नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. जिथे ते राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे गोवा, बिहार आणि झारखंडला प्रथमच वंदे भारत ट्रेनची जोडणी मिळणार आहे.तसेच पंतप्रधान राज्यात राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मिशनचा शुभारंभ करतील. यासोबतच ते शहडोल जिल्ह्यातील पकारिया गावाला भेट देऊन गावातील विविध संबंधितांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी पीएम मोदींच्या हस्ते राज्यभरातील सुमारे ३.५७ कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण सुरू करण्याची योजना आहे. राणी दुर्गावती गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते राणी दुर्गावतीचा सन्मान करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान पकारिया गावात सांस्कृतिक कार्यक्रम पाहतील आणि रात्रीचे जेवणही करतील.
राणी कमलापती-जबलपूर, राणी कमलापती-इंदूर, केएसआर बेंगळुरू-धारवाड, पाटणा-रांची आणि मुंबई सीएसएमटी-मडगाव या मार्गावर पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. दोन शहरांमधील प्रवासादरम्यान ही ट्रेन नरसिंगपूर, पिपरिया आणि नर्मदापुरम या तीन स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन ४.३० तासात ३३१ किमी अंतर कापेल.