'प्रज्ञान' ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केला १२ मीटरचा प्रवास ; इस्रोकडे डेटा यायला सुरुवात!
26-Aug-2023
Total Views | 210
नवी दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेतील चांद्रयानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग होऊन तीन दिवस झाले आहेत. या आश्चर्यकारक आनंदाच्या बातमीनंतर, तिथून आनंदाच्या बातम्या येणं सुरूच आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दि.२६ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान बद्दल नवीन माहिती दिली. इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले की, दि. २६ ऑगस्ट रोजी रोव्हरने १२ मीटरचे अंतर कापले.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, “चांद्रयान-३ रोव्हर प्रज्ञानने शनिवारी सकाळपर्यंत १२ मीटरचे अंतर कापले आहे. प्रत्यक्षात बुधवारी (२३ ऑगस्ट २०२३) रोजी 'चांद्रयान-३' चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. तेथे लँडर विक्रमने प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर उतरवले. लँडर मॉड्यूलवरील दोन-विभागाच्या फोल्ड करण्यायोग्य रॅम्पने रोव्हरला दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर टिथरसह खाली येण्यास मदत केली. रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर ही वायर काढण्यात आली. हे चालू असताना, एक सौर पॅनेल देखील उघडले, ज्यामुळे रोव्हरला त्याच्या ५०० मीटरच्या प्रवासासाठी ५०W ची वीज निर्माण करता आली. या लँडरबाबत इस्रोने शुक्रवारी ट्विटर हँडलवर नवीनतम अपडेट टाकले आहे.
इस्रोने लिहिले, “सर्व नियोजित रोव्हर क्रियाकलाप सत्यापित केले गेले आहेत. रोव्हरने सुमारे आठ मीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले आहे." रोव्हर पेलोड्स LIBS (लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप) आणि APXS (अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर) देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत, ISRO ने सांगितले.सोप्या भाषेत सांगायचे तर, चंद्रावरून डेटा गोळा करण्यासाठी रोव्हरची योजना प्रत्यक्षात आली आहे आणि रोव्हरचा डेटा गोळा करणार्या दोन पेलोडनेही त्यांचे काम सुरू केले आहे. पेलोडचे सर्व ऑपरेशनल मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हर कार्यरत आहेत.
रोव्हर गोळा केलेला डेटा लँडरला पाठवेल आणि नंतर मागील चांद्रयान मिशन-२ च्या ऑर्बिटरला पाठवेल. यानंतर चांद्रयान-२ चे ऑर्बिटर हा डेटा पृथ्वीवर पाठवेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवसा डेटा गोळा करण्यासाठी सर्व प्रयोग चालू केले आहेत. पुढील दोन आठवडे म्हणजे एक चंद्र दिवस (चंद्रावरील एक दिवस १४ दिवसांचा असतो) या उपकरणांचा वापर केला जाईल आणि त्यांचे निरीक्षण केले जाईल. कारण रात्री अंधार पडताच सूर्यप्रकाश न मिळाल्याने ते निष्क्रिय होण्याची शक्यता असते.