गो. नी. दांडेकर : एक कलंदर व्यक्तिमत्त्व

    03-Jun-2023   
Total Views |
Article On G N Dandekar Marathi Literature

नुकतीच गोनीदांची (गोपाल नीलकंठ दांडेकरांची) २५वी पुण्यतिथी झाली. या औचित्याने हा दिवस ’दुर्गदिन’ म्हणूनही ओळखला जातो. परंतु, गोनीदांची ओळख तेवढीच आहे का? दांडेकरांनी दुर्गभ्रमंतीसोबतच चरित्रे लिहिली, प्रवासवर्णने, कादंबर्‍या, स्थळवर्णने, आध्यात्मिक-धार्मिक लेखन, चित्रपट लेखन केले. गाडगे बाबांची संगत, संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य असा मोठा लेखाजोखा आहे. त्यांच्या आयुष्याचा परामर्श घेताना, प्रत्येक विषयाच्या एकएका साहित्यकृतीची काढलेली ही टिपणे...

गोनीदा म्हणजे केवळ लेखक नव्हे, खरंतर मस्त फकीर! आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारे बहुरंगी, बहुढंगी, स्वच्छंद व्यक्तिमत्त्व. बालवयातच स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याच्या इर्ष्येने घर सोडलं आणि हा देश पाहण्याच्या ओढीने महाराष्ट्रभर भ्रमण केलं. तळकोकण आणि सह्याद्रीचे सौंदर्य त्यांच्या नसानसात भिनलं आहे. सह्याद्रीचा रांगडेपणा आणि कोकणातील हिरवीकंच नव्हाळी त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत असते. त्यांचा जन्म विदर्भातला. एका शाळा शिक्षकाच्या घरात परतवाडा येथे ते जन्मले. वयाच्या १२व्या वर्षी सातवीतून शाळा सोडून संत गाडगेबाबांच्या सान्निध्यात आले. त्यांच्याच उपदेशाने गावोगाव भटकंती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्ञानेश्वरी, वेदांचा अभ्यास करून भारत स्वतंत्र झाला, तेव्हा लेखन करून त्यावर उदरनिर्वाह करण्यास त्यांनी प्रारंभ केला. प्रसंगी, पाच घरचं मागून, वर लावून ते जेवले. झाडाखाली, दगड उशाला घेऊन आकाश निरखत झोपले. परिक्रमा केली, दुर्गभ्रमंती केली आणि संसारही केला!

अनुभव विश्व आणि लेखन

कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा अनेक साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. गोनीदांचं लिखाण अस्सल आहे. समाजात घडणार्‍या घडामोडींवरची प्रतिक्रिया नाही, तो अनुभवसंपन्न आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा आहे. त्यांची वेदनाही अस्सल आणि आणि विचारही नवा आहे. त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे केवळ मनोरंजनासाठी पानं उलटणं नव्हे, तर प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा विषय असतो. जन्मजात मिळालेल्या प्रतिभेमुळे हाती घेतील, तो विषय उत्कृष्टपणे मांडण्याची सिद्धहस्त कला त्यांच्याकडे आहे.

कोकण आणि ’पडघवली’

विदर्भातला जन्म असूनही गोनीदांना ओढ लागली, ती कोकणाची! एखाद्या भागाचे देशाचे वर्णन करताना ते त्याची ओळख पहिले निसर्गसौंदर्याने करतात. त्या भूभागाशी आपण समरस होतो न होतो, त्याचवेळी ते इतर भौगोलिक परिस्थितीची माहिती देतात, बागा, तळी, नदी, शेतं, यातून तिथला माणूस किती समृद्ध आहे, याची आपल्याला कल्पना येते. पुढे सुरू होते, तिथल्या माणसांची ओळख. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे गुण-दोष, स्थानिकांच्या अडचणी, आणि मग त्यांची मानसिकता. यातून आपण त्या पात्राशी स्वतःला जोडून घेतो. मग पुस्तकांचा आणि आपला प्रवास एकत्र सुरू राहतो. कोकणाचं वर्णन करणारी त्यांची अनेक पुस्तके आहेत, त्यातच ’शितू’ आणि ’पडघवली’ ही दोन कायम लक्षात राहण्यासारखी.

यात ते केवळ वर्णनात्मक न लिहिता तेथील समाजव्यवस्थेचा एकेक पापुद्रा उलगडून दाखवतात. ग्रामीण स्त्रीच्या आयुष्यावर लिहिताना त्यांनी तिच्या तनामनाच्या, क्षुधातृष्णांचा विचार केला आहे. तेच सामर्थ्य आणि वृत्ती मांडताना त्यांचा मानसशास्त्राबद्दलचा अभ्यासही दिसून येतो. ‘पडघवली’ सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रतिनिधी आहे, असं ते स्वतः म्हणतात. एका विकासोत्सुक पण, मर्म हरवत जाणार्‍या खेड्याची ही कथा. आज ओस पडणारी खेडी, ढासळत चाललेली समाजव्यवस्था, मूल्यांचा होणारा र्‍हास, उद्ध्वस्त होत चाललेली ग्रामसंस्कृती पाहिली की, ’पडघवली’ हटकून आठवते. आपल्या डोळ्यासमोर भरत गेलेलं खेड आणि त्यानंतर शहरीकरणाच्या बरोबरीने येऊ पाहणारं स्वार्थी मनोवृत्तीचं आक्रमण पाहून आपण व्यथित होतो. १०५५ साली लिहिलेली ही कादंबरी काळाच्या पुढचं पाहणारी आहे.

इतिहास भ्रमंती (दुर्गभ्रमणगाथा)

चित्रपाषाणांचा त्यांचा संग्रह होता. त्यातूनच त्यांची सौंदर्यासक्ती दिसून येते. रंगीबेरंगी दगड, स्फटिकासारखे असंख्य पैलू असणारे शुभ्र आणि पारदर्शक दगड, गुलाबी-जांभळी छटा असणारे दगड त्यांनी जमवले होते. सह्याद्रीत दुर्गभ्रमंती करताना जमवलेला हा खजिना आणि पाहिलेलं दृष्टिवैभव मूर्त रूपाने साकारलंय, ते दुर्गभ्रमणगाथेत. उणेपुरे १७-१८ किल्ले यात आहेत. त्यातही राजगडाविषयीचं जास्त लिहिलंय. किल्ले लिहिताना ते त्या किल्ल्यावरची वनसंपदा, वृक्षवल्ली, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल सुद्धा ते सांगतात. किल्ल्यावर वस्ती असेल, तर त्या माणसांविषयी ते न चुकता लिहितात. हा किल्ला कोणत्या काळात, कसा कसा बदलत गेला, हे सांगताना त्याचे वास्तुरचनाशास्त्र, राजकीयद़ृष्ट्या, संरक्षणद़ृष्ट्या त्याचे महत्त्व, अशा अनेक मुद्द्यांचा सखोल अभ्यासपूर्व लेख ते लिहितात.

किल्ल्यावर बसून घालवलेल्या चांदण्या रात्री, सूर्यास्ताच्या वेळी कड्यावरून दिसणारं खालचं हिरवं चमचमतं तळकोकण वाचताना मोह पडतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार अशा या देशातल्या संपन्न राजवटींनी हे किल्ले बांधले, वापरले आहेत. मात्र, जवळजवळ सर्वच किल्ल्यांचं आज दिसणारं रूप हे शिवकाळातलंच. या इतिहासाची आठवण करून देतात गोनीदा! त्यांनी जवळपास ५० वर्षें दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. ’दुर्गदर्शन’, ’किल्ले’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’त्या तिथे रुखातळी’, ’वाघरू’, आणि ’माचीवरला बुधा’ या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. आज जे ट्रेकिंगच्या नावाखाली सह्याद्री पिसणं सुरू आहे, ती आवड गोनीदांनी मराठी माणसाला लावली. खर्‍या अर्थाने ऐतिहासिक वैभव उघड केलं. माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले.

आत्मचरित्र स्मरणगाथा आणि कुणा एकाची भ्रमणगाथा

स्मरणगाथेमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक काळकोपरे उजेडात आणले. गाडगेबाबांचा सहवास, ज्ञानेश्वरीचे वाचन-पठण, महाराष्ट्र भ्रमंती, परिक्रमा आणि पोटाचे हाल सगळंच. कुणा एकाची भ्रमणगाथा नर्मदा परिक्रमेवरच आहे. खरंतर त्यांचं प्रत्येक पुस्तकं आत्मचरित्र असल्यासारखंच वाटतं. यात त्यांना कोण एक यशोदा भेटते आणि मग बस्स. पूर्ण परिक्रमेत तिचा उल्लेख नाही आला, तरी ती असते. दीड पानांत संपलेली ही कन्या आपल्याला पुस्तकभर पुरते. पुस्तक जसं जसं पुढे सरकतं, तसं मुग्ध व्हायच्या वेळा अनेक येतात. वाचता वाचता पुस्तक आणि डोळे दोन्ही मिटून आपण काही क्षण मनन करतो.

धार्मिक/पौराणिक (दास डोंगरी राहतो)

घरातून पलायन केल्यानंतर लाभलेली संत गाडगेबाबांची सांगत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. कीर्तने, निरूपणांचा छंद लागला, महाराष्ट्र भ्रमंतीमुळे ज्ञानेश्वरी, वेद अशा पौराणिक साहित्याशी जवळून संबंध आला. दुर्गभ्रमंती आणि अनेक गुण त्यांचे मिळतेजुळते आहेत, ते समर्थ रामदासांशी. त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलं. रामदास आणि त्यायोगे छत्रपती शिवाजी महाराज, निसर्ग, वनस्पती, तत्कालीन समाजव्यवस्था, गावं वसायच्या पद्धती सगळं सगळं यात दिसतं. रामदासांनी केलेलं कार्य आणि घडवून आणलेली निशस्त्र क्रांती यातून स्पष्ट होते. रामदासांचे संघटन, बलोपासना आणि भक्ती हे गुण त्यांचे चरित्र वाचताना अधोरेखित होतात.

समर्थ रामदासांनी प्रसंगी चालत, नद्या पोहून पार करत त्यांचे मार्गक्रमण चालू होते. या काळात त्यांनी परकीयांनी आपल्यावर केलेली आक्रमणे पाहिली. त्या मूठभर परधर्मीयांचा या मोठ्या लोकसंख्येवर असलेला वचक त्यांनी पाहिला. आपल्याकडची मातीत कष्टाची कामे करून सशक्त व काटक माणसे मात्र, संख्येने जास्त असूनही या अधिकार्‍यांसमोर घरात लपून राहू लागली. हे पाहून सुराज्य स्थापन व्हावे व ती जबाबदारी एका कुणाची नव्हे, हे त्यांना उमगले होते.

आपले देव म्हणजे मूर्तिमंत शक्ती, बुद्धी, कला व समृद्धीची प्रतीके आहेत. ती सामर्थ्य प्रदान करतात. स्वावलंबित्व शिकवतात. आत्मनिर्भर कसं व्हावं, हे सांगतात. म्हणून त्यांनी गावागावातून लहान मुले, उद्याच्या उज्ज्वल भविष्यातले तरुण गोळा केले आणि त्यांना बलोपासना करावयास सांगितली. संघटनाचे महत्त्व त्यांना कळले होते. त्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन मारुतीरायाची स्थापना केली. बलोपासनेच्या माध्यमातून शाखा स्थापन केल्या. कोल्हापूर, सातारा भागात यांनी एकूण ११ मारुती मंदिराची स्थापना केली. एका अर्थी शाखेत न गेलेले ते स्वयंसेवकच. ‘मृण्मयी’बद्दल काय बोलू? म्हण्टलं, तर ती प्रेमकथा आहे, म्हंटलं तर आध्यात्माकडे जाणारी मीरेची कथा, त्यात प्रवासवर्णन आहे, स्थळवर्णन, स्त्री-पुरूष मानसिकतेची सामाजिक जडणघडण आहे.

चित्रपट ’जैत रे जैत’

त्यांनी चित्रपट लेखन देखील केलं. अत्यंत गाजलेला चित्रपट. जीत झाली, असाध्य ते साध्य झालं. भरभक्कम मोल मोजून. पण, नफा किती आणि किती तोटा? आपली राणी गमावून राणीमाशीचा मृत्यू घडवून आणला. त्या पुरुषाच्या त्यावेळेच्या बेधुंद ढोल बडवण्यामागच्या भावना काय, हे आजही कोणीही छातीठोकपणे समजावू शकत नाही. या चित्रपटाला इतकं प्रेम मिळालं ते म्हणूनच. दोहोबाजूंना न्याय द्यावा, मनाची उकल उलगडू नये, ज्याचे त्याचे अर्थ ज्याने त्याने घ्यावेत, अशा रहस्यमय वळणावर चित्रपट सोडून दिला.

गो. नी. दांडेकर १०८१ साली अकोला येथे भरलेल्या ’अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक ’स्मरणगाथा’ला १०७७ मध्ये ’साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला. तसेच, पुणे विद्यापीठाने ३० डिसेंबर १००२ रोजी सन्माननीय ’डी. लिट.’ पदवी त्यांना दिली. १००१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ’महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने ’नगरभूषण’, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ’साहित्य वाचस्पती’ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय, नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ’नानासाहेब नारळकर ’पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ’दुर्गप्रेमी ’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.