पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
29-Jun-2023
Total Views |
वाडा : संततधार पाऊस ,अतिवृष्टी व पुरपरिस्थीत झाडे कोसळल्याने तुटलेल्या तारा, शार्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता जास्त असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीज यंत्रणांपासून सतर्क रहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच, अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहीत्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येतो अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे ही आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, फिडर पिलर, रोहीत्रांचे लोखंडी कुंपण, फ्युज बॉक्स, स्वीचबोर्ड आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता जास्त असते. पाणी हे वीजेचे वाहक असल्याने वीज प्रवाह असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करून सावध रहावे. तुटलेल्या तारांना हात लावणे किंवा हटविण्याचा प्रयत्न करु नये. असा प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.