नवी दिल्ली : "श्रीरामाचे मंदिर हे केवळ आपल्या आराध्य देवतेच्या पूजेचे ठिकाण आहे असे नाही; तर तो भारताची पवित्रता आणि प्रतिष्ठेची स्थापना पक्की होण्याचा प्रसंग आहे. अशा भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सरसंघचालकांना बुधवारी दिल्ली येथे निमंत्रण दिले. त्यावेळी ते बोलत होते.
सरसंघचालक यावेळी म्हणाले, "श्रीरामाला संपूर्ण देशात मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते. आपण 'स्वतंत्र' झालो, यात 'स्व' ही आपली प्रतिष्ठा आहे. त्या 'स्व'मुळेच आपले जीवन पवित्र आहे. त्या 'स्व'मुळेच जगभरात आपली प्रतिष्ठा आहे. याचेच एक प्रकटीकरण म्हणजे संपूर्ण जगाला दिलेली ही घोषणा आहे की भारत आपल्या 'स्व'वर उभा आहे आणि आपल्या प्रतिष्ठित जीवनापासून संपूर्ण जगात समृद्धी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे सरसावतो आहे."
पुढे ते म्हणाले, "प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वांनाच येणे शक्य होणार नाही. ज्यांना निमंत्रण मिळाले आहे ते येतील. परंतु प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात या सोहळ्याचा उत्साह आहे. कारण, पहिली गोष्ट म्हणजे, इतक्या वर्षांनी आपण भारताच्या 'स्व' चे प्रतीक पुन्हा निर्माण केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपली दिशा शोधण्याचा अनेक दशके प्रयत्न करत आहोत, ती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे, संपूर्ण देशातील वातावरण मंगलमय झाले आहे."