मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांच्या पार्शवभूमीवर बुधवार दिनांक ४ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचा परिणाम थेट तिसऱ्या दिवशी देखील पाहण्यास मिळाला आहे. मुंबईतील अनेक बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. मुंबईतील एकूण २७पैकी १२ आगारांमधील भाडेतत्त्वावरील तब्बल एक हजार बस मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावल्या नसल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आंदोलकांच्या मागण्यां संदर्भात बेस्ट प्रशासनाकडून जरी कंत्राटदार कंपन्यांना संबंधित सूचना देण्यात आल्या असल्या तरी अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे आंदोलन सध्या तरी असेच सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मात्र अन्य पर्यायी वाहतूक सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे.
आंदोलनाची मुख्य करणे
- वेतनवाढ न मिळाणे
- वेळेवर जमा न होणारा भविष्य निर्वाह निधी
- पगाराच्या पावत्या न मिळणे
- पुरेशा साप्ताहिक सुट्ट्या न मिळणे
कोणत्या आगारांतून बस धावू शकलेल्या नाहीत ?
घाटकोपर, मुलुंड, वरळी, प्रतीक्षानगर, आणिक, देवनार, शिवाजीनगर, मजास, सांताक्रुझ, गोराई आणि मागाठणे आगारातील भाडेतत्त्वावरील एक हजारहून अधिक बस आंदोलनामुळे मुंबईतील रस्त्यांवर धावत नाही आहेत.