कोकणातील दरड प्रवण क्षेत्रात तात्पुरती आपत्ती निवारण केंद्राची उभारणी करावी : प्रविण दरेकर
20-Jul-2023
Total Views |
मुंबई- रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अशा घटना वारंवार कोकणात घडत असून एनडीएफचे कॅम्प जसे बसवता तसे कोकणातील दरडप्रवण नागोठणे, महाड, चिपळूण क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात आपत्ती निवारण केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी केली.
विधानपरिषदेत बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, आपल्या सर्वांना धक्का देणारी घटना इर्शाळवाडीची आहे. अशा प्रकारच्या घटना माळीण, तळीये येथे झाल्या. या घटना होत असताना सरकार कोणतेही असो अत्यंत प्रामाणिकपणे संवेदनशीलतेने त्या-त्या घटनांवर उपाययोजना करण्याचे काम करत आल्याचे पाहतोय. मी ही कोकणातून येतो. महाड, पोलादपूर या गावातून मी येतो. त्यामुळे या विषयाचे गंभीर्य, या घटना कशा घडतात, का घडतात या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत. ज्या-ज्या वेळेला आपत्ती आली त्या-त्या वेळेला उपाययोजना करण्यात पुढे राहिलो असं दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या निमित्ताने एक समाधानाची बाब वाटते. खालच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले. वरच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवेदन सादर केले व ते निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षानेही या गोष्टीचे राजकारण केले नाही. ही चांगली भावना पाहायला मिळाली. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री घटनास्थळी तातडीने पोचले आहेत. आवश्यक तो फोर्स आहे. परिस्थितीचे गांभीर्य दोन्ही सभागृहांत मांडून सरकारने भुमिका मांडली आहे. परंतु जी विरोधी पक्षाची भुमिका आहे तीच माझी भुमिका आहे. या घटना वारंवार होताहेत. सरकार प्रयत्न करते. पण निसर्गाचा कोप व भौगोलिक परिस्थिती एवढी भयानक आहे की या उपाययोजना तोकड्या पडतात. विशेषतः या घटना कोकणात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यात रायगडला मोठ्या प्रमाणावर होतात. महाड, पोलादपूर, मंडणगड, चिपळूण हे परिसर तर सातत्याने अशा आपत्तीना सामोरे जात आहेत, असेही दरेकर म्हणाले.
कोकणातील डोंगरावर जी गावं आहेत, ज्याज्या छोट्या वाड्या आहेत, काही कातळात वस्त्या वसल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात करतो. महाराष्ट्रात एवढी संवेदनशीलता व माणुसकी आहे. परंतु त्या उपाययोजना लॉन्गटर्म नाही. तात्पुरत्या निवारा व्यवस्था उभ्या करा. एनडीआरएफचे कॅम्प बसवता तसे नागोठणे येथे निवारा व्यवस्था केंद्र करा. त्यात किचन, तात्पुरत्या राहण्याची सोय असेल. ४-५ निवारा केंद्र करणे अवघड नाही, अशी मागणी दरेकर यांनी केली.