नवी दिल्ली : पाकिस्तानातील सिंध प्रांतात ३० हिंदूंचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (HRCP) सर्व पीडितांना सोडण्याची मागणी केली आहे. प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांच्या एका संघटित टोळीने ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. ही घटना दि. १६ जुलै रोजी घडली. यासोबत २४ तासात २ हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने दि. १६ जुलै रोजी एका ट्विटमध्ये सांगितले की, त्यांना सिंधमधील काशमोर आणि घोटकी भागात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याची माहिती मिळाली आहे. येथे दरोडेखोरांनी महिला आणि मुलांसह ३० हिंदूंचे अपहरण केले आहे. एचआरसीपीच्या म्हणण्यानुसार, दरोडेखोरांनी यापुढे हिंदू प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. याच ट्विटमध्ये सिंध सरकारला अपहरण झालेल्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही करण्यात आली आहे.
४८ तासांत दोन मंदिरे पाडली
४८ तासांत पाकिस्तानमध्ये २ हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. पहिली घटना दि. १६ जुलै रोजी घडली. त्यांनतर ८-९ संख्येने हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील काशमोर बाजार भागातील एका मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. यानंतर तेथे बांधलेल्या हिंदूंच्या घरांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. लोक घरात लपले असल्याने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याशिवाय, १५ जुलै रोजी कराचीतील १५० वर्षे जुने मारी माता मंदिर पाडण्यात आले. रात्रीच्या वेळी ही घटना हल्लेखोरांनी घडवून आणली. हे कृत्य करण्यापूर्वी परिसरातील वीज खंडित करण्यात आली होती. मंदिर पाडण्यासाठी सर्व मशिन्ससह बुलडोझर आणि मजूरही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान ११ जुलै रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागातील सर्व आदिवासी डाकूंनी सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याचे आवाहन केले आहे. सीमा हैदर यांना त्यांच्या झाकरानी कुळात परत न केल्यास डाकूंनी पाकिस्तानातील हिंदू महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली.४ मुलांची आई सीमा हैदर हिला नोएडा पोलिसांनी ३ जुलै रोजी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक केली होती.