समृद्धी महामार्ग बस अपघात : राज्य सरकारची मोठी घोषणा

    01-Jul-2023
Total Views |
Maharahstra CM Eknath Shinde On Samrudhi Highway Accident

बुलढाणा
: समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येणार असून तज्ज्ञांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला होता. या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले. तसेच, अपघातस्थळी जाऊन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी असून समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी आदी कारणांमुळे घडतात. तसेच, असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, या दुर्घटना पाहणीवेळी मंत्री गिरीष महाजन, संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.