मुंबई : “रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू करिधल श्रीवास्तव या सध्या भारताच्या चांद्रयान - ३ मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
रितू करिधल श्रीवास्तव यांनी १९९६ मध्ये लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम. एस्सी केले. तसेच त्यांनी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथे एरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षणही घेतले. अंतराळाची आवड आणि त्यांची जिद्द यामुळे त्यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लहान वयातच अंतराळ विज्ञानाबद्दल त्यांची आवड निर्माण झाली. तेव्हापासूनच त्यांनी इस्त्रो आणि नासाद्वारे राबवल्या जाणार्या अंतराळ मोहिमांचे लेख व बातम्या गोळा करण्याचा छंद जोपासला. पुढे. नोव्हेंबर १९९७ मध्ये त्यांचे इस्त्रोमध्ये सामील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
या क्षेत्रात त्यांनी विशेषत: मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) यासाठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून महत्वाचे योगदान दिले. यासाठी तसेच तर इतर अनेक अंतराळ मोहिमांवर केलेल्या कामासाठी त्यांना भारताची "रॉकेट वुमन" म्हणून ओळखले जाते. यंग सायंटिस्ट अवॉर्ड, इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड आणि सोसायटी ऑफ इंडिया एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अवॉर्ड यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.