ठाणे : चालू वर्षी खरीप हंगामाकरिता शासनामार्फत फक्त एक रुपया भरून पिक विमा योजना सुरु आली होती. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी पिक घेणाऱ्या ९७ हजार १७४ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक होता. या योजनेत सहभाग होण्यासाठी बँक, सामायिक सुविधा केंद्र, शासनाचे संकेतस्थळ इ.पर्याय उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.१/- वजा जाता शेतकरी हिश्श्याची उर्वरित फरकाची रक्कम सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.
त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी पिक घेणाऱ्या ९७ हजार १७४ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी बँक मार्फत ३५ हजार ८७५, सामायिक सुविधा केंद्रामार्फत ५८ हजार १४१, शासनाच्या संकेतस्थळामार्फत ३ हजार १५८ इतक्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक सहभाग घेतला. पिक विमा योजनेत गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी शेतकऱ्यांनी २१९ टक्के एवढा भरघोस प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी दिली.