"राहुल गांधी पुतळ्याचं अनावरण करता पण, नेहरूंनी जे महाराजांविषयी लिहीलं त्याची माफी कधी मागणार?"
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
05-Oct-2024
Total Views | 110
ठाणे : राहुल गांधी पुतळ्याचं अनावरण करता पण, नेहरूंनी जे महाराजांविषयी लिहीलं त्याची माफी कधी मागणार? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शनिवारी, ठाणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहूल गांधी आज कोल्हापूरला आले होते. त्यांनासुद्धा छत्रपती शिवरायांची आठवण आली. पण छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडीत जवाहरलाल नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिल्याबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा. त्यानंतरच तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे."
"मेट्रो ३ ही कुणाच्यातरी गर्वाचं हरण करणारी आहे. कारण महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या मेट्रो ३ ला स्थगिती देण्यात आली. हजारों कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कुणाचातरी इगो दुखावल्याने स्थगिती दिली. ही पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. पण दुर्दैवाने उद्धवजींचा इगो दुखावल्याने त्यांनी याला स्थगिती दिली. आमचं सरकार आल्यावर आम्ही अत्यंत वेगाने मेट्रोचं काम पूर्ण केलं आणि आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन होत आहे. मुंबईमध्ये रोज १७ लाख प्रवासी प्रवास करतील," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.