राज्यघटनेतील भारत

    05-Sep-2023
Total Views |
The term President of Bharat has been used for the first time

९ आणि १० सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत होणार्‍या ‘जी २०’ देशांच्या परिषदेत सहभागी होणार्‍या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहभोजनाचे निमंत्रण पाठविले आहे. त्या निमंत्रणात त्यांनी स्वत:चा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला आहे. मीडिया आणि राजकारण जगतात जसा ‘भारत’ नावाचा उल्लेख झाला तशी चर्चा सुरू झाली की मोदी सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात देशाचे नाव बदलण्यात येणार आणि त्यावर विभिन्न प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. त्याअनुषंगाने भारतीय राज्यघटनेत देशाचे नाव ‘भारत’ आहे का आणि ते तसे ठेवताना घटनासभेत काय काय चर्चा झाली, याचा मागोवा घेणारा हा लेख...

भारताची घटना तयार करताना आपल्या संस्कृतीची, परंपरेची, ऐतिहासिक वारशाची आणि सभ्यतेची ओळख प्रतिबिंबित व्हावी, ही धारणा प्रबळ होती. भारतीय संस्कृतीची ओळखपटवणारी अशी अनेक उदाहरणे संपूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये जागोजागी दिसतात. यातच, रामायण, महाभारतातील, तसेच गौतम बुद्ध यांच्या चित्रांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे ऐतिहासिक नाव पुनःस्थापित व्हावे, याचादेखील प्रत्यय घटना सभेतील चर्चेवरून दिसून येतो. आपल्या देशाचे नाव ’India i.e., Bharat’ असे ठेवण्यामागे संविधान सभेतदेखील सविस्तर चर्चा झाल्याची आपणास पाहावयास मिळते. संविधान सभेतील चर्चेदरम्यान एम. ए. अयंगार यांनी आपल्या देशाचे नाव ‘भारतवर्ष’, ‘भारत’, ‘हिंदुस्थान’ असावे, असे मत मांडले. शिब्बनलाल सक्सेना यांनी आपल्या देशाचे नाव ‘भारत’ असावे, असे आग्रही मत मांडले. कमलापती त्रिपाठी यांनी विभिन्न ऐतिहासिक दाखले देऊन देशाचे ‘भारत’ हे नाव ठेवावे असे प्रतिपादिले.

सेठ गोविंद दास यांनी देशाचे नाव ‘भारत’ असेच असावे आणि त्यासाठी सभागृहाचे एकमत व्हावे, असे मत प्रदर्शित केले. त्यांनी बारशाच्या विधीसाठी मुहूर्त पाहून अतिशय सुंदर नाव ठेवले जाते, असे प्रतिपादन करून आनंद व्यक्त केला की, देशाचे नाव ‘भारत’ असे ठेवले जाते आहे. परंतु, त्यांनी सूचना केली की, ‘इंडिया दॅट इज भारत’च्याऐवजी ‘भारत जो परदेशात ‘इंडिया’ म्हणूनदेखील ओळखला जाता,’ असा बदल करावा. पुरातन असे नाव देत असताना आपण देशाला मागे घेऊन जात नाही आहोत, असेदेखील ठामपणे मत त्यांनी मांडले. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचे उदाहरण देऊन, ‘भारतमाता की जय’ या घोषणेच्या आधारे स्वातंत्र्याचा लढा लढला गेला, याचीदेखील आठवण सभागृहास करून दिली. कला वेंकट राव यांनी ‘भारत’ या नावाचे स्वागत करीत, ‘भारत’ या नावाचे ऋग्वेदातील, तसेच वायू पुराणातील संदर्भ दिले.

कमलापती त्रिपाठी यांनी पुनः भाषण करताना अत्यंत धडाकेबाज मांडणी केल्याचे दिसून येते. ते म्हणतात की, “पारतंत्र्याच्या बेड्यांनी जेव्हा देश जखडला जातो, तेव्हा त्याचे स्वत्व तो विसरतो. आपल्या देशानेही हजारवर्षांच्या गुलामगिरीतून आपले सर्वस्व, संस्कृती, स्वाभिमान, इतिहास सगळे गमवले आहे. आज पुन्हा एकदा आपला देश नव्याने उभारी घेत आहे, त्याच्या पुरातन नावासह.आपल्या देशाची या पारतंत्र्यातून मुक्तता होऊन त्याच्या मूळच्या आत्मप्रकाशाने हा देश मोठी भरारी मारेल, यात कोणतीच शंका नाही.

केवळ ‘भारत’ या नामोच्चाराने शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासाचे, संस्कृतीचे, इथल्या ऋषी आणि ज्ञान परंपरेचे स्मरण होते, या नावासोबतच स्मरण होते शंकराचार्यांचे, प्रभू श्रीरामाच्या धनुष्याचे आणि कृष्णाच्या सुदर्शन चक्राचे, ऋग्वेदातील ऋचांचे, देशाच्या सीमांचे, हिमालयाचे आणि त्रि-सागरांचे. कमलापतींना महात्मा गांधींवर श्रद्धा असल्याने बापूंचे आणि स्वातंत्र्य संग्रामाचेदेखील स्मरण होते. वेद आणि पुराण काळाचे दाखले देत, देवांनादेखील या भूमीवर वारंवार जन्म घेण्याची इच्छा होते,” असे कमलापती म्हणले होते. जगात कदाचितच एखादा असा देश असेल, ज्यास आपल्यासारखा ऐतिहासिक वारसा लाभला असेल. ते पुढे म्हणतात की, “सनातन संस्कृतीचा प्रभाव हा या राष्ट्रात जन्म घेऊन जगभर पसरला. आमची सर्वांना विनंती आहे की, कमलापती यांचे भाषण सर्वांनी मूळ प्रतीत वाचावे.”

हर गोविंद पंत यांनी भारताच्या पुरातन, इतिहासाचे वर्णन करीत असताना सांगितले की, “जंबू द्वीपे, भारत वर्षे, भारत खंडे, आर्यावर्ते...असे आपल्या स्थानाचा उल्लेख प्रत्येक भारतीय नैमित्तिक कर्मे करताना करतो.” याचाच अर्थ की, ‘भारत’ या नावाचा उल्लेख पुरातन काळापासून या भूमीवर होतो आणि तो लोकमान्य आहे. पुढे ते संस्कृत कवी कुलगुरू कालिदासाने शाकुंतलमध्ये दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र-भरताच्या शौर्याचे वर्णन केलेले आढळते, असे म्हणाले आणि याच भरताच्या पराक्रमाने पुढे आपल्या देशाचे नाव ‘भारत’ झाले. तसेच, ते पुढे म्हणतातकी, “मी उत्तर भारतातील लोकांचे या सभागृहात प्रतिनिधित्व करतो, त्या सर्वांची इच्छा आपल्या देशाचे नाव ‘भारतवर्ष’ असावे अशीच आहे.”

भारताच्या जाज्वल्य इतिहासाची, संस्कृतीची आणि मापदंडांची चर्चा होऊन ‘इंडिया, दॅट इज भारत’ म्हणजेच ‘भारत’ या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आणि अशा या पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारताच्या लोकांनी राज्यघटना लिहिली, जिचा आपण सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वसामान्य समज असा की, संविधान हे केवळ आपल्या नागरी विधानाचे सर्वोच्च घोषणापत्र असते. परंतु, हा केवळ इतकाच मर्यादित विषय नाही, तर आपले संविधान ही आपली ओळख असते आणि ती तशी असायलाच हवी. म्हणूनच घटना लिहिताना आपल्या संविधानाची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ अशी होते. आपल्या घटनेच्या उद्देशिकेमध्ये पुढे आपण भारताला सार्वभौम, लोकशाही गणराज्य बनवण्याचा संकल्प केला. उपरोक्त नमूद सर्वोच्च जीवनमूल्यांचा कालसापेक्ष बदल करून आपल्या नागरिकांना सर्वांगीण न्याय, स्वातंत्र्य आणि समानता प्राप्त करून देण्याचा निर्धार राज्यघटनेत केला गेला आणि या सर्वांमध्ये आपण व्यक्तीची प्रतिष्ठा आणि आपल्या राष्ट्राची एकता प्रवर्धित करण्याचा संकल्पदेखील केला. ही वचनबद्धता घेऊन आपला देश पुढे नेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मग ही सगळी जबाबदारी कोणी घेतली, तर ती ’आम्ही भारताच्या लोकांनी.’

मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणजे कोण? आपली ओळख काय? निश्चितच हे शोधण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल, निदान आपण जेव्हा पारतंत्र्यात गेलो त्यापूर्वी जेव्हा आपण सर्वार्थाने स्वतंत्र होतो तिथपर्यंत. म्हणजेच सर्वसाधारपणे एक ते दीड हजार वर्षांपूर्वीचे आपण. त्यावेळची आपली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख काय होती? आपली सार्वत्रिक अभिव्यक्ती काय होती? आपल्या सामूहिक प्रेरणा काय होत्या? हे आपण शोधून पाहावे असे आपल्या घटनाकारांना, ’आम्ही भारताचे लोक’ या तीन शब्दांतून सूचित करायचे असावे. आपले संविधान तयार करतानादेखील ही बाब प्रकर्षाने लक्षात घेतली गेली, हे उपरोक्त मांडणीतून स्पष्ट होते.

यामधून ‘भारतीय’ ही आपली प्रधान ओळख असली पाहिजे, असे घटनाकारांना वाटत होते हे लक्षात घेतले पाहिजे. आजही ही भारतीयत्वाची भावना आपल्यामध्ये खोलवर रुजलेली दिसते. आपणही एखाद्या समूहाला संबोधून झाल्यावर ‘भारतमाता की जय’ असे म्हणतो. यावरूनदेखील आपल्यासाठी आपली ‘भारतीय’ ही ओळख ’प्रथम ओळख’ असल्याचे आपण अनुभवतो. या अनुषंगाने आज राष्ट्रपतींनी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा नामोल्लेख केल्याने कुणाही नागरिकास दुःख होण्याचे कोणतेच कारण नाही. ‘भारत’नाव वापरून त्यांनी काहीच चुकीचे केले नाही. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ही दोन्ही नावे आपल्या देशाची नावे म्हणून भारतीय राज्यघटना मान्य आहेत आणि यापैकी कोणतेही नाव जर राष्ट्रपती वापरत असतील, तर त्यात वावगे ते काय? खरे तर, जर देशातील शासन ‘इंडिया’ या नावाएवेजी ‘भारत’असा नामोल्लेख करीत असेल, तर खर्‍या अर्थाने आम्ही परकीय चक्रातून बाहेर पडून, घटनाकारांनी प्रतिपादित केलेल्या मूल्यांचेच संवर्धन करीत आहोत!

अधिवक्ता आशिष सोनवणे 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121