मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदपीन भुमरे यांच्यात खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. भूमरेंसह अब्दुल सत्तार ही यात होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा, तसेच कमी निधी दिला जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
यावर संदीपान भुमरे म्हणाले, "बैठकीत गोंधळ वैगेरे काही झाला नाही. आम्हाला निधी जास्त द्यावा, अशी अंबादास दानवे यांची मागणी होती. कुणीही अंगावर आले नाही. आम्ही सर्वांना समान निधी दिला आहे. विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलं. माझ्या अंगावर कुणी आलं नाही. जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते."
तर अंबादास दानवे म्हणाले, "जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी असल्यासारखे जर पालकमंत्री वागत असतील तर त्यांच्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. सत्ताधारी आमदारांनाही तसंच वाटत होतं. मी त्यांचीही भूमिका मांडली. आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, हरीभाऊ बागडे नाना या सगळ्याच आमदारांना तसं वाटत होतं. मी फक्त ती भूमिका आक्रमकपणे मांडली. ते तुम्हाला म्हणतील की आम्ही सगळ्या तालुक्यांना सारखाच निधी दिला आहे. परंतु तालुक्यांमधील लोकसंख्येच्या निकषावर निधीचं वाटप होत असतं." असं अंबादास दानवे म्हणाले.