मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिंदे गट (शिवसेना) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना राज्याच्या राजकारणात उधाण आले आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य करताना म्हटले की, शिंदे गटासोबत युती करायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसे आणि शिंदे गटाच्या विचारसरणीत कोणताही फरक नाही असे सांगत युतीबाबत जणू संकेतच दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या वेळी राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
शिंदे गट (शिवसेना) आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, अशी विनंती केली आहे. या दोघांच्या एकत्र येण्याचा आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असेही शिरसाटांनी म्हटले आहे. एकंदरीत, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते.