चंद्रावर भारताची ‘शिवशक्ती’ !; २३ ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

    26-Aug-2023
Total Views | 91
PM Narendra Modi Visited ISRO Telemetry Tracking and Command Network

नवी दिल्ली :
भारताचे विक्रम लँडर चंद्रावरील ज्या भागात उतरले, त्या भागास आजपासून ‘शिवशक्ती’ पॉइंट या नावाने ओळखले जाईल; त्याचप्रमाणो २३ ऑगस्ट ही दिवस यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस दौऱ्यानंतर शनिवारी सकाळीच बंगळुरू येथे इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कला भेट दिली आणि चांद्रयान-३ च्या यशाबद्दल इस्रोच्या चमूसमोर आपले विचार व्यक्त केले. चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या चमूमधील शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली. त्यांना चांद्रयान-३ मोहिमेद्वारे मिळत असलेली माहिती आणि मोहिमेची प्रगती याविषयीची माहिती देण्यात आली.

चांद्रयानचे मून लँडर ज्या जागेवर उतरले तो भाग ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल. ‘शिव’ मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि ‘शक्ती’ आपल्याला हा संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचे हे ‘शिवशक्ती’ स्थान देखील आपल्याला हिमालयासोबत कन्याकुमारीशी असलेल्या संबंधांची अनुभूती देणार आहे. या पवित्र संकल्पाला शक्तीचे आशीर्वाद हवेत आणि ही शक्ती म्हणजे आपली नारी शक्ती आहे. चांद्रयान-३ च्या या चांद्रमोहिमेच्या यशात आपल्या देशाच्या महिला शास्त्रज्ञांनी, देशाच्या नारी शक्तीने मोठी भूमिका बजावली आहे. चंद्रावरील ‘शिवशक्ती’ हे स्थान भारताच्या वैज्ञानिक आणि तत्वज्ञानाधारित विचारसरणीचा दाखला देणारे प्रतीक बनेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

चांद्रयान-३ ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले तो २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जाईल, अशीही घोषणा पंतप्रधानांनी केली. राष्ट्रीय अंतराळ दिन विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची भावना साजरी करेल आणि आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चांद्रयान-२ च्या पाऊलखुणा ज्या ठिकाणी उमटल्या आहेत त्या ठिकाणाला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हे स्थान भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा देईल आणि अपयश म्हणजे शेवट नाही, याचे स्मरण सतत करून देत राहणार असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

भारतीय अवकाश क्षेत्राची क्षमता केवळ उपग्रह प्रक्षेपित करणे आणि अंतराळ संशोधनापुरती मर्यादित नाही तर त्याची ताकद जीवन सुलभता आणि प्रशासनातील सुविधा यामध्येही दिसून येते. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात केंद्र सरकारमधील संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी इस्रोसोबत आयोजित केलेल्या कार्यशाळेची आठवण त्यांनी सांगितली. अंतराळ उपयोजनेत प्रशासनाला जोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रचंड प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी स्वच्छ भारत अभियान, दुर्गम भागात शिक्षण, दळणवळण आणि आरोग्य सेवा; दूर -औषधोपचार आणि दूर- शिक्षण यातील अवकाश तंत्रज्ञानाच्या भूमिकेचा उल्लेख केला.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात 'नाविक' प्रणालीचे सहाय्य आणि योगदान याबद्दलही त्यांनी सांगितले. “आपल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचा आधारदेखील अवकाश तंत्रज्ञान आहे. यामुळे प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात खूप मदत होत आहे. अंतराळ अनुप्रयोगाची ही व्याप्ती, जी काळाबरोबर विस्तारत आहे, ती आपल्या तरुणांसाठीदेखील संधी वृद्धिंगत करत आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121