लोकमान्य टिळक हे संपूर्ण देशाने स्विकारलेले पहिले नेते : डॉ. सदानंद मोरे

    02-Aug-2023
Total Views | 46
Dr. Sadanand More Speech On Lokmanya Tilak

ठाणे
: स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांच्यामुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे अनेकजण होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हे म्हणणे अमान्य केले नाही, परंतु सुराज्य आणि स्वराज्य यातील फरक सांगत स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही असे टिळकांचे ठाम मत होते. त्या काळात आजच्या सारखी साधने नव्हती, तरीही लोकमान्य टिळक संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्यापूर्वी असा नेता या देशात कोणी नव्हता, वेगवेगळ्या प्रांतातील नेते होते. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताने स्विकारलेले पहिले नेते होते. असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केले.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील सहावे पुष्प साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाँ. सदानंद मोरे यांनी 'स्वातंत्र्यसंग्रामातील लोकमान्य टिळकांचे योगदान' या विषयावर गुंफले. यावेळी ठाणेकरांच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी डॉ. सदानंद मोरे यांचे ग्रंथबुके, शाल व त्यांचे रेखाचित्र देवून स्वागत केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे उपस्थित होते.

या व्याख्यानमालेस ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, कवयित्री अनुपमा उजगरे, लेटस् रीड इंडिया चळवळीचे जनक प्रफुल्ल वानखेडे, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ठाणे लघुउद्योजक संघटनेचे पदाधिकारी शिशिर जोग, विद्या प्रसारक माडळाचे डॉ. महेश बेडेकर, लेखक मकरंद जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले

जहाल मतवादी नेते असून प्रत्येक संकटाचे संधी मध्ये रूपांतर करणारे होते.त्या काळात स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यापेक्षा स्वराज्य महत्वाचे होते. स्वातंत्र्याची भाषा त्यावेळी थेट कोणी करत नव्हते. उत्तरपेशवाईचा तो काळ होता, अशा काळात ब्रिटीशांनी भारत जिंकून राज्य करायला सुरूवात केली, त्यांनी त्या काळात अनेक चांगल्या गोष्टी देखील केल्या. ब्रिटीशांमुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे लोक होते. त्यावर टिळकांनी, 'असेल सुराज्य पण शेवटी स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही' हे जगाला सांगणारे टिळक हे आधुनिक इतिहासातील पहिले नेते असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले.

टिळकांमुळेच महात्मा गांधीं चळवळीत

महात्मा गांधी यांचे नेतृत्व स्वातंत्र्यलढ्यात उभे राहिले आणि गांधी युग सुरु झाले, पण टिळकांनी जे उभे केले त्याच्या खांद्यावर उभे राहून महात्मा गांधी पुढे चालू लागले. टिळकांनी सर्व प्रथम स्वदेशीची चळवळ केली आणि ती चळवळ गांधीजींनी आणखीन पुढे नेली. स्वदेशी चळवळीचे अर्थशास्त्र टिळकांनी निर्माण केले.टिळकांनी महात्मा गांधी यांना या चळवळीत आणून प्रोत्साहन दिले असल्याचे नमूद करीत डॉ. सदानंद मोरे यांनी टिळक ते गांधी या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास रसिकांसमोर उलगडला.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121