ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेली मृत्युंची घटना ही अत्यंत दुर्दैवी व क्लेशकारक आहे.तेव्हा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग प्लाझा रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासोबतच कळवा रुग्णालयासाठी अॅक्शन प्लॅन बनवावा. अशा सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना सोमवारी निवेदन देऊन केल्या. याप्रसंगी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात लागोपाठ २८ रुग्णांचा मृत्यु झाला. कळवा रुग्णालयात सुरु असलेले मृत्युचे तांडव थांबण्याचे नाव घेत नसल्याने आ. केळकर यांनी सोमवारी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन त्यांना सूचना केल्या. सिव्हील रुग्णालय पूर्णपणे चालु नसल्याने वेगवेगळ्या तसेच ग्रामीण भागातुन कळवा रुग्णालयात रुग्ण धाव घेतात. त्यामुळे कळवा रुग्णालयावर अतिरिक्त ताण आला आहे.पावसाचे दिवस व साथीचे आजार बळावण्याच्या दृष्टीने नुकत्याच पार पडलेल्या नियोजन बैठकीत याकडे लक्ष वेधल्याचे स्पष्ट करून आ. केळकर यांनी रोगराईच्या काळात, ठोस उपाययोजना करण्यासोबतच एक अँक्शन प्लॅन बनवण्याचे निर्देश दिले.
कळवा रुग्णालयात भविष्याच्या दृष्टीने सुदधा ही व्यवस्था कोलमडता कामा नये, यादृष्टीने देखील उपाययोजना करण्यात यावी. कळवा रुग्णालयाची क्षमता पाहता अधिकचे रुग्ण इतर रुग्णालयात हलवण्याबाबतची दक्षता घेणे गरजेचे आहे. ठाणे ग्रामीण भागातील तसेच पालघर जिल्ह्यातील रुग्ण कळवा रुग्णालयात येत असतात.तेव्हा, युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात यावी. अशा प्रकारच्या सूचना आ. केळकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना केल्या.