मुंबई : मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेल, यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो, असे म्हणतानाच इतिहास हाच आहे की, शरद पवार हे ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने जे केले ती बेईमानी कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उपस्थित केला.
दि. २५ जून रोजी चंद्रपूर येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत असतील, त्यामुळे त्यांना इतिहास ठावूक नसेल, असे म्हटले होते. त्याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. १९७७ मध्ये आपण प्राथमिक शिक्षणच घेत होतो. पण, मी काल जे बोललो, जे एकतर पवारांनी पूर्णपणे ऐकले नाही किंवा ते शरद पवारांना अस्वस्थ करणारे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच, १९७८ मध्ये ते वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. तेव्हा ते ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी आमच्यासोबत सरकार सरकार स्थापन केले. कालही आपण हेच सांगितले होते. ते आमच्यासोबत म्हणजे जनसंघासोबत आले, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, राष्ट्रवादीत ओबीसी नेते नाहीत, असे मी म्हटले नसून राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि संवैधानिक पदे द्यायची वेळ आली की त्यांना ओबीसी दिसत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. राष्ट्रवादीचे नेते खाजगीत जे बोलतात तेच मी जाहीरपणे बोललो, ते कदाचित पवारांना आवडले नसेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिका अधिकार्यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की, कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्यावर आम्ही कारवाई करु, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताला राजकीय स्वातंत्र हे १५ ऑगस्ट १९४७ रोजीच मिळाले, हे सत्य आहे. पण, अखंड भारत हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे, असे फडणवीस म्हणाले. पण, अखंड भारताचे स्वप्न पाहणार्यांनाही स्वातंत्र्यांची तारीख बदलता येणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ हा औरंगजेबाने केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. धर्म बदलण्यासाठी दबाव आल्यानंतर त्यांनी अत्याचार सहन केले पण, त्यांनी ती मागणी मान्य केली नाही. हा इतिहास उभ्या जगाला माहिती आहे, तो बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.