रथयात्रेवर पोलिसांनी निर्बंध लादणे म्हणजे धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप
कोलकाता उच्च न्यायालयाचे बंगाल पोलिसांवर ताशेरे
20-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली : जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान पश्चिम बंगालमधील हावडा येथील संकरेलमध्ये रथ यात्रेस परवानगी न दिल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलिसांनी घातलेल्या अटी धार्मिक प्रथेमध्ये हस्तक्षेप केल्यासारख्या आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांनी संबंधित याचिकेवर सुनावणी केली. यावेळी ते म्हणाले, अनेक दशके आणि शतके, या राज्यात सर्व धार्मिक संप्रदायातील लोक आनंदाने सहभागी झाले आहेत आणि. त्यांनी सक्रियपणे रथयात्रेला पाठिंबा दिला आहे. रथयात्रेवर निर्बंध घालणे आणि त्यासाठी अटी लादणे हे या राज्यात किंवा देशाच्या इतर कोणत्याही भागात आजपर्यंत घडलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले.
भक्तांच्या श्रद्धेनुसार देवता म्हणजे रथावरून प्रवास करणे होय आणि भारतात अशी प्रथा हजारो वर्षांपासून पाळली जाते.लोककथा आणि पौराणिक कथांप्रमाणे रथयात्रा म्हणजे देवता भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांना त्यांच्या घरातून त्यांच्या बहिणीच्या घरी/मावशीच्या घरी जाण्यासाठी आणि आजारी असलेल्या मावशीला भेटण्यासाठी रथावर प्रवास करणे. त्यामुळे यात्रेदरम्यान ३०० मीटरपर्यंत देवतेने रथाशिवाय प्रवास केला पाहिजे असा आदेश देणे अत्यंत अयोग्य आहे. यामुळे रथयात्रेचा उद्देश आणि नाकारला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
धार्मिक कार्यात व्यत्ययाचा हेतू तपासा
धार्मिक कार्यात व्यत्यय आणण्याचा हेतू निहित स्वार्थ किंवा घटक असण्याची शक्यता असू शकते का, याचा तपास करावा. तसे असल्यास पोलिसांनी त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक आणि कठोर प्रक्रियात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे निर्देशही कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत.