स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (१३ सप्टेंबर १९३२-१३ जानेवारी २०२४) या भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या कलाकार होत्या. नितांत सुंदर गायनाबरोबरच चिंतनकार, सिद्धहस्त रचनाकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणूनही त्या अतिशय लोकप्रिय होत्या. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच लाभलेल्या गुरू सहवासाबद्दल सांगत आहेत, त्यांचे वरिष्ठ शिष्य आणि ख्यातनाम गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर.
डॉ. प्रभा अत्रे भारतीय संगीतातलं जणू कैलास लेणं. भारतीय रागदारी संगीतातलं सौंदर्य आणि लालित्य जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणार्या सर्वार्थाने श्रेष्ठ कलाकार. त्यांचा नादमय आवाज, सादरीकरणातली अफाट तयारी, नावीन्य, अगदी शेवटपर्यंत कायम राहणारी माधुरी, सहजता, व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता या सगळ्यांनी श्रोता तत्काळ प्रभावित व्हायचा. पण मग चिकित्सेने थोडं निरखून पाहायला लागलं की, या सगळ्या मागची त्यांची साधना, अखंड चिंतन, निर्मिती क्षमता हे सगळं पाहून मन थक्क होतं! कलेचं शिवधनुष्य रसिकांसाठी त्यांनी इंद्रधनुष्य केलंय, याची प्रचिती येते.
शास्त्रोक्त संगीताच्या क्षेत्रात ज्यांना पूर्वपरंपरा लाभली आहे, ज्यांच्या घरातच संगीत होतं आणि ज्या निवडक गंडाबंध शिष्यांना मोठ्या गुरूंची अनेक वर्षांची विशेष तालीम लाभली; अशांचाच पुढे कलाकार म्हणून बोलबाला झाला, असं साधारणपणे घडलेलं दिसतं. पण, प्रभाताईंच्या बाबतीत अगदी आगळं घडलं! त्यांच्या घरात म्हणे त्यांच्या पूर्वी कोणी संगीत ऐकतसुद्धा नव्हतं. खरं तर सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडूनही तशा थोड्याच कालावधीसाठी त्यांना प्रत्यक्ष तालीम लाभली. मग पुढचा सगळा प्रवास त्यांनी एकलव्याप्रमाणे स्वाध्यायाने केला. स्वयं प्रतिभेने संगीताच्या क्षितिजात उंच भरारी घेतली, अढळपद मिळवलं. उस्ताद अमीर खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान हीदेखील त्यांची प्रेरणास्थानं. या दोन्ही उस्तादांना ही प्रभाताईंचं कौतुकच वाटायचं. या दोन्ही खाँसाहेबांनी युवा वयातल्या प्रभाताईंचं मैफलीतलं गाणं ऐकलं होतं आणि त्याला मनमोकळी दाद ही दिली होती. एकदा एका मुलाखतीत अमीर खान यांना विचारलं की, ”तुम्हाला पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं?” तेव्हा त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतल्या उत्तम कलाकार म्हणून प्रभाताईंचं नाव आवर्जून घेतलं होतं. सुरेशबाबू आणि हिराबाईंनाही आपल्या या प्रज्ञावंत शिष्येचा अतिशय अभिमान होता. प्रभाताईंनी किराणा घराण्याचा वारसा नुसता चालवला नाही, तर सर्वार्थाने समृद्ध केला. पुढे नेला.
आडवळणांनी या वळणावर
प्रभाताईंकडे गाणं शिकायला मिळणं, हा माझ्या आयुष्यातला विलक्षण भाग्ययोग. मी मूळचा सोलापूरचा आणि प्रभाताई पुण्या-मुंबईत. पण, त्यांच्या गाण्याची मोहिनीच अशी जबरदस्त होती की, शिकायचं तर यांच्या कडेच, असं मी न कळत्या वयातच ठरवून टाकलं. आधीची कुठलीही ओळख नसताना धाडसाने एकदा मुंबईला गेलो, त्यांची भेट घेतली आणि शिकवण्याची विनंती केली. माझं गाणं ऐकून थोडी पारख करून, प्रभाताईंनी शिष्य म्हणून स्वीकारलं आणि अशाप्रकारे त्यांच्याकडचा माझ्या शिक्षणाचा प्रवास २००३ साली सुरू झाला. त्यांचं गाणं ’प्रेडिक्टेबल’ नाही. त्यात अनेक ‘सरप्रायझेस’ असत आणि म्हणूनच ते शिकणं महाकठीण! त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, मन मानेल तसा वळणारा आवाज आणि विलक्षण कल्पनाशक्ती क्षणोक्षणी थक्क करणारी! प्रभाताई अखंड संगीत चिंतनात असलेल्या मला फार जवळून अनुभवायला मिळालं आणि त्याचा माझ्या मनावर अतिशय खोलवर परिणाम झाला. लहानसहान गोष्टीतही त्यांच्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता हे गुण प्रकर्षाने जाणवायचे. हे सगळे संस्कार नकळतपणे माझ्या अंतर्यामी खोलवर रुजले. गुरूंनी दाखवलेल्या प्रकाशवाटेवरून चालताना, अवघं जीवन उजळलं.
गुरुतत्त्वाचा उत्कट अनुभव
भारतीय संगीताच्या क्षेत्रात स्त्री गुरू अगदी कमी होऊन गेल्या आहेत. एक तर आपल्या समाजात स्त्रियांच्या स्वतंत्र कर्तृत्वाला तशी उशिराच मान्यता मिळाली. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यमच स्थान होतं. एखाद्या स्त्री गुरुने अनेक पुरूष शिष्यांचं गुरू असावं, हे कदाचित म्हणूनच पचनी पडणारं नव्हतं. पण, तरीही भीमसेन जोशींच्या तानेवर म्हणे, केसरबाईंचा प्रभाव पडला होता. कुमार गंधर्व अंजनीबाई मालपेकरांकडे फार भक्तिभावानं शिकले होते, मोगुबाई कुर्डीकरांनी काही पुरुष शिष्यांना तालीम दिली होती, हिराबाईंकडे ही काही पुरूष शिष्य शिकले होते. (सुधीर फडकेंसारखे मोठे गायक हिराबाईंना गुरू मानत), राजाभाऊ कोगजे रसूलनबाईंकडे ठुमरी शिकले होते. अशी मोजकी उदाहरणं सापडतात! या नंतरच्या पिढ्यांमध्ये गंगुबाई हनगल, गिरीजा देवी, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्रबुद्धे, धोंडुताई कुलकर्णी, माणिक भिडे, अश्विनी भिडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायिकांकडे अनेक पुरूष शिष्य मोकळेपणाने शिकू लागले असं आढळतं. यामधले अनेक शिष्य व्यावसायिक कलाकार म्हणूनही यशस्वी ठरलेत. गुरुतत्त्व आणि संगीतासारखी कला हे दोन्ही लिंगभेद, जाती-वर्ण भेद, वयातला फरक या सगळ्याच्या पलीकडचं आहे, हेच यामधून सिद्ध होतं.
पण, अर्थात गुरू तसा अधिकारी आणि विचारवंत हवा. पुरूष गुरूंकडे शिकून त्यांच्या सारखे पुरुषी हातवारे करणार्या, असहज, अतिजोरकसपणे गाणार्या स्त्री गायिकाही आहेतच. स्त्री आणि पुरूष यांच्या आवाजाच्या पट्टीतला फरक, तसेच सादरीकरणाच्या लेहेज्यातला फरक ओळखून, शिकवण्याची क्षमता गुरुकडे असावी लागते. स्त्री आणि पुरूष यांची व्यक्त होण्याची आपापली वृत्ती असते. स्त्रीचे कोमल स्वरलगाव, नाजूक वळणं पुरुषी आवाजात ठोस, जोरकस वाटू शकतात. अगदी स्वरावली तीच असली तरीही. ते एक्सप्रेसशन तसंच फुलू द्यावं. व्यक्त होण्याची अशी सहज सुंदर जाणीव शिष्यामध्ये निर्माण केली जावी. प्रभाताईंना स्वतःला सुरेशबाबूंची तालीम मुख्यत्वे मिळाली. तसेच उ बडे गुलाम अली खान, उ अमीर खान यांसारख्या भरदार मर्दानी आवाजाच्या पुरूष गायकांच्या गाण्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. परंतु, असं असलं तरी त्यांचं स्वतःच गाणं पुरुषी झालं नाही किंवा दुसर्या कुणाची नक्कल ठरलं नाही. या जीवंत उदाहरणातून योग्य तो आदर्श माझ्यासमोर ठेवला गेला. मला शिकवताना प्रभाताईंचं सगळ्या संदर्भात बारीक लक्ष असे. उत्तम पुरूष आवाज बनण्यासाठीची आवश्यक खर्ज साधना, योग्य उच्चारण, मोकळा आवाज, सर्व सप्तकात गुंजणारा आवाज यांसाठी आवश्यक रियाजाची पद्धत त्यांनी मला दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यांनी कधीही त्यांच्या (स्त्रियांच्या) पट्टीत गायला लावलं नाही. कायम माझ्या सफेद दोन या पुरूष सुरात शिकवलं. त्यासाठी त्यांना कष्ट पडले तरीही! माझ्या शिक्षणाच्या काळातच पुरुषांनी पुरूष वाचक अर्थ असलेल्या बंदिशीच गाव्यात, असा विचारही त्यांनी मांडला. भारतीय संगीतात असा विचार कुणीतरी प्रथमच मांडलाय. यामुळे भारतीय शास्त्रोक्त संगीत सादर करण्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. स्वतःच्या योग्य बदल केलेल्या, अशा बंदिशी त्यांनी मला शिकवल्यात, जसं ’जिया मोरा ना लागे बैरी बालमुवा’ असं त्यांच्या स्त्री शिष्या गातात, तर मला त्यांनी ’जिया मोरा ना लागे बैरी सजनिया’ अशा प्रकारचा बदल करायला लावला. असा विचार करायला मुळात तेवढी उच्च प्रतिभा आणि तशा विपुल नवीन संगीत रचना करू शकणारी निर्मिती क्षमता हवी.
सुरुवातीची वर्षं मी प्रभाताईंकडे राहूनच शिकलो. त्यामुळे शिकत असताना त्यांचं इतरांना शिकवणंही मला जवळून पाहता आलं. जास्त शिकता आलं. ताईंनी अनेक शिष्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालून निरपेक्षपणे शिकवलं. एरवी प्रेमळ आणि अत्यंत रुजू व्यक्तित्त्वाच्या प्रभाताई शिकवताना फार काटेकोर आणि कडक असत. एखाद्या स्वराची हालचाल, एखादा कण किंवा खटका जरी वेगळा झाला, तरी त्या अस्वस्थ होत. ‘आपलं ऐकणं एवढं चांगलं हवं की, गाणार्याने केवढा श्वास घेतलाय, ते ही समजलं पाहिजे,’ असं त्या सांगत. बंदिश जशी आहे, तशीच मांडण्याबद्दल त्या आग्रही असत. शिकवतानाही त्यांच्या गाण्यातली सगळी वळणं, हालचाली इतक्या सुबक असत की एखाद्या डौलदार, प्रमाणबद्ध शिल्पकृतीचा त्यात आभास व्हावा. त्यांच्या बंदिशीच्या मुखड्यावर एवढीशी ही सुरकुती कधी पडली नाही, तो कायम टवटवीत आणि तजेलदार राहिला.
प्रभाताईंकडची शिक्षणाची सुरुवातीची वर्षर्ं मला फार अवघड गेली. त्यांच्या समोर गाणं म्हणजे अडखळणं आणि धडपडणं, यांची जणू काही शर्यतच सुरू व्हायची. एकतर माझं सुरुवातीचं संगीत शिक्षण वेगळ्या पद्धतीनं झालं होतं, त्यात मी होतो १६-१७ वर्षांचा सोलापूरहून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रथमच शिकायच्या निमित्ताने आलेला. ताईंचं भारदस्त, एखाद्या देवतेसारखं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आवाजातलं तेज, परिणामकारकता या सगळ्यांचं दडपण येऊन, माझ्या तोंडातून स्वरच फुटायचा नाही. शिकावं तर खूप वाटे, पण अप्रूप, भीती, संकोचलेपण अशा संमिश्र भावना माझ्या मनात दाटून येत. पण, कालांतराने शिकण्याच्या अनावर ओढीने या सगळ्या अडचणींवर मात केली. त्यांचं गाणं हळूहळू उलगडायला लागलं. भीतीची जागा भारावलेपणानी घेतली. झपाटून रियाझ सुरू झाला. स्वरांची वळणं, त्यांना जोडून येणारे गोड स्वरकण, रसिलेपण, भारदस्तपणा, मींडेची इंद्रधनुष्य आणि खटक्यांची अचूक पेरणी! त्यामागचा कार्यकारणभाव, त्यात ओथंबलेली भावना साद घालू लागली. सरगम अन् तानेचे अद्भुत आकृतिबंध सतत मनात फेर धरू लागले. ताईच्या गाण्याचं आणि विचाराचं वेगळेपण जाणण्याची क्षमता निर्माण होऊ लागली आणि संगीताचा एक वेगळा प्रदेश माझ्या समोर उलगडू लागला.
प्रभाताईंनी सुरुवातीला अनेक दिवस यमनच शिकवला. त्यांच्या सुरातून यमनसारखा रागही असा उभा राहत असे की, आपण सुरुवातीला शिकलेला आपल्याला सोपा वाटलेला यमन तोच हा राग आहे का, असा संभ्रम पडायचा! अत्यंत सुरीला गुंजणारा गंधार आणि टोकदार तीव्र मध्यम अशी स्वरांची विशिष्ट स्थानं, कल्पक आणि प्रशांत आलापीतून रागरुपाला घातलेली साद, गंधारावरून रिषभाच्या मींडेने नादब्रह्मात विलीन होणारा षड्ज, विनासायास येणारे पेंचदार आणि दमसासयुक्त तानांचे गतिमान आकृतिबंध, लयीला लपेटून येणारी सरगम सारंच वेगळं! प्रभाताईंसारखे विस्तृत, ठेहराव युक्त आणि सुंदर आलाप फार थोड्या कलाकारांनी केले असतील. त्यांची तानांची रचना अत्यंत सौष्ठवपूर्ण, वक्र, वेगवान आणि चांगलीच गुंतागुंतीची असे. परंतु, तरीही त्यातलं माधुर्य कुठेही कमी होत नसे, हे विशेष! हे असं संतुलन फारच थोड्या कलाकारांना जमलेले आहे. त्यांच्या गाण्यात विविध वळण वाटांनी जे स्वरकण आणि स्वरबंध वापरले जात, त्यांचं नोटेशन करणंही कठीणच! परीक्षा पाहणारं. त्यांची योजना चुकली की सगळंच फिस्कटणारं. त्यामुळे हे गाणं ऐकायला कितीही गोड, सहज सुंदर वाटत असलं तरी ते अनुसरायला अतिशय कठीण! स्पष्ट, नादमय शब्दोचार, तालाच्या मात्रांवर आघात न करता, भरून राहिलेली सूक्ष्म डौलदार लय, रागातल्या वेगळ्या जागा शोधून आकर्षक नवी स्वरवाक्य बनवणं आणि वेधकपणे समेवर येणं, या सर्व गोष्टीचा एखाद्या संमोहन अस्त्रासारखा माझ्यावर प्रभाव पडला. संगीताचं भव्य आणि उत्कट दर्शन होत राहिलं आणि माझी झोळी शिगोशीग भरत राहिली. तालीम झाली की, कित्येकदा त्या रात्री मला झोप यायची नाही. बंदिशी, लयीचे झोक, नवनव्या कल्पक जागांची नक्षी, सगळं एकापाठोपाठ एक डोक्यात फिरत राहायचं. त्या गायकीतल्या तत्त्वांचा तो साक्षात्कारच होता. शिकलेले राग आणि बंदिशी नंतर केव्हा ही गाताना ताई समोर बसून शिकवत आहेत, असा भास व्हायचा आणि एका अनामिक भावनेने अजाणताच कधी डोळे भरून यायचे. मला संगीतात मुंबई विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ मिळाली, तेव्हा त्यांनी आनंदाने पार्टी मागितली होती. माझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला, त्या आवर्जून सोलापूरला आल्या होत्या आणि मला ’कोरोना’ झाला होता, तेव्हा तब्येतीची विचारपूस करायला, त्यांचा रोज हॉस्पिटलमध्ये फोन यायचा. अशा अनेक हृदय आठवणी आहेत. त्यांचं असं प्रेम मिळणं आणि त्या ऋणांत राहणं, हेच शिष्य म्हणून परमभाग्याचं आहे.
अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा
ज्या काळात शास्त्रोक्त संगीतातले दिग्गज आणि श्रोते केवळ परंपरागत संगीत प्रसुतीलाच अस्सल मानत असत, त्या काळात प्रभाताईंनी केवळ स्वरचित बंदिशी गायल्या. वेगळा कलाविचार धुंडाळला. त्यातल्या वेगळेपणामुळे आणि उच्च गुणवत्तेमुळे जाणकारांना त्याला मान्यता द्यावी लागली. रसिकांना तर या नव्या रचनांनी केव्हाच आपलं दिवाणं केलं होतं. त्यांच्या पहिल्या स्वरचित बंदिशी असलेली मारुबिहाग, कलावती रागाची १९७१ सालात आलेली रेकॉर्ड आज ही घराघरात वाजत असते. शास्त्रोक्त संगीताची कदाचित ही सर्वाधिक विक्री झालेली रेकॉर्ड असावी. भारतीय शास्त्रोक्त संगीतात केवळ स्वरचित संगीत गाऊन, असं उच्च स्थान प्राप्त करणं, ही ऐतिहासिक आणि कधीही न घडलेली घटना आहे.
ख्याल, ठुमरी, दादरा, धृपद, धमार, टप्पा, टपख्याल, ठुमख्याल, तराणा, चतुरंग, त्रिवट, गीत, गझल, भक्ती गीत अशा अनेक गान प्रकारातल्या ५०० हून अधिक नव्या बंदिशी त्यांनी रचल्या. त्या पुस्तक रुपात प्रकाशित ही केल्या. जागु मैं सारी रैना-मारुबिहाग, तन मन धन-कलावती, माता भवानी-दुर्गा, नंद नंदन-किरवाणी अशा त्यांच्या अनेक बंदिशी तर सामान्य श्रोत्यांनाही तोंडपाठ असतात.
‘सरगम’ची सम्राज्ञी
प्रभाताईंची ‘सरगम’ हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. आलाप, तान, बोल यांच्यापेक्षा वेगळा सांगीतिक आशय व्यक्त करणारी, त्यांची ‘सरगम’ म्हणजे केवळ कसरत नाही, त्यात लालित्याचा परम सुंदर आविष्कार असे. ‘सरगम’चा शास्त्रीय पक्षही सर्वप्रथम प्रभाताईंनीच संगीत जगता समोर ठेवला. ‘सरगम’ला खर्या अर्थाने त्यांनी संगीत जगतात प्रतिष्ठा मिळवून दिली.
प्रस्तुतीकरणातील विविधता
प्रभाताईंना गाण्याचा कोणताही प्रकार वर्ज्य नव्हता. ललित रचनांमधला त्यांचा मुलायम, तरल आवाज अंतःकरणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणार्याच्या थेट काळजाला भिडावे. प्रभाताईंची ठुमरी म्हणजे नुसतंच लाजणं मुरडणं नसे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण यांमुळे श्रोते कायमच मंत्रमुग्ध झाले. प्रभाताईंनी कोणत्याही नव्या-जुन्या ठुमर्या गाव्यात! ’कौन गली गयो शाम’, ’ बालमा छेडो मत जा ’, ’जा मैं तोसे नाहीं बोलू ’ रतीया किधर गवाई यांसारख्या ठुमर्यांमधल्या खास जागा, गुंफलेल्या अलौकिक स्वरसंगती, पुकार आणि हृदयस्पर्शीपणा आज एवढ्या वर्षांनंतरही रसिकांना विसरता येत नाही. मला आठवतं एकदा प्रभाताईंचा पंढरपूरला कार्यक्रम होता, मला त्यांच्या सोबत जाता आलं. कार्यक्रमानंतर आयोजकांनी ताईंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली. एक पागोटं बांधलेले, वयस्क शेतकरी गृहस्थ दर्शनासाठी तिथे आले होते. त्यांनी प्रभाताईंना अक्षरशः साष्टांग दंडवत घातलं. म्हणाले, “कौन गली गयो श्याम।” मध्ये तुम्ही पांडुरंगाला काय आतून हाक मारली आहे, आज तुम्ही आलेलं त्यालाही आवडलं असणार, त्या सामान्य शेतकर्याचे निरागस आणि मनापासून आलेले ते शब्द ऐकून आम्ही सगळेच क्षणभर स्तिमित झालो. असा जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा त्यांच्या गाण्याचा अमिट प्रभाव होता.
प्रभाताईंनी उपशास्त्रीय संगीतातही सातत्यानं अनेक नव्या रचना केल्या. तसंच अनेक पारंपरिक रचनांना त्यांनी आपला असा खास प्रभारंग दिला. घिर के आई बदरिया, कागा रे जारे जा, रंग डार गयो मोपे अशी अगणित कजरी गीतं, दादरे आणि होरी गीतं त्या ढंगदारपणे गात. कैसा बालमा दगा दे गया (मिश्र कनकांगी) सावरो नंदलाला (मिश्र शिवरंजनी), बसंती चुनरिया (नायकी कानडा) अजहूं न आयो मेरो सावरीया (मांड भैरव) या वैशिष्ट्यपूर्ण ललित रचनाही प्रभाताईंच्याच. जुने रसिक सांगतात, उमेदीच्या काळात जा कुणी शोधूनी आणा, दारी उभी अशी मी, हम जूनु मे जिधर निकलते है, बडी आरजू है, कळीचे फुल होताना अशा गझला गाताना त्या असा माहोल जमवीत की तोबा!
साधनेची तप्तमुद्रा
प्रभाताईंनी काही रागांच्या स्वरुपात बदल केला, काही सांगीतिक घाट वेगळ्या प्रकारे हाताळले. ‘सरगम’सारख्या संगीत सामुग्रीचं वेगळेपण अधोरेखित केलं. राग समय, राग रस याना शास्त्राच्या कसोटीवर तपासून पाहिलं. अनेकदा विद्वानांनाही विचार करायला उद्युक्त केलं. या सगळ्या प्रयोगशीलतेमागे विचारांची बैठक भक्कमपणे उभी असलेली दिसे. दूरदृष्टी ठेवून परंपरेला बदलण्याचं त्याचं धाडस आणि क्षमता दिसते. लोकप्रिय असणार्या एखाद्या आघाडीच्या कलाकाराने संगीतावर लेखन करणं, संशोधन करणं, पुस्तकं प्रकाशित करणं किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणं, हे आपल्या भारतात फार क्वचित घडलेलं आहे. प्रभाताईंनी या सगळ्या क्षेत्रातही मानदंड प्रस्थापित केले.
प्रभाताईंनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने फार मोठ्या जनसमूहास सुमारे १९४०-५०च्या दशकापासून आज २०२३ पर्यंत मागची ७०-७५ वर्षे आनंद दिला. १९५०च्या दशकात जेव्हा क्वचितच कुणी कलाकार परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत सादर करत होता, तेव्हा प्रभाताईंनी सतत परदेश दौरे करून कार्यक्रम, व्याख्यानं, शिक्षण या सर्व मार्गांनी भारतीय कंठय संगीत परदेशातही लोकप्रिय होण्यास हातभार लावला. परदेशात तिकीट विक्री होऊन, सभागृहांमध्ये व्यावसायिक कार्यक्रम केलेल्या प्रभा अत्रे याच पहिल्या भारतीय कंठ संगीताच्या कलाकार होत्या. दिवाळी पहाटचे आज अनेक कार्यक्रम होत असतात; पण असा कार्यक्रम ताईंनीच ७० साली पहिल्यांदा केला होता. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या शीर्षस्थ कलाकार म्हणून प्रभाताईंची कारकिर्द जगभरात अत्यंत यशस्वी ठरली. त्यांचा काळ त्यांनी अक्षरशः गाजवला.
व्रतस्थ स्वरयोगिनी
प्रभाताईंनी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड चढउतार अनुभवले. आघात पचवले. अडचणींना समर्थपणे तोंड दिलं. एकटीने वाटचाल केली. पण, त्या कशाचीही कुठेच वाच्यता केली नाही. सतत असायचा, तो एक विलक्षण प्रसन्नपणा आणि चेहर्यावरचं समाधान. त्यांच्या वडिलांना फसवून, एका भाडेकरूने हडप केलेली पुण्यातली जागा अनेक वर्षांच्या कोर्ट केसनंतर त्यांच्या ताब्यात आली होती. तिथे त्यांनी स्वखर्चाने भव्य स्वरमयी गुरुकुल बांधलं. देश-परदेशातले अनेक विद्यार्थी तिथे राहून शिकले. नव्या जुन्या कलाकारांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जात. आई-वडिलांचं आणि गुरूंचं ऋण त्यांनी खर्या अर्थानं फेडलं. नव्या पिढीतल्या अनेक शिष्यांना सक्षम बनवलं.
अनेक कलाकारांच्या मागे त्यांच्या चाहत्यांचे, आयोजकांचे आणि प्रशंसकांचे कंपू असतात, ज्यामुळे त्या कलाकारांना आणखी मोठेपणा मिळतो. प्रसिद्धी मिळते. प्रभाताई या सगळ्यापासून कायमच दूर राहिल्या. त्यांच्या स्वभावातच एक अलिप्तपणा होता. त्यांनी फक्त निखळ साधना केली, अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे. ’पद्मविभूषण’सह अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार स्वतःहून त्यांच्याकडे आले. पण, त्या नेहमी परिधान करत, तशा शुभ्र वस्त्रासारखं त्यांचं निर्लेप व्यक्तिमत्त्व होतं, त्याला वैराग्याची भगवी किनार होती. ’स्वरयोगिनी’ हे विशेषण त्यांना सर्वार्थाने साजेसं होतं.
प्रभाताईंसारख्या सर्वार्थाने श्रेष्ठ गुरुकडे शिकायला मिळणं, हा माझ्या आयुष्यातला ‘गुरुयोग’ अलौकिकच म्हणायला हवा! त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशेने माझी वाटचाल सतत होत राहिली. प्रत्यक्ष गाण्याबरोबरच त्यांचा संशोधन, चिंतन, योग्य प्रकारे शिकवणं आणि नव्या संगीत रचना करण्याचा गुणही मी घेण्याचा प्रयत्न केला. गायक म्हणून काम करत असतानाच, माझ्यातल्या रचनाशीलतेला आणि लेखन क्षमतेलाही न कळत कोंब फुटले. बघता-बघता अडीचशे तीनशे बंदिशी करून झाल्या, सुगम संगीताच्या क्षेत्रातही अनेक गाणी प्रसिद्ध झाली. काही पुस्तकही प्रकाशित झाली. ‘डॉक्टरेट’ झाली. कधी-कधी मागे वळून पाहताना, माझा मीच विचार करतो की, हे कसं शक्य झालं आपल्याला? तेव्हा तुकाराम महाराजांच्या ओळी सहजच माझ्यासमोर येतात,
आपणा सारीखे करिती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे।
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी॥
- डॉ. अतिंद्र सरवडीकर
९८२३६२६४८०
atindra२०१०@gmail.com
(लेखक सुप्रसिद्ध गायक असून स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य आहेत.)