चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता पणाला!

    04-Jun-2023
Total Views |

Sanjay Raut



शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या तसेच स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रातील राजकारण अतिशय खालच्या स्तराला पोहोचले आहे. विचारांचा लढा विचाराने करा म्हणणारे गुद्दे लगावतात, हे तर महाराष्ट्राने अनुभवले आहेच. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ऑन कॅमेेरा केलेले निंदनीय कृत्य समर्थनीय नक्कीच नाही. दुर्दैवाने त्याचेही समर्थन होताना दिसून येते आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नेहमीप्रमाणेच राऊत यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत, तर शरद पवार हाताची घडी घालून बसले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारण सध्या अतिशय खालच्या स्तराला पोहोचले आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे, असा दावा करणारे पक्षच सत्तेसाठी वाटेल ते करताना दिसून येत आहेत. जात-पात, धर्म-पंथ यांच्या नावावर महाराष्ट्रातील समाजमनात उभी फूट पाडलेली आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणार्‍या तसेच पुरोगामीत्वाचा ढोल वाजवणारे पक्षच राजकीय दुर्दशेला जबाबदार आहेत. विचारांचा लढा विचारांने करा, असे सांगणारे प्रश्न विचारला की, गुद्दे कशे लगावतात, हेही महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अनुभवले. सत्ता गेल्यानंतर सैरभैर झालेल्या उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तिघांनी म्हणूनच आता वैयक्तिक लाथाळ्या झाडायला सुरुवात केली आहे. त्याहीपुढची निलाजरेपणाची हद्द उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्याने गाठली आहे.

एका पक्षाचा प्रवक्ता तसेच राज्यसभा सदस्य पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी थुंकण्याची किळसवाणी कृती ऑन कॅमेेरा करतो आणि त्या कृत्याचे समर्थन पक्षाकडून केले जाते. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेली कृती ही घृणास्पद, किळसवाणी आणि निंदनीय अशीच आहे. त्याचे कोणत्याही पद्धतीने समर्थन होऊच शकत नाही, असे असतानाही उद्धव ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे निलाजरेपणाने त्याचे समर्थन करताना दिसून येत आहेत. शिंदे गटाला स्वतःची नकारात्मकता लपवण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त ते शोधत आहेत. राज्यात अनेक घटना घडल्या, त्यावेळी तुम्हाला आंदोलन करता आले नाही का? महिलांचा अवमान करण्यात आला, अहवेलना झाली त्यावेळी आंदोलन केले नाही. शेतकरी आत्महत्येवर आंदोलन केले नाही. संजय राऊत यांच्या जीभेचा प्रॉब्लेम आहे, अशा शब्दांत सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या कृत्यावर पांघरुण घालतात. या त्याच सुषमा अंधारे आहेत, ज्यांनी संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ या शब्दांत त्यांचे स्वागत केले होते.

हजार कोटींच्या ‘पत्राचाळ’ प्रकरणात राऊत हे तुरुंगात गेले होते. सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. ते कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याने तुरुंगात गेलेले नव्हते. तथापि, राऊत हे कोणतातरी भीमपराक्रम करून आल्यासारखे अंधारे यांनी त्यांचे स्वागत करत, स्तुतीसुमने उधळली होती. वैयक्तिक पातळीवर हिणकस आरोप करणार्‍या, हिंदू देवदैवतांची टिंगल करणार्‍या अंधारे नितेश राणे यांना असभ्य आणि असंस्कृत म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद काय असेल. नितेश राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असेल, असे त्या म्हणतात. संतुलन कोणाचे बिघडले आहे? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला असता, तर बरे झाले असते. राऊत यांनी गेल्या तीन वर्षांत अर्वाच्य शब्दांना राजमान्यता मिळवून दिली. हरामखोर म्हणजे ‘नॉटी’ असा नवा शोध त्यांनी लावला. वृत्तवाहिन्यांशी बोलताना कोणतेही तारतम्य न बाळगता सैल जीभ सोडणारे राऊत अंधारे यांना असभ्य, असंस्कृत वाटत नाहीत. याच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही दाखल झाला आहे. त्याही वेळी राऊत यांच्या समर्थनार्थ अंधारे याच मैदानात उतरल्या होत्या.

अंधारे यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यावेळी राऊत लगोलग अंधारे यांना पाठीशी घालणारे ठरले होते. तत्कालीन राज्यपाल यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाने बोलावे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली होती. आताही ‘लव्ह जिहाद’ संदर्भात देशभरात जनमत क्षुब्ध झालेले असताना, राऊत यांनी सर्वच धर्मांमध्ये अशा पद्धतीचे जिहाद सुरू असल्याची भूमिका घेतलेली आहे. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला राऊत यांनी जी वागणूक दिली आहे, ती निंदनीय अशीच आहे. तथापि, पत्रकारांच्या कोणत्याही संघटनेने अधिकृतपणे राऊत यांचा निषेध करणारे एकही पत्रक प्रसिद्धीला दिलेले नाही. माध्यमांची विश्वासाहर्ता पणाला लागलेली आहे. प्रत्येक माध्यम हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे मुखपत्र असते. काही घोषित असतात, तर काही अघोषित. म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच माध्यमांकडे पाहिले जाते. कोणत्याही माध्यमाकडे हे ज्येष्ठ वा कनिष्ठ म्हणून तुलना केली जात नाही. मात्र, राजकारणातील या अशा हिणकस प्रवृत्तींचा वेळीच निषेध न केल्याने, सर्वच माध्यमांवर संशयाने पाहिले जाते. ९० च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून निघून जाण्याची धाडस सर्वच माध्यम प्रतिनिधींनी दाखवले होते. आताही तसे धाडस माध्यम प्रतिनिधींनी का दाखवले नाही, हा खरा प्रश्न आहे. एकीकडे जिभेचा त्रास होतो म्हणून न पटणारा खुलासा करायचा त्याचवेळी अन्यत्र बोलताना स्वतःच्या कृत्याचे समर्थन करायचे, अशी दुतोंडी वागणूक राऊत यांची आहे. राऊत हे स्वतःला शरद पवार यांचे अनुयायी मानतात. ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रवक्ते असले, तरी ते पवार यांनाच आपला आदर्श मानतात, तसे त्यांनी जाहीरपणे अनेकवेळा बोलून दाखवले आहे.अशावेळी पवार यांनी तरी आपल्या राजकीय ज्येष्ठतेचा वापर राऊत यांना धाक घालण्यासाठी करायला हवा होता. पवार यांनी राऊत यांचे कान पकडून त्यांना शहाणपण शिकवण्याची गरज असताना, त्यांनी नेहमीप्रमाणेच हाताची घडी घातलेली आहे. चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता पणाला लागलेली असताना, पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने घेतलेली भूमिका त्यांना न शोभणारी अशीच आहे.