भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग केले असून अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यानिमित्ताने या महत्वाकांक्षी मोहिमेचा आढावा घेणारा हा लेख....
वमिमा ओषधीः सोम विश्वास्त्वमपो अजनयस्त्वं गाः॥
त्वमा ततन्थोर्वन्तरिक्षं त्वं ज्योतिषा वि तमो ववर्थ (ऋग्वेद १-९१-२२)
(हे चंद्रा, तुझ्यामुळे पृथ्वीवर सर्व वनस्पती उत्पन्न झाल्या, तू पाणी उत्पन्न केलेस व तुझ्यामुळे गाई इत्यादी प्राणी उत्पन्न झाले.रात्रीच्या विशाल आकाशात तू प्रकाशाने अंधाराचा नाश केलास.)
ऋग्वेदातल्या या सोमसूक्तात पृथ्वीवरची सजीव सृष्टी ही जणू चंद्राचीच देणगी आहे, अशी चंद्राची स्तुती केली आहे. चंद्र हा आपल्या भारतीयांच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक. चंद्राला भारतीय संस्कृतीत देवता मानून पूजन केले जाते. महिला त्याला भाऊ म्हणून ओवाळतात, तर लहान मुले त्याला ‘चांदोमामा‘ म्हणत ‘भागलास का‘ विचारतात. प्रेमीयुगल ‘फलकसे चांद‘ आणण्याची स्वप्ने बघतात, तर भारताचे शास्त्रज्ञ मात्र थेट चंद्रावर उतरण्याचे स्वप्न खरे करून दाखवतात. भारताची ‘चांद्रयान‘ मोहीम याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. शुक्रवार, दि. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३‘चे प्रक्षेपण होणार असून नवा इतिहास घडवला जाणार आहे.
‘चांद्रयान‘ हा भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, याअंतर्गत अनेक मोहिमांतून चंद्रावर याने पाठवून अन्वेक्षण करण्यात येणार आहे. चंद्राभोवती कक्षण उपग्रह (ऑर्बिटर) फिरत ठेवणे, चंद्रभूमीवर अवतरक (लँडर) उतरवणे, चंद्रावर बग्गी (रोव्हर) चालवणे अशा काही प्रयोगांचा यात समावेश आहे. याच्या पहिल्या टप्प्यात ‘चांद्रयान-१‘ मोहिमेत ‘चांद्रयान- १‘ या मानवरहित अंतराळनाचे प्रक्षेपण दि. २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. ८ नोव्हेंबरला यान यशस्वीरीत्या चंद्र कक्षेत दाखल झाले. यांनतर ‘मून इम्पॅक्ट प्रोब‘ हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ’शॅकलटन क्रेटर’ येथे नियोजितरित्या आदळला आणि चंद्रावर पोहोचणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.
या मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात दि. २२ जुलै, २०१९ रोजी ‘चांद्रयान-२‘ चंद्राकडे रवाना झाले. दि. २० ऑगस्टला हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले आणि ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत फिरू लागला. ‘विक्रम‘ हा अवतरक चंद्रभूमीवर अलगद उतरवून त्यातील प्रज्ञान बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरवत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार होता. दि. ७ सप्टेंबरला अखेरच्या टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ किमी उंचीवर असताना ‘विक्रम‘शी संपर्क तुटला आणि तो चंद्रावर आदळून नष्ट झाला. या दुर्दैवी घटनेने देशभरातील खगोलप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरले. पण, ‘इस्रो‘च्या शास्त्रज्ञ अपयशातून सावरत ‘चांद्रयान-३‘ या मोहिमेच्या तयारीला लागले.
या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणजे ‘चांद्रयान- ३.‘ चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लॅण्डिंग‘द्वारे लँडर सुरक्षित उतरवणे, चांद्रभूमीवर बग्गी फिरवत शास्त्रीय प्रयोग करणे, ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. ही मोहीम ‘चांद्रयान-२‘ प्रमाणेच आहे. लँडर मॉड्यूल (LM), प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि रोव्हर हे याचे तीन प्रमुख घटक आहेत. ‘चांद्रयान-२‘ प्रमाणे यात कक्षण उपग्रह नसून त्याऐवजी ‘प्रोपल्शन मॉड्यूल‘ संदेशवहनाचे कार्य करेल. याचा लँडर ‘चांद्रयान-२‘ मधल्या विक्रम लँडर प्रमाणेच असून सुरक्षित लँडिंगसाठी सुधारणा केल्या गेल्या आहेत.
दि. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३‘ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित होईल. एखाद्या वस्तूला अंतराळात पाठवण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करील इतका रेटा देऊन ती अंतराळात फेकावी लागते. त्यासाठी क्षेपणयाने वापरली जातात. ‘चांद्रयान-३‘ मोहिमेत लॉन्च व्हेईकल ‘मार्क-खखख‘ हे ‘इस्रो‘चे सर्वात शक्तिशाली क्षेपणयान वापरण्यात येणार आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर ‘प्रोपल्शन मॉड्यूल लँडर‘ला १०० किमीच्या वर्तुळाकार ध्रुवीय चंद्राच्या कक्षेत आणेल आणि वेगळे करेल. संदेशवहन आणि नियंत्रणासाठी ‘प्रोपल्शन मॉड्यूल‘ चंद्राच्या कक्षेत फिरत राहील. यादरम्यान ते काही निरीक्षणेदेखील नोंदवेल. यासाठी त्यावर ‘स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप)‘ नावाचे उपकरणदेखील आहे.
यांनतर अवतरक चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात ६९.३७ दक्षिण, ३२.३५ पूर्व या नियोजित स्थानावर उतरेल. सुरक्षित अवतरणासाठी यात अनेक संवेदक उपकरणे (सेन्सर) बसवण्यात आली आहेत. एक्सीलरोमीटर, अल्टिमीटर, डॉपलर व्हेलोसीमीटर, टचडाउन सेन्सर यांसारख्या संवेदकांमुळे अपघात न होता उतरणे शक्य होईल. चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असताना ‘एमएमएच‘ आणि ‘एमओएन ३‘ या द्वि-प्रणोदक प्रणोदन प्रणालीने (बाय-प्रोपेलंट प्रोपल्शन सिस्टम) विरुद्ध दिशेत रेटा देऊन अवतरकाची गती कमी करत तो अलगद उतरवला जाईल. ‘प्रोपल्शन मॉड्यूल‘ साधण्यासाठी यावर एक्स-बँड अँटेना वापरला आहे. अवतरकातून सहा चाकी बग्गी चंद्रभूमीवर यशस्वी संचार करेल. यावर नेव्हिगेशन कॅमेरे आणि एक सोलर पॅनल आहे.
बग्गीवर चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनांचा अभ्यास करण्यासाठी ‘अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर ((APXS)‘ आणि ‘लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (APXS)"‘ ही उपकरणे आहेत. अवतरकावर देखील चार वैज्ञानिक उपकरणे आहेत, जी वेगवेगळे प्रयोग करतील. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी ‘चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)‘ कार्य करेल. ‘इन्स्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी(ILSA)"‘ उपकरण चंद्राच्या भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून असेल. या सगळ्या उपकरणातून चंद्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.
‘चांद्रयान-३‘ सफल ठरल्यास चंद्रावर सुरक्षित अवतरण करू शकणार्या मोजक्या देशांत भारताचा समावेश होईल. सोमसूक्ते रचणार्या वैदिक ऋषींपासून ते चंद्रावर उतरण्याचे स्वप्न सत्यात आणणार्या ‘इस्रो‘च्या वैज्ञानिकांपर्यंत भारतीयांचे मनोविश्व व्यापणारा चंद्र त्याच्याकडे झेपावणार्या ‘चांद्रयाना‘चे स्वागत करायला उत्सुक आहे. ‘चांद्रयान-३‘च्या सफल उड्डाणासाठी ‘इस्रो‘ला शुभेच्छा. शुभास्ते पंथान: सन्तु।
विनय जोशी
vinayjoshi२३@gmail.com