मुंबई : वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे. असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकरांचं भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणं झालंय हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही." असंही ते यावेळी म्हणाले.