संघाच्या सेवाभावी विचाराने भारलेले पोपट माने तब्बल २८ वर्षे अविरतपणे पुण्यातील एका झोपडपट्टीमधील मुलांच्या शिक्षण, कौशल्य, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक सक्षमतेसाठी काम करीत आहेत. त्यांच्याविषयी...
पोपट माने यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या तिरकवाडी नावाच्या गावात झाला. भटक्या-विमुक्त जमातीमधील कैकाडी समाजात जन्माला आलेल्या माने यांच्या नशिबीदेखील तेच जगणे आले. घरात अठराविश्व दारिद्य्र... राहायला नीट घर नाही की जगायला नीट साधनं नाही. आईवडील मिळेल त्या मजुरीवर काम करुन मुलांचे भरणपोषण करीत होते. आईची जिद्द होती की मुलांनी शिकावे. बांबू-चटईच्या त्या मळकट-कळकट झोपडीमधून त्यांना शाळा दिसायची. पोपट यांना शाळेत घातलं. सुदैवाने जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक चांगले मिळाले. १९७२ साली दुष्काळ पडल्यावर बलुतेदारीप्रमाणे प्रसंगी गावागावांमधून भाकरी मागून खाण्याची वेळ आली. उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवायला सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण फलटण येथे केले. सातारा येथे भटके-विमुक्तांच्या आश्रमशाळेत नोकरी आणि दूरशिक्षण असा क्रम सुरू झाला. ‘बीए’ झाल्यानंतर ते पुण्यातील भोसरी येथील एका कंपनीत कामावर रुजू झाले.
दरम्यान, ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या गरवारे महाविद्यालयात नोकरी मिळाली. मूळचे फलटण येथील साखरवाडी येथील स्वयंसेवक असलेले अनिलजी ढेकणे, त्यांच्या पत्नी यांनी पोपट यांना प्रेमाने वागविले. या संस्थेवर संघाचे स्वयंसेवक काम करीत असल्याने त्यांना येथील शिस्त, वातावरण, त्यातील मोकळेपणा जाणवू लागला. त्यांचे दोन सहकारी अनिल शिंदे आणि गोपाळ परदेशी हे संघ स्वयंसेवक होते. ते भवानी पेठेतील शाखेमध्ये जात होते. पोपट हे त्यावेळी गुलटेकडीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. तेसुद्धा भवानी पेठेत शाखेत जाऊ लागले. दरम्यान, वसाहतीजवळील टिमवि कॉलनी येथे लागणार्या शाखेमध्ये ते जाऊ लागले. तेथे त्यांची वसंतराव खरे, शरदराव कामतेकर, अरुणराव घाटपांडे (हुतात्मा राजगुरु यांचे भाचे), परब, आगरकरजी, भाऊ लिमये आदी स्वयंसेवकांशी ओळख झाली. इथे कोणीही समाज, वर्ग कशाबद्दलही काहीही विचार करीत नव्हता. ‘हिंदू सारा एक’ याच भावनेने सर्वजण एकत्र येत होते. हे पाहून ते भारावून गेले.
प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक प्रभात शाखेमध्ये सेवा वस्ती जोडून घ्यावी, असा संदेश दिलेला होता. त्याच विचाराने टीमवि प्रभात शाखेने शेजारच्या झोपडपट्टीत सेवाकार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ स्वयंसेवक असलेल्या वसंतराव खरे यांनी पुढाकार घेतला. पोपट माने यांना सोबत घेऊन वस्तीतील मुलांसाठी सुरुवातीला शैक्षणिक साहित्य वाटप, त्यानंतर अभ्यासिका व संस्कार वर्ग सुरू करण्यात आला. कॉलनीमध्येच असलेल्या एका शाळेत हे वर्ग भरू लागले. मुलांचा अभ्यास आणि संस्कारक्षम गोष्टी, विविध श्लोक शिकवणे सुरू झाले. वस्तीतील मुले शाखेत येऊ लागली. त्यातून स्वयंसेवक घडू लागले. संघाचे प्रत्यक्ष काम करू लागले. पोपट माने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करीत होते. त्यांनीदेखील संघाचे द्वितीय वर्षापर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण केले. झोपडपट्टीमधील मुले शिकावित, संस्कारित व्हावीत, त्यांना विविध कौशल्य प्राप्त व्हावीत, याकरिता खरे यांच्या सोबतीने पोपट माने खंबीरपणाने काम करीत होते. झोपडपट्टीत संघाच्या कामाला होत असलेला विरोध, संघाबद्दलच्या पारंपरिक समजुती याला न जुमानता ते काम करीत राहिले. संघ विचाराने झपाटलेला हा कार्यकर्ता दररोज विरोधकांना तोंड देत होता. त्यांना तत्कालीन सहसरकार्यवाह हो. वे. शेषाद्रीजी, पद्मश्री दादा इदाते आदी कार्यकर्त्यांचा संपर्क लाभला. शेषाद्रीजी त्यांच्या झोपडपट्टीतील घरात येऊन जेवण करून गेले. त्यांनी या अभ्यासिकेला संत नारायण गुरू यांचे नाव दिले.
झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण-संस्कार देण्याचा पोपट यांचा कायमच प्रयत्न राहिला. सेवाकार्यात मागील २८ वर्षांपासून त्यांनी वाहून घेतले आहे. संघाच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या सेवाकार्यामधून आलेली मुले शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. अनेक मुले उच्चशिक्षित झाली आहेत. काही सीए आहेत, अकाऊंटंट आहेत, तर काही उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मुलांच्या पालकांना सावकारी कर्ज घ्यावे लागू नये, म्हणून संचयनी, बचत गट सुरू करण्यात आले. पालकांच्या सहली नेऊन त्यांनाही संघाची ओळख करून देण्यात आली. गणेशोत्सव काळात हीच मुले विविध गणेश मंडळांमध्ये आरती आणि अथर्वशीर्ष पठण करतात. तेही अगदी अस्खलित संस्कृतमध्ये. वसंतराव खरे आणि पोपट माने या जोडगोळीने दलित वस्तीमध्ये हा आमूलाग्र बदल घडविला. ‘कोविड’काळात दुर्दैवाने खरे यांचे निधन झाले. परंतु, पोपट यांनी हे सेवाकार्य सुरू ठेवलेले आहे. ’सब समाज को साथ लिए जाना है, भारत मा का स्वप्न पुरा करना है’ या उक्तीप्रमाणे अखंड कार्यरत असलेल्या पोपट माने यांना पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा!