मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत-चौकफाटा येथे त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओत गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान, या एनडी स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत असताना देसाईंवर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे.
एन.डी स्टुडिओवर कोटींचे कर्ज
नितीन देसाई यांनी १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्या मुळ रकमेवरील व्याज वाढून कर्जाची रक्कम सुमारे २४९ कोटींवर पोहोचली होती अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. ठराविक मुदतीमध्ये घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळेच देसाईंच्या एन.डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढवल्याचे सांगितले जात आहे. कलिना मुंबईस्थित असणाऱ्या एडलवाइस ॲसेट रिकंन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. मात्र या प्रस्तावावर जिल्हा प्रशानाने अद्याप कोणताच निर्णय दिला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सर्व घटनेतून नितीन देसाई यांना नैराश्य आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चित्रपट, मालिकांचे हरहुन्नरी कला दिग्दर्शक
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' ‘किक’, ‘जोधा अकबर (हिंदी मालिका), ‘राजा शिवछत्रपती’ (मराठी मालिका), ‘बालगंधर्व’ (मराठी, चित्रपट), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’स्लमडॉग मिलेनियर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’, या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या राजा शिवछत्रपती या मालिकेच्या सेटच उभारण्यासोबतच त्यांनी या मालिकेची निर्मिती देखील केली होती. तब्बल वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता.