बदली झाल्यानंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाच्या दणका; ११ अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

    21-Sep-2023
Total Views |

Revenue Department


मुंबई :
सरकारी नोकरीमध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे वागणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने जोरदार झटका दिला आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने थेट निलंबित केले आहे.  या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांपासून बदली झाल्यानंतर रुजू न झालेल्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
 
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये महसूल विभागातील आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली मिळाल्यानंतर अनेक अधिकारी नोकरीवर रुजू न होता आपल्या मनासारख्या व सोयीस्कर ठिकाणी बदली मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशाच अधिकाऱ्यांवर आता महसूल विभागाने कारवाई केली आहे.
 
या अधिकाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी आणि अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर दोघांची नावे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. तसेच विदर्भातील सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरच्या सुनंदा भोसले, वर्धा येथील पल्लवी तभाने, नागपूरचे अपर तहसीलदार बालाजी सुर्यवंशी, गडचिरोलीतील धानोरा येथील सुरेंद्र दांडेकर, वडसादेसागंज येथील विनायक थविल आणि नाशिक विभागातील करमणूक शुल्क अधिकारी सुचित्रा पाटील इत्यादींचा समावेश आहे.