ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाचा मोठा विजय! 'या' महत्त्वपूर्ण जागेचा ताबा प्रशासनाकडे!
19-Jan-2024
Total Views |
1
लखनौ : वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करताना या परिसरात बांधलेल्या तळघराच्या चाव्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिम पक्षकारांनी तळघराच्या चाव्या देण्यास नकार दिल्या होत्या. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. १८ जानेवारी २०२४ रोजी हा निर्णय दिला.
याचिकाकर्त्यांचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, १९९३ पर्यंत येथे सोमनाथ व्यास नावाचे पुजारी पूजा करत होते. १९९३ मध्ये प्रशासनाने ते बंद करून येथे कुंपण घालण्यात आले. त्यामूळेच हिंदू पक्षाने मुस्लिम पक्ष तळघराच्या जागेत छेडछाड करू शकते, त्यामुळे चाव्या प्रशासनाच्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी केली होती.
न्यायालयाने ज्या तळघराच्या चाव्या प्रशासनाकडे द्यायचा आदेश दिला आहे, ते तळघर ज्ञानवापी रचनेच्या दक्षिण भागात आहे. त्याला ‘व्यासजींचे तळघर’ असे म्हणतात. ऑगस्ट २०२३ मध्ये, जेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी येथे पोहोचले तेव्हा मुस्लिम पक्षाने तळघराच्या चाव्या देण्यास नकार दिला. आज तकच्या वृत्तात म्हटले आहे की, मुस्लिम पक्षाचे वकील ज्ञानवापीतून बाहेर आले आणि त्यांनी मीडियाला सांगितले की, आम्ही तळघराच्या चाव्या कशाला देऊ, ते त्यांना हवे तिथे उघडू शकतात.
या तळघराची योग्य प्रकारे काळजी घेता यावी यासाठी न्यायालयाने आता वाराणसीच्या जिल्हा अधिकाऱ्याला ज्ञानवापी येथे बांधलेल्या तळघराचे रिसीव्हर बनवले आहे. जिल्हा दंडाधिकार्यांनी या स्थितीत कोणताही बदल करू देऊ नये व ते आपल्या ताब्यात ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
१६ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील पाण्याची टाकी साफ करण्यास परवानगी दिली होती, जिथून मे २०२२ मध्ये सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडले होते. येथे दुर्गंधी पसरत असल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. त्यात शिवलिंग सापडले आहे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे त्याची स्वच्छता झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्यांच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश दिले होते.