खानिवडे : वसईच्या ग्रामीण भागात विरार पूर्वेकडील खार्डी कोशिंबे गावाच्या हद्दीतील तळ्याचापाडा परिसरात अज्ञात हिंस्त्र रानटी प्राण्याने दोन कुत्रे, एक मांजर व गायीचे वासरू फस्त केल्याचे आढळुन आले आहे . मागील पंधरा दिवसांपासून घडलेल्या या घटनेने परिसरातील राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तो प्राणी बिबट्याच असावा असे येथील जुने जाणते रहिवाशी सांगत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .त्यामुळे आता या भागातील जंगला शेजारी शेती असलेले शेतकरी संध्याकाळी लवकर घरी परतत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार तळ्याचा पाडा येथे राहणारे कमलाकर केशव माळी यांच्या घरातील एक कुत्रा १५ दिवस अगोदर गायब झाला होता . त्याचा शोध घेत असतानाच काल परवा दुसरा कुत्राही गायब झाला आहे . तसेच त्यांच्या घरातील मांजरही एक ठिकाणी अर्धवट शरीराची मिळून आली . याबाबत माळी यांनी बारकाईने निरीक्षण केले असता जंगलाकडील त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला जे चिखल मातीत उमटलेले ठसे दिसून येत आहेत त्यावरुन तो प्राणी हा बिबट्या असावा असे माळी आणि निरीक्षण करणाऱ्या ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे . सदर रानटी प्राण्याने दोन कुत्रे व मांजराची शिकार केली असल्याचे निदर्शनास आले असताना एका गायीचे वासरू ही गायब झाल्याने ग्रामस्थांच्या बिबट्या असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे .काही दिवस अगोदर येथील रहिवासी रघुनाथ कराळे यांनी गुरुचरणात खुंटा मारून चरायला ठवलेल्या गायीचे वासरूही बिबट्यानेच पळवुन नेलं असावं असं सांगण्यात येत आहे.
तळ्याचापाडा येथील वस्ती ही डोंगराच्या खाली जवळच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे .याबाबत मांडवी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, वन अधिकाऱ्यांनी येथे शोध घेऊन त्या हिंस्त्रं प्राण्यास जेरबंद करावे अशी मागणी राहिवाश्यांनी केली आहे. मागील वर्षी या भागातील कशीद कोपर येथे एका बिबट्याने दहशत माजवली होती .त्याला वनविभागाने सापळा लावून पकडले होते .अगदी याच कशीदकोपर गावाच्या डोंगरापालिकडे तळ्याचापाडा ही वस्ती आहे.