काँग्रेसचा अयोध्येवर बहिष्कार आणि व्हॅटिकनला पत्र

    11-Jan-2024   
Total Views |
sonia gandhi vatican
 
सप्टेंबर २०१६ काँग्रेस पक्षाच्या तात्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हॅटीकन सिटी येथे असलेल्या कॅथॉलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप फ्रांसिस यांना एक पत्र लिहील. हे पत्र मदर तेरेसा यांच्या कॅननायझेशन सेरेमनीला उपस्थित राहण्यासंदर्भात होतं. कॅननायझेशन सेरेमनी म्हणजे ख्रिश्चनांची एखाद्या मृत व्यक्तीला अधीकृतपणे संत घोषित करण्यासाठीचा धार्मिक सोहळा असतो.
 
मदर तेरेसा यांच्या अशाच प्रकारच्या सोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण आले होते. त्यावेळी सोनिया गांधीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी हे पत्र लिहीले. त्यात म्हटले होते की मदर तेरेसा यांना मिळत असलेला  सन्मान ही भारतातील २ कोटी कॅथॉलिक जनतेसाठी गर्वाची बाब आहे. यालाच जोडलेल्या दुसऱ्या पत्रात त्यांनी माझी तब्येत बरी असती तर स्वतः या सोहळ्याला उपस्थीत राहिले असते परंतु मार्गेट अल्वा आणि लूइजिनो फलेरीओ यांना मी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणुन पाठवत आहे असे म्हणत त्या व्हॅटीकनच्या निमंत्रणाचा आदरपुर्वक स्वीकार केला होता.
 
ही घटना सांगण्यास कारण म्हणजे. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे भूमिका घेत २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीराम जेव्हा वनवासातून परतले होते तेव्हाही हिंदुनी अयोध्येत दिवाळी साजरी केली होती. आज त्याचप्रकारे ५०० वर्षांच्या संघर्षानंतर रामलला आपल्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहेत. आणि भारतभर त्यादिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. संपूर्ण हिंदु समाजासाठी हा सोन्याचा क्षण आहे त्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. जगभरातील अनेक मान्यवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं जात आहे. सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना काँग्रेस पक्ष मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकून हिदुंच्या आनंदात मिठाचा खडा टाकू पहात आहे.
 
१० जानेवारी ला काँग्रेस पक्षाचे सचिव जयराम रमेश यांनी पक्षाच अधिकृत स्टेटमेंट जारी करत काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि संसदेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या संसदेत मंदिर वही बनाएंगे पर तारीख नही बताएंगे अस म्हणत टिका केली होती. पण आता जेव्हा तारीख निश्चीत झाली आहे. तेव्हा मात्र सन्मानाने देण्यात आलेले निमंत्रण नामंजूर केले.
 
निमंत्रण नामंजूर करताना त्यांनी भाजप यात राजकारण करत आहे म्हणून सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं कारण दिल आहे. त्यामुळे सोनिया गांधींना आणि त्यांच्या पक्षाला हिंदूंशी वावडे आहे का असा प्रश्न निर्माण होतो. देशातील कोट्यावधी हिंदुंच्या आस्थेचा विषयात राजकारण आणुन काँग्रेस पक्ष उलट भाजपवरच राजकारण करत असल्याचा आरोप का करत आहे असही बोलल जात आहे. काँग्रेसचेच नेते असलेले आचार्य प्रमोद यांनीही श्री राम मंदिराचे "निमंत्रण" नाकारणे हा अत्यंत दुर्दैवी आणि आत्मघातकी निर्णय आहे, आज माझे मन दुखले आहे अस मत व्यक्त केले. गेली ५०० वर्षे हिंदुनी ज्यासाठी संघर्ष केला, भाजप पक्षाच्या निर्मितीपासुन ज्या मुद्यांसाठी संघर्ष करत आला आहे आणि ज्यासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले त्या राम जन्मभूमीवरील मंदिराचे स्वप्न आज पुर्ण होत आहे.
 
पण काँग्रेस पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांनी मात्र सतत राममंदिर विरोधी भुमिका घेतल्या आहेत. कांग्रेसच्या मुख्य नेत्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा बहिष्कार केला, त्यांच्याच मित्रपक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी राममंदिराच्या जागी हॉस्पीटल बांधायला हवे होते असे म्हटले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे तर इंडी आघाडीतले नेते आपल्या हिंदुविरोधी वक्तव्यांसाठी विशेष प्रसिद्भ आहेत. पण तरीसुद्भा देशातील बहूसंख्य जनतेसाठी आस्थेचा आणि अभिमानाचा असलेल्या क्षणी सर्वांचा सहभाग असावा या हेतुने सर्व राजकीय मतभेद बाजुला ठेऊन सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले. पण तरीही ते कांग्रेस आणि मित्रपक्षांना मान्य नाही.
 
ज्यावेळी भारतापासून ६५०० कीमी दुर व्हॅटीकन सीटीतून निमंत्रण मिळालं तेव्हा सोनिया गांधींनी ते स्वीकारल, दोन प्रतिनिधी पाठवले. मग आत्ताच जेव्हा ज्या देशाची सत्ता मिळवण्यासाठी सोनियाजी संघर्ष करत आहेत त्या भारतात समस्त हिंदू समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिरासाठी भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र, काँग्रेसने असा स्टॅंड का घेतला. काँग्रेसला मतदान करणारे रामभक्त नाहीत का? कि विशिष्ट प्रकारची मतं दुखावली जातील म्हणून काँग्रेसला ही भीती आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.
 
इतकेच नव्हे तर राम मंदिराच्या सोहळ्यासाठी ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण आलं आहे त्यांनीही अशीच भूमिका घेतली. जे विरोधक इंडिया या शब्दाखाली स्वतःला एकत्र येण्याची भाषा करतात त्यांना संपूर्ण भारतीयांच्या भावनांची जाणीव नाही का, असाही प्रश्न पडतो. आता व्हॅटिकन सिटीला सोनियांचे प्रतिनिधी गेले तेव्हा. ते काँग्रेस पक्ष म्हणूनच गेले होते का? मग आत्ता काँग्रेसच्या प्रतिनिधींना पाठविण्यासाठी कुणाची अडचण येत आहे. आणि बरं जर भाजप राजकारण करतयं तर मग काँग्रेसच्या मंडळींनी आपल्याला निमंत्रण दिल्यावर जे केल त्याला काय म्हणतात याचंही उत्तर काँग्रेस पक्षाने द्यायल हवं.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ऋतुवल नवले

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातुन पदवी आणि डी. बी. एस. डेहराडूनहून एम. ए. (जर्नालिजम आणि मास कम्युनिकेशन ) पर्यंत शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणुन कार्यरत. राजकारण, इतिहास, खेळ, या विषयांत रस. दुर्ग भ्रमंती, पर्यटन आणि चित्रपटांची आवड.