मुलांमधील वर्तणुकीच्या विविध समस्या आणि परिणामकारक उपचार पद्धती

    29-Jan-2024
Total Views | 107
fsd
 
आपले मूल सुदृढ असावे, गुटगुटीत व हसरे असावे, तसेच त्याचे सर्वांनी कौतुक करावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, याबाबतीत सर्वच पालक एवढे सुदैवी नसतात. अनेक लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या त्यांच्या पालकांना भेडसावत असतात. या मुलांच्या अशा विचित्र वागणुकीवरून बर्‍याच वेळा पालकांनाही टीका सहन करावी लागते. तेव्हा मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या का निर्माण होतात? यावरील काय उपाय करता येतील? याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
 
वर्तवणूक समस्यांची कारणे
1) घरातील वातावरण : पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. मुलांची देखभाल आजी- आजोबांच्या सान्निध्यात होत होती. एकाच घरात तीन ते चार लहान मुले असल्यामुळे ते एकमेकांच्या सहवासात मोठे होतं. सध्या असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व घरात असणार्‍या एकट्या मुलामुळे त्यास पुरेसा भावनिक आधार मिळत नाही. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मूल पाळणाघरात ठेवले जाते. तेथे असलेली कडक शिस्त, प्रसंगी होणारी मारहाण याने लहान मूल हैराण होऊन जाते. आई-वडिलांमधील भांडणे, घरातील ताणतणाव, शाळेतील करडी शिस्त यानेदेखील लहान मूल बिथरून जाते आणि वर्तणूक समस्येला सुरुवात होते.
 
2) मुलांचे अति लाड किंवा अति दुर्लक्ष : काही कुटुंबामध्ये मुलगा झाल्यास त्याचे अति लाड केले जातात. त्यामुळे मुलाचे व्यक्तिमत्व विकसित होत नाही. त्याला नेहमी संरक्षणाखाली राहण्याची सवय लागते. काही जोडप्यांना मुलगा होण्याची फार इच्छा असते. अशा वेळेस मुलगी पदरात पडल्यास ते तिचा राग राग करू लागतात. तिच्याकडे दुर्लक्ष करतात व यातूनच वर्तणूक समस्या सुरू होतात.
 
3) दोन मुलांमध्ये भेदभाव : प्रत्येक मूल हे वेगळे असते. अशा वेळेस फक्त हुशार मुलांचे कौतुक करणे व दुसर्‍या मुलाकडे दुर्लक्ष करणे, यामुळे दुसर्‍या मुलांमध्ये न्यूनगंड तयार होतो.
 
4) दहशतीखाली मुलांचे संगोपन करणे: काही घरांमध्ये दहशतीचे वातावरण असते. वडिलांचे व्यसन, मुलांना सारखी होणारी मारहाण, आई-वडिलांमधील सततची भांडणे यामुळे मूल आपल्याच घरात स्वतःला सुरक्षित समजत नाही.
वर्तवणूक समस्यांचे प्रकार
 
1) अंगठा चोखणे : एक वर्षांवरील मुलांमध्ये ही सवय प्रकर्षाने आढळते. दिवसातील बहुतांश वेळ मूल अंगठा चोखत राहते. याबद्दल त्याला रागावले किंवा शिक्षा दिल्यास ही सवय आणखीन बळावते. मग ते मूल एकांत गाठून आपली तलब भागवते. काही मुलांची ही सवय अगदी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेपर्यंतही टिकते. अशा मुलांना रागावणे हा त्यावरील उपाय नाही. मुलांच्या घरातील वातावरण, शारीरिक आजार, पातळ दूध दिल्यामुळे भूक न भागणे व कुपोषण यामुळेदेखील ही सवय लागू शकते. पालकांना त्यात धीर धरण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही वैद्यकीय आजार निघाल्यास त्यावर उपचार करावा.
 
2) पायका (माती खाणे) : ‘पायका’ हा नेहमी वापरला जाणारा वैद्यकीय शब्द. ज्या वस्तू खाण्यालायक नाहीत, त्या वस्तू वारंवार खाणे व त्याची सवय लागणे यास ‘पायका’ असे म्हणतात. माती खाणे ही सवय अनेक लहान मुलांमध्ये आढळते. त्यांच्याबरोबर भिंतीचा रंग, चुना, खडू, पेन्सिल, कोळसा, कागद, तांदूळ इत्यादी अनेक वस्तूंची लहान मुलांना तलब लागते. दुर्लक्षित मुले किंवा चाळीत राहणारी मुले यांमध्ये या सवयी जास्त प्रमाणात आढळतात. ही मुले बहुतांशी कुपोषित असतात. ही सवय जास्त प्रमाणात असल्यास डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा. जंताचा प्रादुर्भाव, बाल क्षयरोगाची लागण, रक्तातील लोहाचे कमी प्रमाण, कुपोषण यापैकी काही कारण आढळल्यास त्यावर उपाय करावा. या मुलांच्या पुढील चाचण्या करण्यात येतात - ‘सीबीसी’, लघवीची तपासणी, शौचाची तपासणी, मान्टुज टेस्ट, छातीचा एक्स-रे. यात काही दोष आढळल्यास त्यावरील उपचार करण्यात येतात.
 
उपचार
मुलाला शिक्षा देणे किंवा त्याला ओरडणे हा त्यावरील उपाय नाही. मुलाला समजावून सांगणे, त्याच्याशी भावनिक जवळीक साधणे, त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे. या मुलांना जंतावरील औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते. त्याशिवाय लोह, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्सचे सिरप दिले जाते. पायका आजार बरा करणे, ही एका दृष्टीने पालकांच्या धीराची परीक्षा असते.  
 
3) अंथरुणात लघवी करणे : लहान मूल पाच वर्षांनंतर सहसा अंथरुणात लघवी करत नाही. काही मुले तर त्याही आधी लघवीला नियंत्रित करतात. पाच वर्षांनंतर जर अंथरूण रोज ओले होत असेल, तर ती काळजीची बाब आहे. हा आजारदेखील वर्तणुकीच्या समस्यात मोडणारा आजार आहे.
 
प्रकार
1) प्राथमिक : मूल पाच वर्षांचे होऊन गेले तरी रात्रीचा लघवीवरील कंट्रोल प्रस्थापित होत नाही. मतिमंद मुले, सेरेब्रल पाल्सी या आजारात हे आढळते. वर्तणुकीच्या समस्येबरोबरच त्यांच्या मूळ आजारावर देखील लक्ष केंद्रित करावे. टॉयलेट ट्रेनिंग देऊन हा आजार कमी करण्याचा प्रयत्न करावा.
 
दुय्यम प्रकार : यात पाच वर्षांपर्यंत लघवीचा कंट्रोल प्रस्थापित झालेला असतो. परंतु, काही तणावपूर्ण घटनांमुळे रात्रीची अंथरुणांत लघवी होण्यास सुरुवात होते. परीक्षेचे दडपण, अभ्यासाचा ताण, शारीरिक श्रम यामुळे अंथरूण ओले होणे सुरू होते. सकाळी अंथरूण ओले पाहून अशा मुलांचा घरातील सर्वजण राग राग करतात. या सर्वांचा परिणाम म्हणून पुढील रात्री झोपताना मूल तणावाखाली झोपते. उद्या पुन्हा आपले अंथरूण ओले होईल, या दडपणाखाली तो मुलगा झोपी जातो व त्या रात्री त्याचे अंथरूण हमखास ओले झालेले असते. सुरुवातीला आठवड्यातून एक-दोन वेळा ओले होणारे अंथरूण पुढे रोजच होऊ लागते. यामुळे मूल आणि पालक हैराण होऊन जातात. अशा मुलांमध्ये न्यूनगंड तयार होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यावर काय उपाय करावा, हेच पालकांना कळत नाही. त्यातील काही पालक फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतात, तर काही पालकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यास पालक तयार नसतात. आपला मुलगा काय वेडा आहे का? त्याला असल्या उपायांची गरजच काय? असा विचार काही जण करतात. अंथरूण ओले करण्याच्या समस्येला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आपल्याकडे आपल्या पालकांनी जास्त लक्ष द्यावे, त्यांनी आपल्याशी भावनिक जवळीक साधावी, अशी या मुलांची सुप्त इच्छा असते. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मूल वैद्यकीय प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही.
 
40 वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात, अंथरूण ओले करणार्‍या अनेक रुग्णांवर मी उपाय केले. यामध्ये विविध वयोगटातील व्यक्ती सामील होते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर उपचार करण्याची मला संधी मिळाली. सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये या मुलांना मी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवायचो. परंतु, तेथे जाण्यास बरेचसे पालक नाखूश असायचे. त्यामुळे अशा रुग्णांचे उपचार व समुपदेशन मी आत्मसात केले व पुढे हे सर्व रुग्ण मी माझ्या क्लिनिकमध्ये बघू लागलो. हा आजार बरा करण्यासाठी, या आजाराच्या मूळ कारणापर्यंत पोहोचावे लागते. रुग्णांच्या आरोग्याची, आजारांची व्यवस्थित माहिती जाणून घेणे, त्यांची अभ्यासातील प्रगती, त्याला जाणवणारे दडपण, त्यांच्यामध्ये तयार झालेला न्यूनगंड, घरातील वातावरण, तेथील ताणतणाव, वडिलांचे व्यसन इत्यादी अनेक गोष्टींचा ‘हिस्टरी’मध्ये समावेश करावा लागतो. अशा रुग्णांवर उपचार करताना कुटुंबाचे सहकार्य महत्त्वाचे असते.
 
उपचार
सामान्य सूचना : रात्रीचे जेवण लवकर घ्यावे व त्यानंतर सहसा पाणी पिऊ नये. झोपण्याच्या आधी लघवी करून झोपावे.दोन तासांची झोप झाल्यावर रुग्णांच्या पालकांनी त्याला झोपेतून जागे करून लघवीस पाठविणे. एवढे सगळे करूनदेखील सकाळी अंथरूण ओले असल्यास कुठलीही प्रतिक्रिया देऊ नये. रागावणे हा त्यावरील उपाय नाही. याने मुलांवर आणखी दडपण येते. काही घडले नाही असे समजून मुलाला त्याचे दैनंदिन उपक्रम सुरू करण्यास मदत करावी. दिवसा जास्त पाणी पिऊन लघवी कंट्रोल करण्याचा सराव करावा. या सूचना देण्यास ठीक आहे, परंतु त्या पाळण्यास कठीण आहेत. रुग्णांमध्ये व पालकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आलेली असते ती दूर करणे महत्त्वाची असते.
 
समुपदेशन
उपचाराचा हा महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन त्यातील सुधारणा करता येतील, अशा बाबींवर लक्ष केंद्रित करावे. मुलांमध्ये तयार झालेला न्यूनगंड कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या दिवशी अंथरूण ओले झाले नसेल, तर मुलाचे कौतुक करावे. तो बरा होणार, असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करावा. या सर्वांना औषधाची व योग्य मार्गदर्शनाची जोड लाभल्यास रुग्ण हळूहळू बरा होण्यास सुरुवात होते. मात्र, हे टीम वर्क आहे आणि यात प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. उपचार काही आठवडे ते काही महिने चालणारे असतात. या काळामध्ये उपचार बंद करण्याची घाई करू नये. रुग्ण बरा झाल्यावर देखील औषधोपचार काही दिवस चालू ठेवावे व ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू बंद करावी.
 
गेल्या 40 वर्षांत अशा अनेक रुग्णांवर उपचार करण्याची मला संधी मिळाली. माध्यमिक शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे उपचार करताना विशेष श्रम घ्यावे लागले. यातील बहुतांश रुग्ण बरे झाले व पुढे जाऊन ते यशस्वी व्यावसायिक, उद्योगपती झाले. या सर्वांवर त्यांच्या अडचणीच्या काळात मी उपचार करू शकलो याचे मला समाधान आहे. या आजारावर आयुर्वेदिक गोळ्यादेखील उपलब्ध आहेत. ‘टॅबलेट निओ’ या गोळ्या आजारावर दिल्या जातात. उपचारादरम्यान सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. उपचार बंद करण्याची घाई करू नये.
 
4) श्वास कोंडणे : हीदेखील एक विचित्र अशी वर्तणूक समस्या आहे. याला आम्ही ‘मेडिकल इमर्जन्सी’ म्हणतो. कारण, वेळीच उपाय न केल्यास मुलाला आकडी येऊ शकते. हा आजार सहा महिने ते पाच वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये आढळतो. लहान मुले हट्टी असतात. आपल्या मनाप्रमाणे काही गोष्ट न झाल्यास, आपल्या हातातील वस्तू हिसकावून घेतल्यास, रागावल्यास या आजारास सुरुवात होते. मोठ्याने रडणारे मूल रडायचे बंद होऊन एकदम शांत होऊन जाते. हळूहळू ते निळे पडू लागते, तर काही मुलांना यामध्ये आकडी येते. हा प्रकार बघून पालक घाबरून जातात. आपल्या मुलाला हे काय झाले, हे पाहून आई धाय मोकलून रडू लागते, तर शेजारीपाजारी अशा मुलाला कडेवर घेऊन डॉक्टरकडे पोहोचतात. 
 
मोठ्याने रडताना छातीतील श्वास बाहेर सोडला जातो. स्वरयंत्रातले ‘वोकल कॉर्ड’देखील बंद होतात. त्यामुळे रुग्णाचा श्वास अचानक बंद होतो. सुरुवातीला राग आला म्हणून मोठ्याने रडणारे मूल अचानक रडायचे बंद होते. सुरुवातीला त्याचा या प्रक्रियेवर कंट्रोल असतो, पण एकदा ‘वोकल कॉर्ड’ बंद झाल्यावर मुलाचा आपल्या श्वासनावरील कंट्रोल नाहीसा होतो व ते निळे पडू लागते.
 
उपचार
सुरुवातीचे 20 वर्षं मी औद्योगिक वसाहतीत प्रॅक्टिस केली. तेथे या प्रकारच्या अनेक रुग्णांवर मी उपचारही केले. निळे पडलेले मूल घेऊन शेजार्‍यापाजार्‍यांचा घोळका दवाखान्यात शिरायचा. मुलाची आई धाय मोकलून रडत असायची. माझे उपचार अतिशय साधे असायचे व त्याने मूल काही क्षणातच रडायला लागायचे. अशा मुलांना मी पायाच्या पोटरीवर जोरात चिमटा घ्यायचो व जोपर्यंत मूल रडत नाही, तोपर्यंत हा चिमटा मी सोडत नसे. मूल रडायला लागल्यावर मी चिमटा सैल करत होतो. एवढा सोपा उपाय या आजारावर आहे. चिमटा किती जोरात घ्यावा, असे यासंदर्भात नेहमी विचारले जाते. त्यावर उत्तर म्हणजे, जोपर्यंत मूल रडत नाही, तोपर्यंत जोरात चिमटा घेणे व तो सोडू नये. हे करण्यास दिरंगाई केल्यास मुलाला आकडी येऊ शकते. मूल रडायला लागल्यावर अंगावर आलेले निळेपण हळूहळू कमी होते. मूल पुन्हा खेळायला लागते. मुलाबरोबर आलेला शेजारीपाजार्‍यांचा घोळका डॉक्टरांना त्यांची फी न विचारताच दवाखाना सोडतात. कारण, डॉक्टरांनी फक्त चिमटाच तर काढला होता. काही औषध थोडीच दिले? सगळीकडे आनंदी आनंद पसरतो! असे पुन्हा होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागते. अशा मुलांना सहसा रागावू नये, त्यांच्या मनाविरूद्ध काही करू नये, त्यांच्या हातातील वस्तू हिसकावून घेऊ नये. हळूहळू ही समस्या नाहीशी होते. पाच वर्षांवरील मुलांमध्ये ही समस्या आढळत नाही. मुलांमधील वर्तणुकीच्या समस्यांचा येथे थोडक्यात आढावा घेतला आहे. यातील कुठलीही समस्या आपल्या मुलांमध्ये आढळून नये, ही सदिच्छा!
डॉ. मिलींद शेजवळ 
9892932803
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121