इर्शाळवाडी दुर्घटना; पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य अखेर थांबले
पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार, पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
23-Jul-2023
Total Views | 83
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत सुरु असलेले बचावकार्य थांबविण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.२३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच, इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे असून या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, या शोध मोहिमेत २७ मृतदेह सापडले असून ५७ जण बेपत्ता आहेत.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही सामंत यांनी सांगितले. तसेच, भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत हे इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बढे , एनडीआरएफ कंमाडर तिवारी उपस्थित होते.