मुंबई : मुंबईतील मीरा रोडवर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मीरा रोडवर करण्यात आलेल्या हिंसाचारातील आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते.
मीरा रोड येथील हिंसाचाराच्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधी दि. २१ जानेवारीच्या रात्री शोभायात्रेत सामील झालेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यासोबत शोभा यात्रेत सहभागी रामभक्तांवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.
मीरा रोड हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे, अवैध धंदे यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.