बंडानंतर ठाकरेंना सुचले शहाणपण!

आदित्य ठाकरेंनी घेतली सुरज चव्हाणांची भेट!

    22-Jun-2023
Total Views |

Aditya Thackeray 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेने दिलेल्या कोविड काळातील कामांमधील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावरून ईडीने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांची ईडीने बुधवारी कसून चौकशी केली असून तब्बल १७ तासांच्या धाडीत ईडीने अनेक गोष्टींचा उहापोह केल्याचे समजते आहे. ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी गुरुवारी चव्हाण यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. कधीकाळी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणारे ठाकरे आता शिंदेंनी केलेल्या बंडानंतर थेट कार्यकर्त्यांच्या घरी जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे बंडानंतर ठाकरेंना सुचलेले हे एक प्रकारचे शहाणपणच म्हणावे लागेल.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन केलेल्या बंडाच्या धक्क्यातून उद्धव ठाकरे आणि इतर मंडळी आता सावरली आहेत. आपल्या एकनिष्ठ कार्यकर्ते, आमदार खासदारांवर कारवाईची टांगती तलवार लटकत असताना ठाकरेंनी त्यांच्याकडे ढुंकूनही पहिले नव्हते. पर्यायाने ठाकरेंना सोडून ही मंडळी शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबत युती करून मोकळी झाली. या घटनेनंतर ठाकरेंना कार्यकर्त्यांची किंमत समजली असून कधीकाळी शिवसैनिकांकडे दुर्लक्ष करणारे ठाकरे आता त्यांच्या घरी जाताना दिसत आहेत. कोविड काळातील कामांमधील भ्रष्टाचारावरून ईडीच्या रडारवर आलेल्या सूरज चव्हाणांची आदित्य यांनी भेट घेतली. या भेटीमुळे काही जुन्या शिवसैनिकांना ठाकरेंनी कशी वागणूक दिली याचे संदर्भ पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्याचे पाहायला मिळाले.
 
 
प्रमुख नेत्यांवरील कारवाईवर मातोश्रीचा कानाडोळा
 
वर्षभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय शिवसेनेतील ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी घेतला होता. पक्षनेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडून होणारे दुर्लक्ष, पक्षच्या आमदार, खासदार आणि पदाधिकार्यांमागे लागलेला चौकशीचा ससेमिरा, अडीअडचणींमध्ये नेतृत्वाने साथ न देणे यासारख्या अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेत प्रचंड मोठी नाराजी होती. खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, आमदार राजन साळवी यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांना तपास संस्थांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, यापैकी कुणालाही मातोश्रीवर बोलावून अथवा त्यांच्याशी संवाद साधून कारवाईबद्दल विचारपूस करण्याची तसदी ठाकरेंनी घेतली नव्हती. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि कधीकाळी मातोश्रीचे अत्यंत जवळचे समजले जाणारे यशवंत जाधव ईडीच्या फेऱ्यात अडकलेले असताना त्यांना मातोश्रीने दिलेली वागणूक जगजाहीर आहे. त्यामुळे कधीकाळी कार्यकर्ते संकटात असताना त्यांच्याशी बोलण्याचे कष्ट न घेणारे ठाकरे आज मात्र त्यांच्या घरी जाऊन चौकशी करता असल्याचे चित्र दिसत आहे.