जागतिक मुस्लीम समुदायाचे हित साधण्याची जबाबदारी एकमेव आपल्याच खांद्यावर असून, ती पूर्ण करणे म्हणजे धर्माचे काम करणे आहे, अशा आविर्भावात कायम वावरणार्या पाकिस्तानचे इस्लामशी असलेले प्रेम किती बेगडी आहे, हे आज पाहूया!
जागतिक मुस्लीम समुदायाचे हित साधण्याची जबाबदारी एकमेव आपल्याच खांद्यावर असून, ती पूर्ण करणे म्हणजे धर्माचे काम करणे आहे, अशा आविर्भावात कायम वावरणार्या पाकिस्तानचे इस्लामशी असलेले प्रेम किती बेगडी आहे, हे आज पाहूया! तर मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा सरकारने, त्यांच्या सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना ‘पश्तुन तेहफुज मुव्हमेंट’ने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘पश्तून कौमी जिरगा’ कार्यक्रमात जाण्यास मज्जाव केला आहे. तर पाकिस्तानच्या सरकारने तर, ‘पश्तुन तेहफुज मुव्हमेंट’वर राष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेला धोका असल्याचे कारण देत, बंदीच घातली आहे. ‘पश्तुन तेहफुज मुव्हमेंट’ हा राजकीय पक्ष धुमसणार्या खैबर पख्तुनवा भागात सक्रिय असून, या पक्षातील लोक सातत्याने पाकिस्तानच्या लष्करावर टीका करत असतात. तसेच, याच संघटनेने पाकिस्तानच्या लष्काराला खुले आव्हानही दिले आहे.
पाकिस्तानमधील पश्तूनांची परिस्थिती हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पश्तून चळवळीचे सर्वोच्च नेते मंजूर पश्तीन हे लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. पश्तुनी जनतेच्या समस्यांवर राज्यघटनेच्या चौकटीतच उपाय शोधायला हवा, असे त्यांचे ठाम मत आहे. मात्र, पाकिस्तानी लष्करावर ते जाहीर टीका करताना दिसतात. आजवर पश्तुन नेत्यांपैकी कोणीही असे केलेले नसल्याने मंजूर यांच्या चळवळीला या टीकेचा फटकादेखील अनेकदा बसतो.
खरं तर पश्तुनी जनतेचा प्रश्न हा पाकिस्तानच्या व्यवस्थेनेच निर्माण केलेला आहे. एक राष्ट्र म्हणून पाकिस्तान तेथील जनतेवर इस्लामी संस्कृती आणि उर्दू भाषा यांची जबरदस्ती करत आला आहे.
पाकिस्तानातील विविध समाजसमूहांची स्वतंत्र वांशिक ओळख, भाषिक संस्कृतीची पाकने कधीही फिकीर केली नाही. मुळातच पाकिस्तानातील पश्तुन नागरिकांना अल्पसंख्याक असल्याने त्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा सामना नेहमीच करावा लागतो. सातत्याने पाकिस्तान सरकारनेही पंजाबी मुस्लिमांच्या लांगूलचालनाला महत्त्व देताना पश्तुनांवर अन्यायच केला आहे. अनेकदा त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव बेघरदेखील करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत अनेक पश्तुनांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मात्र, जगातील सर्व मुस्लीम हे बांधव असल्याचे प्रवचन जगाला देत, नसराल्लाच्या मृत्यूवेळी त्याची बाजू घेणार्या पाकिस्तानला मुस्लीम पश्तुनांसाठी ’उम्मा’ आठवत नाही. त्यांचा छळ मांडण्यातच जागतिक मुस्लीम समुदायाचे अनेक इस्लामी अभ्यासकदेखील मग्न आहेत. झाकीर नाईक यालादेखील जेव्हा पश्तुन मुलीने विचारलेल्या प्रश्नांवर तिलाच झापले. पाकिस्तानच्या मांडलेल्या या अत्याचारी वागणुकीमुळेच केवळ अस्तित्व वाचवण्यासाठी पश्तुन जामातीच्या नेत्यांनी त्यांचा वेगळा देश मागण्याची मोहीम सुरु केली आहे. यासाठीच ‘पश्तुन तेहफुज मुव्हमेंट’सारखे पक्ष काम करत असून पाकिस्तानात स्वतःच्या राजकीय हक्कांसाठी वांशिक ओळख वेगळी ठेवणे हा राष्ट्राची शकले करण्याइतका मोठा गुन्हा मानला जातो. पाकिस्तानच्या मनात ही भीती बांगलादेशाच्या निर्मितीमुळे आली असण्यास वाव आहे. १९४७ साली भारताबरोबर स्वातंत्र्य मिळूनही ‘विविधतेत एकता’ सूत्राची यशस्वी अंमलबजावणी करण्यात पाकिस्तान पुरता अपयशी झाला आहे. सुरुवातीच्या काही काळात स्वातंत्र्यानंतरच्या प्रश्नांमुळे निभावून गेले असले, तरी भविष्यातील धोक्यांकडे नीरक्षीरविवेकाने बघण्याचा मोठेपणा कोणत्याही पाकिस्तानी नेत्याने आजवर दाखवला नाही.
आजही पश्तुनांचे प्रश्न ज्वलंत असताना, त्याच्यावर तोडगा काढायचा सोडून पाकिस्तान त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेवत अन्यायच करत आला आहे. काहीही झाले की भारताकडे बोट दाखवत, त्या समस्येपासून पळ काढण्यातच पाकिस्तानी हुकुमत धन्यता मानत आली आहे. पश्तुन चळवळीबाबतही त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा बाळगणार? आजही पश्तुनांना भारत सहकार्य करत असून, पाकिस्तानचे तुकडे करण्यासाठीच तो फुस लावत असल्याचा आरोप पाकिस्तानने अनेकदा केला आहे.
मुळातच तळागाळातील सर्वांना सत्तेत सामावून घेण्याऐवजी, आजवर पाकिस्तानने एकाच वंशाच्या लोकांकडे सत्ताकेंद्रे कशी राहतील, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळेच विविध वंशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्यातच कुशलतेने घरातील आग विझवण्याइतका विवेकदेखील पाकिस्तानकडे नसल्याचे ‘पश्तुन तेहफुज मुव्हमेंट’वर घातलेल्या बंदीवरून अधोरेखित आहे.
कौस्तुभ वीरकर