अवलिया निलेश गोपनारायण!

    28-Jun-2023   
Total Views | 514
Article On Theatre Artist Nilesh GopnarayanB

एकांकिका आणि दोन अंकी नाटकातून प्रायोगिक रंगभूमीशी नाळ जोडलेला, तसेच रंगभूमीवरील ‘अलबत्या गलबत्या’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारणार्‍या निलेश गोपनारायण यांच्याविषयी...

रत्नाकर मतकरी लिखित आणि राहुल भंडारे निर्मित ’अलबत्या गलबत्या’ या सुप्रसिद्ध नाटकातील चिंची चेटकीण आजही अनेक लहान मुलांची आवडती व्यक्तिरेखा. पण, काही दिवसांपूर्वी या चिंची चेटकिणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांनी नाटकातून ‘एक्झिट’ घेतली आणि ही भूमिका आता एक नवीन कलाकार करणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली. ती चिंची चेटकीण नव्याने रंगभूमीवर साकारणारा अवलिया म्हणजे निलेश गोपनारायण.

निलेश गोपनारायण यांचा जन्म वसईत एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. निलेश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आर. पी. वाघ हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर निलेश यांनी न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. मात्र, त्यावेळी नाटकवेडापायी विज्ञान शाखेत मन न लागल्याने निलेश यांनी कला शाखेत सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.

तसं पाहायला गेलं, तर निलेश यांच्या कुटुंबात कोणीही नाट्यक्षेत्रात नाही. मात्र, एकदा निलेश यांच्या शाळेत नाट्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांची निवड सुरू होती. त्यावेळी वडिलांना नाट्य स्पर्धेत भाग घेऊ का? असे निलेश यांनी विचारले. त्यावेळी वडिलांनी त्यांना परवानगीही दिली. त्यामुळे तिथेच निलेश यांना नाटकाचं बाळकडू मिळालं. मग पुढे शाळेतून बालनाट्य स्पर्धांमध्ये निलेश सहभागी होऊ लागले. त्यानंतर महाविद्यालयात असताना मुंबई विद्यापीठाचा ‘युवा महोत्सव’, ‘आयएनटी’, ‘ईप्टा’सारख्या अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये निलेश सहभागी होऊन अभिनयामुळे पारितोषिके मिळवू लागले. या काळात विश्वास सोहनी, विलास देसाई, संजय परब यांसारखे गुरूवर्य लाभल्याचे निलेश आवर्जून सांगतात.

यावेळी निलेश पुढे जाऊन नाट्य क्षेत्रातचं करिअर करतील, याची कुटुंबीयांना कल्पना नव्हती. परंतु, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे निलेश यांचे पाय घरी कमी आणि रंगभूमीवरील नाटकांच्या कामात जास्त वेळ दिसू लागले. मात्र, तरीही कुटुंबाने निलेश यांच्या नाटकवेडाला विरोध केला. त्यावेळी निलेश यांनी काही महिने पोस्ट ऑफिसमध्ये कामसुद्धा केलं; पण त्याच दिवसांमध्ये नाट्य स्पर्धांमध्ये निलेश यांना मिळणारी पारितोषिके आणि नाटकासाठीची धडपड पाहून कुटुंबाचा विरोधाचा सूर ओसरला. मग निलेश यांनी पूर्णवेळ नाटक करण्याचं ठरवलं. दरम्यान गुरूवर्य संजय परब यांनी दिलेला सल्ला निलेश सांगताना म्हणतात, “कोणीच कोणाला नाटक शिकवू शकतं नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीप्रमाणे दिग्दर्शकांचे म्हणणं समजून घेत नाटक शिकलं पाहिजे.”

त्यामुळे दिग्दर्शकांचे विचार समजून घेत असताना निलेश यांना स्वतःचा विचार मांडण्यासाठी दिग्दर्शन आणि लेखन या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या. मग निलेश स्वतः दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. विवा महाविद्यालय, सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, मिठीभाई महाविद्यालय, एन. एम. कॉलेज, खालसा कॉलेज अशा अनेक महाविद्यालयांत निलेश यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आणि स्वतःच्या भावविश्वातील गोष्टी ते नाट्यरसिकांपुढे मांडू लागले. त्यादरम्यान, निलेश यांना मुंबई विद्यापीठाच्या ‘नॅशनल युथ फेस्टिवल’साठी दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत निलेश यांनी दहा वर्ष मुंबई विद्यापीठात दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि अनेक पारितोषिके विद्यापीठाला मिळवून दिली. आतापर्यंत निलेश यांनी २००हून अधिक एकांकिकांमध्ये दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, लेखन अशा नानाविध भूमिका निभावल्या. त्यामुळे निलेश सांगतात की, “एखादे ध्येय साध्य करण्यासाठी आपण मनापासून झटलो, तर एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं. त्यामुळे सहनशीलता, चिकाटी, प्रयत्न माणसांने कधीही सोडू नये.“

आता काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत निलेश यांनी ’नात्याची गोष्ट’ या दोन अंकी नाटकात दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले. त्या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक निलेश यांना मिळाले. त्याच नाटकातील निलेश यांचा अभिनय पाहून त्यांना सुप्रसिद्ध ’अलबत्या गलबत्या’ या नाटकातील चिंची चेटकिणीची मुख्य भूमिका निर्माते राहुल भंडारे यांच्यामुळे मिळाली. आतापर्यंत निलेश यांनी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे दीडशेहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांच्या याच नाट्य क्षेत्रातील कामाची दखल घेत ठाण्यातील ‘गंधार संस्थे’तर्फे ‘गुणगौरव पुरस्कार’ निलेश यांना मिळाला. दरम्यान, निलेश यांनी ‘लॉकडाऊन’मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण देणारी संस्था वसईमध्ये ’हिरा आर्ट अकॅडमी’च्या रुपाने सुरू केली आहे. तसेच, भविष्यात याच अकॅडमीच्या माध्यमातून चित्रपट, वेबसिरीज, नाटक या क्षेत्रात नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणार असल्याचे निलेश सांगतात. तरी त्यांच्या भावी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121