नवी दिल्ली : औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वनाथाच्या दर्शनास गेल्या आणि परत आल्याच नाहीत, असा पुरोगामी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील इतिहास लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शनिवारी मांडला. मात्र, नेमाडेंच्या या इतिहासाचे खरे इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी खंडन केले आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यसभा खासदार शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), लेखक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बोलताना नेमाडे यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर आणि औरंगजेब याविषयी एक दावा केला होता. ते म्हणाले, “त्या काळात हिंदू मुस्लिम एकत्र होते. औरंगजेबाच्या २ राण्या काशीविश्वेश्वराला दर्शनाला गेल्या आणि आल्याच नाहीत. चौकशी केल्यानंतर असे समजले मंदिरात जे पंडित असत ते स्त्रियांना तरुणींना भ्रष्ट करत. ज्या औरंगजेबाने याविरुद्ध आवाज उठवला त्याची इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा अशी नोंद केली”, असा दावा नेमाडे यांनी आपल्या भाषणामध्ये केला.
नेमाडे यांचा दावा हा धादांत खोटा असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. हा बनावट प्रसंग काँग्रेसचे नेते पट्टाभिसितारामय्या यांनी 'फेदर्स अॅण्ड स्टोन्स' या पुस्तकात नमूद केला आहे. सितारामय्या यांनी म्हटले आहे की, औरंगजेबाने आपल्या पदरी अनेक हिंदू उमराव बाळगले होते. त्यांना घेऊन औरंगजेब बनारसचे मंदिर पाहण्यास गेला. त्यावेळी कच्छची एक राणी गायब झाली. ती राणी मंदिराच्या तळघरात सापडली. त्यावेळी धनिक यात्रेकरूनना लुबाडायचा मंहंताचा धंदा असल्याचे उघड झाले आणि म्हणून लुटीचे असे ठिकाण हे देवाचे घर असू शकत नाही असे जाहीर केले आणि ते लगेच पाडून टाकण्याचा हुकूम दिला. वाचलेल्या राणीनेच नंतर उध्वस्त मंदिराच्या जागी मशिद बांधण्याचा आदेश दिल्याचे सितारामय्या यांनी नमूद केले होते.
सितारामय्या म्हणतात...
सितारामय्या यांच्या या दाव्याची सत्यता मेहेंदळे यांनी ना. ग. गोरे यांच्याकडून तपासली होती. कारण, गोरे यांनीदेखील या दाव्याच्या सत्यतेविषयी सितारामय्या यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी सितारामय्या म्हणाले की, “मी हिंदू- मुसलमानांमध्ये ऐक्य असावे अशा मताचा आहे. असे ऐक्य घडून येण्याच्या मार्गात औरंगजेब हा मोठाच अडथळा आहे असे मला आढळून आले आहे. म्हणून मी ती गोष्ट स्वतः कल्पनेने रचून सांगितली आहे”, असे सितारामय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे नेमाडे यांनी सितारामय्या यांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासात स्वत:चाही खोटेपणा मिसळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.