मुंबई : जैन समाजाचे विद्वान तपस्वी गुरुदेव आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या आश्रमात घुसून काही समाजकंटकांनी त्यांची निघृण हत्या केली. कर्नाटकात झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही जैन संघटनांसह १० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी श्री दिगंबर जैन ग्लोबल महासभेचे सदस्य आणि भारतवर्षीय दिगंबर जैन कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
६ ते ७ जुलै दरम्यान विद्वान तपस्वी गुरुदेव आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या आश्रमात जबरदस्ती घुसून त्यांना मारहाणी करण्यात आली. इलेक्ट्रिक शॉक देऊन यातना दिल्या गेल्या आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले. या निघृण हत्येमुळे जैन समाज अतिशय दुखावला गेला असून, त्यांचा आक्रोश कर्नाटक राज्य प्रशासनाने ऐकावा आणि या हत्याकांडाप्रकरणी त्वरित खटला दाखल करावा, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे.
आपल्या निवेदनामार्फत संपूर्ण देशात जैन साधू आणि साध्वी जिथे प्रवास आणि निवास करतील अशा ठिकाणी चांगली सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जैन साधू आणि साध्वी यांना त्यांच्या पदयात्रे दरम्यान राजकीय अतिथींप्रमाणे पोलीस संरक्षण मिळावे आणि त्यांच्या विहारादरम्यान होणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा बसावा यासाठी देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपालांना निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, कोणत्याही वाहनाचा वापर न करता नग्न पावलांनी विहार करणे हा जैन साधू आणि साध्वी यांच्या साधनेचा एक भाग आहे. दुर्दैवाने सद्यस्थितीत या पदयात्रे दरम्यान वाहन अपघातात जैन साधू किंवा साधवींच्या मृत्यूच्या घटना वाढत आहेत. त्यांना प्रवासादरम्यान दुखापत सुद्धा होत आहे. यामुळे त्यांची साधना प्रभावित होत असून, आपल्या समाजासाठी व संस्कृतीसाठी सुरु असलेल्या त्यांच्या कार्यात अडथळा येत आहे. यासाठी जैन साधू आणि साध्वी यांना त्यांच्या पदयात्रे दरम्यान राजकीय अतिथींप्रमाणे पोलीस संरक्षण मिळावे असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.