... म्हणुन उध्दव ठाकरेंना केला अखेरचा 'जय महाराष्ट्र'. मनिषा कायंदेंनी सांगितलं कारण!
19-Jun-2023
Total Views | 385
मुंबई : आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. १८ जून रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर १९ मे रोजी कायंदेंनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे गट सोडण्याची कारणे सांगितली. अधिकृत शिवसेना ही शिंदेंचीच आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. असं मनीषा कायंदे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, "गेली १० वर्ष मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत शिवसेना ही शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. मी पहिल्यांदा मतदान शिवसेनेला केलं. मी भाजपात होते, तरी काम सेनेसाठी केलं. गेली ३ वर्ष महाविकास आघाडी होती. आम्ही उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. जुन्या लोकांना कधीच महाविकास आघाडी आवडली नाही. काही गोष्टी आवडत नव्हत्या."
"संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. पक्षाने मला मान-सन्मान दिली. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची भूमिका, विचारधारा भरकटत आहे. माझी अजून १ वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगलं पद द्या. एवढीच मागणी केली. मला औरंगाबादमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एका ज्युनियरला डोक्यावर बसवलं. आम्हाला नव्या लोकांबद्दल हेवा नाही. जळण्याचा काहीच विषय नाही. आम्ही देखील पक्षात काम केलं आहे. मी सुषमा अंधारे यांच्यासोबत देखील यात्रेत सहभागी झाले होते. पण, त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या, ती गोष्ट पक्षासाठी चांगली नाही. देवी-देवतांबद्दल त्यांनी काय विधान केली आहेत, त्या गोष्टी किती संभाळून घ्यायच्या. पक्षाचा डीएनए बदलायला लागला आहे." अशी भुमिका मनीषा कायंदे यांनी मांडली.