नकारात्मक विचार सामाजिक चिंता, नैराश्य, तणाव आणि आत्मसन्मान कमी होणे यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. आपण नकारात्मक विचार बदलायचे म्हटले म्हणजे, आपण आता कसे विचार करता आणि परिणामी समस्या समजून घेणे आवश्यक आहे. नंतर हे विचार बदलण्यासाठी किंवा त्यांचा आपल्या मनावर आणि जीवनावर कमी प्रभाव पाडण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आणि धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
आपले विचार, भावना आणि वर्तन हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे, म्हणून आपले विचार आपण कसे वागतो, यावर परिणाम करतात. त्यामुळे जरी आपल्या सर्वांना वेळोवेळी असाहाय्यतेचे विचार येत असले तरी ते जाणवल्यावर आपण काय करावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण भविष्यात ते पुन्हा करू नये. एखादी गंभीर घटना, एखादी टिप्पणी किंवा कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय तुमच्या मनात जन्मलेली एखादी अनामिक भीती असू शकते.
नकारात्मक विचारांच्या स्रोताचा संदर्भ आणि सुरुवात कधी कधी, एखाद्या चांगल्या आणि वाईट घटनेने किंवा टिप्पणीने होऊ शकते. कसे? तुम्ही एखादी कलाकृती बनविली आणि तुमच्या पाचपैकी चार मित्रांनी तुमची मनापासून प्रशंसा केली. पण, त्या एका मित्राने तुमच्याबद्दल काही सकारात्मक बोलणे का टाळले किंवा दुर्लक्ष केले, हे शोधून काढण्याकडे तुमच्या मनाची प्रवृत्ती असेल. इतर चौघांच्या सकारात्मक प्रशंसेचा वा विधानांचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. याचे कारण काय असू शकते? याचे कारण म्हणजे, माणसाला जात्याच असलेली नकारात्मक विचारांची ओढ आणि ताकद. म्हणून नकारात्मक विचारांपासून मुक्त कसे व्हावे, हे शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते तुमच्या नकळत अनावश्यकपणे तुम्हाला खाली खेचणार नाहीत.
नकारात्मक पूर्वग्रह काय आहे?
जेव्हा आपण सकारात्मक विचारांऐवजी आपल्या नकारात्मक विचारांना धरून राहतो, तेव्हा नकारात्मकता पूर्वाग्रह आहे, असे म्हणता येईल. हा पूर्वग्रह आपल्या मेंदूत नकारात्मक उत्तेजनांची नोंदणी त्वरित आणि अधिक सहजपणे करतो आणि आपल्याला या नकारात्मक घटनांमध्ये गुंतवून ठेवतो. होय, आपले नकारात्मक विचार सकारात्मक विचारांपेक्षा दीर्घकाळ आपल्यासोबत टिकून राहतात; आपला मेंदू त्यात अधिकाधिक गुंतत राहतो. टीव्हीवर बातम्या पाहताना तुम्ही नकारात्मक बातम्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता. नकारात्मक बातम्यांचे कव्हरेज दर्शक आणि वाचकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे चॅनेल्ससुद्धा सतत या आत्महत्या, खून-मारामार्या, अपघात अशा नकारात्मक बातम्या चालवतात. तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय होतो. दिवसभर आपण तेच पाहत बसतो.
टीकेतून नकारात्मक भावना अनुभवणे आणि त्यात खोलवर गुंतणे हे अनेकांसाठी कौतुकाच्या आनंदी भावनांपेक्षा अधिक मजबूत अनुभव असतो. तुम्ही मित्रांसोबत खाल्लेल्या जेवणातील एक वाईट डिश तुम्हालासतत आठवते. जेव्हा खरेतर संपूर्ण पाककृती छान चविष्ट होती. एखादा पदार्थ खाऊन तुम्ही एकदाच आजारी पडलात, म्हणून पुन्हा तो पदार्थ तुम्ही कधी खाऊ पाहात नाही. पण, खाऊन केवळ एकदाही आजारी पडला नाही, म्हणून तेच तेच जेवण मात्र तुम्ही सतत वर्षानुवर्षे खात राहता. एखाद्याच्या चांगल्या गुणांचे स्मरण आणि कौतुक करण्याऐवजी केवळ एका वाईट गुणासाठी एखाद्या व्यक्तीकडे पाहता आणि त्याचा धिक्कार करता.
जेव्हा तुम्ही खूप उदास मनःस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला जाणवणार्या नकारात्मक भावनांची पुष्टी करण्यासाठी तुम्ही नकारात्मक गोष्टी करता. जर एखाद्याला नकारात्मक गोष्टींबद्दल विचारात अडकल्यासारखे वाटत असेल, तर ते सर्वसामान्य आहे, हे जाणून घ्या. प्रत्येकजण कधी ना कधी नकारात्मक विचार अनुभवतो आणि कधी कधी आपल्याला वाटते, त्यापेक्षा आपल्या आयुष्यात तो ठाण मांडून राहतो. क्षुल्लक क्षणांची अनेकदा आपल्या मनात पुनरावृत्ती होऊ शकते. जरी हा क्षण काही वर्षांपूर्वी घडला असला तरीही, आपल्या मेंदूला तो क्षण पुन्हा ज्वलंतपणे जगण्याचा मार्ग सापडतो. इतरांना या घटनेची कोणतीही आठवण नसली, तरीही आपण मात्र रडणारे आणि लाजिरवाणे असे काही क्षण लक्षात ठेवतो आणि पुन्हा पुन्हा ‘प्ले’ करतो. तथापि, नकारात्मकता कशी दूर करावी हे जाणून घेण्यापूर्वी प्रथम नक्की कोणते विचार नकारात्मक मानले जातात, हे समजून घेणे आवश्यक आहे. मत्सर, दुर्भावना, भीती, राग, द्वेष, कटुता आणि शंका हे विचार नकारात्मक विचारांशी जोडलेले आहेत? मुळात, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आतूनवाईट आणि कमीपणाची वाटते, आंतरिक दुःख आणि असाहाय्यता देते, ती नकारात्मकता दर्शविते.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी एक छान विचार मांडला आहे, जर तुम्ही नकारात्मक विचारांचा प्रतिकार करत राहिलात आणि त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न केलात, तर ते भूताप्रमाणे तुमच्या मागे लागतील. तुमच्या नकारात्मक विचारांशी हस्तांदोलन करा. त्यांना सांगा, ’इकडे या आणि माझ्यासोबत बसा. मी तुम्हाला काही सोडणार नाही’ आणि ते त्वरित कसे अदृश्य होतात, ते तुम्हाला कळेल.
नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी कोणती रणनीती वापरावयास हवी, हे आपण पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
डॉ. शुभांगी पारकर