नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या सागरपूर भागातील एका सरकारी शाळेतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत मध्यान्ह भोजन घेतल्यावर पोटदुखी आणि उलट्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दि. २५ ऑगस्ट रोजी घडली.
दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर इयत्ता ६ वी ते ८ वीच्या सुमारे ७० विद्यार्थ्यांनी पोटदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रार आली.या प्रकरणी तेथील एका डॉक्टरने सांगितले की, या विद्यार्थ्यांना गंभीर उलट्या, तंद्री आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांच्या तक्रारीनंतर दीनदयाल उपाध्याय आणि दादा देव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.डीसीपी मनोज सी यांनी सांगितले की, संध्याकाळी ६ वाजता सागरपूर पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला की सागरपूरच्या दुर्गापार्कमध्ये असलेल्या सर्वोदय बाल विद्यालय शाळेतील सहा ते आठवीच्या सुमारे ७० विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण घेतल्यानंतर उलट्या झाल्या.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुरी, भाजी आणि सोया पेय खायला देण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. डीसीपी म्हणाले, "जेव्हा काही विद्यार्थ्यांनी वेदना होत असल्याची तक्रार केली तेव्हा अन्न आणि सोया ड्रिंक्सचे वितरण बंद करण्यात आले."
वैद्यकीय अहवालानुसार, शाळेत कालबाह्य झालेले सोया पेय दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्याचे सांगण्यात आले. सध्या मुलांना उपचारानंतर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.डॉक्टरांनी सांगितले की, “त्यातील काहींना सतत उलट्या होत असल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत, आम्ही काही मुलांना सोडले होते ज्यांना सौम्य समस्या होत्या. उर्वरित मुलांच्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.या प्रकरणी दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “शाळेच्या मध्यान्ह भोजन पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी उर्वरित मध्यान्ह भोजनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.