लाचखोरीतही नाशिक नंबर १!

    07-Jan-2024
Total Views |
bribe-takers-detained-in-nashik-division

प्रशासनाला लागलेली भ्रष्ट्राचाराची कीड संपायचे नाव घेत नाहीये. लाचखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. २०२३ साली महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ८०३ गुन्हे नोंदवत १ हजार, १७० आरोपींना ताब्यात घेतले आहे. ८०३ गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे एकट्या नाशिक विभागात झाले आहेत.नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या दमदार कामगिरीने नाशिकमध्ये तब्बल १६३ लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर एक ठरला आहे. नाशिक विभागातील महत्त्वाच्या कारवाया अधोरेखित करायचे झाल्यास, भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे व लिपीकावर ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची कारवाई, सिन्नरचे साहाय्यक निबंधक रणजित पाटील व लिपिक विरनारायण यांना २० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जिल्हा निबंधक सतीष खरे यांना ३० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यावरील कारवाई, शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी व प्रशासनधिकारी सुनीता धनगर यांना ५५ हजारांची लाच स्वीकारताना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांचेवर ४० लाखांच्या लाचेच्या मागणी प्रसंगी कारवाई करण्यात आली. नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना घराच्या पार्किंगमध्ये १५ लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ‘सीबीआय’च्या नाशिक विभागीय पथकाने नुकताच सातपूरच्या ‘ईपीएफओ’ कार्यालयात सापळा रचून तिघांना अटक केली. यात विभागीय आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी, ‘ईपीएफओ एजंट’ यांना अटक करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेण्याच्या प्रकरणात तिघांची कसून चौकशी केल्यानंतर, ‘पीएफ’ आयुक्ताने तक्रारदाराला नोटीस बजावल्यानंतर लाच घेतल्याचे समोर आले. ड्रग्ज, एमडीनंतर आता लाचखोरीच्या कारवायांतदेखील राज्यात नाशिक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरते आहे. लाचखोरीच नवं डेस्टिनेशन नाशिक होऊ पाहताय की काय असा प्रश्न आता सामान्य नाशिककरांना पडू लागला आहे.

राजकारण्यांची नाशिकमध्ये मांदियाळी!

भाजप, शिवसेना, उबाठा गट, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वंच राजकीय पक्षांनी सध्या नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. याच जानेवारीत नाशिकमध्ये अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येणार आहे. या महिन्यात अनेक राजकीय नेत्यांच्या जाहीर सभादेखील होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकच्या मैदानातूनचफुंकले जाणार, असे यावरून दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. दि. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार, अशी चिन्हे आहेत. कोणत्या पक्षाला नाशिक पावतेहे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उबाठा गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा नाशिकमध्ये होणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक हे राजकीय घडमोडींचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. यंदा सर्वंच राजकीय पक्षांनी महाराष्ट्र काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दि. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भाजपने नाशिकमध्ये शुक्रवार, दि. १२ जानेवारीलापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनासाठी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. राज्यातील ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतूनच प्रचाराचा नारळ फोडण्याचे भाजपचे नियोजन असून, त्यासाठीच नाशिकची निवड करण्यात आल्याचे समजते. गृहमंत्री अमित शाह सहकार संमेलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज्यभर दौरे करणार आहेत.त्यांची यात्रा जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर सभेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि. २२ जानेवारीला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना नाशिकचा ’काळाराम’ किती पावतो हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

गौरव परदेशी