भारत महोत्सव : अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत 'चांद्रयान-३'च्या यशस्वी मोहिमेचा न्युयॉर्कमध्ये गौरव!
08-Sep-2023
Total Views | 40
नवी दिल्ली : ‘भारत महोत्सव’, ‘आझादी का अमृत महोत्सव’ ते ‘अमृत काल’ घोषणेपर्यंतचा भारताच्या प्रवासाचा भव्य सोहळा २६ ऑगस्ट २०२३ रोजी, न्युयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर प्लाझा येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. एक भारत' च्या एकात्म भावनेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने नवीन उंची गाठली. न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सिल जनरल रणधीर जैसवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अमृता फडणवीस, डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान हे विशेष अतिथी म्हणून सन्मानित होते. कौन्सिल जनरल यांच्या कार्यालयात झालेल्या सहयोगी बैठकीने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
प्रसिध्द अशा टाईम्स स्क्वेअर येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या भव्य उद्घघटना दरम्यान, बँकर, गायिका, समाजसेविका आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून मानाने ओळखल्या जाणा-या अमृता फडणवीस यांनी आपल्या भारतावर आधारित देशभक्तीपर गाणी सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित प्रेक्षकांनी, मान्यवरांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे भरभरुन कौतुक देखील केले. फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सादर केलेल्या संगीतमय सादरीकरणाने ५०,००० प्रेक्षक टाईम्स स्क्वेअरकडे आकर्षित झाले.
अमृता फडणवीस यांना न्यूयॉर्कचे महापौर यांच्यातर्फे त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी जे अतुलनीय योगदान दिले त्यासाठी त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परराष्ट्र विभागाचे डेप्युटी कमिशनर देव चौहान यांनी एका प्रतिष्ठित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान केला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या ‘चांद्रयान ३’ चे यशस्वी लँडिंगचे यश साजरे करण्यासाठी २७ आणि २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन भव्य कार्यक्रमांमध्ये अमृता फडणवीस या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ‘नाविका कॅपिटल’चे नवीन शाह आणि ‘रॉयल अल्बर्ट पॅलेस’चे अल्बर्ट जसानी हे या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे होस्ट होते. या कार्यक्रमांदरम्यान, अमृता फडणवीस यांना न्युयॉर्क मधील ७०० ते १००० भारतीय नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी उत्कटतेने देशभक्ती आणि भारतावरील प्रेमाचा संदेश दिला.
‘भारत महोत्सव’ने भारताच्या समृद्ध वारशाचा आणि नवीन भारतामध्ये त्याचे रूपांतर दर्शविण्यात आले, म्हणजेच ‘भारताचे परिवर्तन’ हा मुद्दा या महोत्सवाने अधोरेखित केला. या निमित्ताने न्यूयॉर्क शहरातील भारतीय समुदायामध्ये एकता वाढली आणि जागतिक स्तरावर भारताच्या कामगिरीचे सादरकीकरण करण्यात आले.