १२५ ३५ १६०
ऑक्टोबर ८५ २९ ११४
एकूण मुले - ५८९
एकूण मुली - २७२
एकूण मुलांची संख्या - ८६१