नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे उद्घाटन झाले. यावेळी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर उपस्थित होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ओम नमः पार्वती पतये’ आणि ‘हर-हर महादेव!’ ने केली. भारतातील शिवशक्ती बिंदूवर चंद्राच्या आगमनाला एक महिना पूर्ण होत असताना आपण अशा दिवशी काशीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर तर दुसरे शिवशक्तीचे स्थान काशी येथे असल्याचे त्यांनी सांगितले.
काशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केवळ वाराणसीच्या तरुणांसाठीच नाही तर पूर्वांचलच्या तरुणांसाठीही वरदान ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर ३० हजारांहून अधिक लोकांना येथे बसून सामने पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हापासून या स्टेडियमची छायाचित्रे समोर आली आहेत, तेव्हापासून काशीमधील प्रत्येक रहिवाश्यांला आनंद झाला आहे. ते म्हणाले की, आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात असून क्रिकेट खेळण्यासाठी नवनवीन देश पुढे येत आहेत.
पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे जेव्हा सामन्यांची संख्या वाढेल तेव्हा नवीन स्टेडियमची गरज भासेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार वाराणसीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही मागणी पूर्ण करेल. हे स्टेडियम संपूर्ण पूर्वांचलचा चमकता तारा बनणार आहे. नुकतेच ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये भारताने कसा इतिहास रचला हे त्यांनी नमूद केले. या खेळांच्या इतिहासात, भारताने गेल्या अनेक दशकांत जिंकलेल्या एकूण पदकांपेक्षा या वर्षी अधिक पदके जिंकली आहेत, ह्यांची ही आठवण मोदींनी करून दिली.
आज भारताला क्रीडा क्षेत्रात जे यश मिळत आहे ते देशाच्या विचारसरणीतील बदलाचे परिणाम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘जो खेलेगा, वही खिलेगा’ असा नाराही त्यांनी दिला. क्रीडाविषयक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो, असे ते म्हणाले. त्यांनी ‘खेलो इंडिया’ मोहिमेचाही उल्लेख केला, ज्या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंतांना संधी मिळत आहे. या काळात पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रोड शोही केला.
ते म्हणाले की, सरकार खेळाडूंची ओळख करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनवण्यासाठी प्रत्येक पावले उचलत आहे. ९ वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा केंद्रीय क्रीडा बजेटमध्ये ३ पट वाढ करण्यात आल्याची माहिती पीएम मोदींनी दिली. 'खेलो इंडिया' कार्यक्रमाचे बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ७० टक्क्यांनी वाढले आहे. आज भारताला क्रीडा क्षेत्रात जे यश मिळत आहे, ते देशाच्या विचारसरणीतील बदलाचे परिणाम आहेत. तसेच आम्ही खेळांना युवकांच्या फिटनेस, रोजगार आणि करिअरशी जोडले आहे, असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, “वाराणसीतील तरुणांना उच्चस्तरीय क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा विचार करून या नवीन स्टेडियमवर तसेच सिग्रा स्टेडियमवर सुमारे ४०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. काशीचा खासदार असल्याने येथे झालेल्या बदलांचा मी साक्षीदारही आहे. खासदार क्रीडा स्पर्धेदरम्यान येथे असलेल्या उत्साहाचीही मला माहिती मिळत आहे.” हे नवीन स्टेडियम काशीच्या संस्कृती आणि इतिहासाव्यतिरिक्त अध्यात्माचे दर्शन घडवणार आहे.