मुंबई : टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाटा हे राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपये २५ लाख, एक सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उद्योग जगतात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या वतीने कर्तबगार उद्योजकांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टाटा यांना यापूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद भूषविलेल्या रतन टाटा यांचे भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. जग्वार, लॅण्ड रोव्हर, कोरस ग्रुप ऑफ स्टील कंपनी यासारख्या बड्या परकीय कंपन्यांची खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. टाटा हे गेल्या अनेक दशकांपासून एक प्रथितयश उद्योजक म्हणून जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेले उद्योजक असून त्यांनी 'टाटा' संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी देखील ते प्रसिद्ध आहेत.