पुणे : जयंतराव म्हणजे ‘योजक:स्तत्र दुर्लभ:’ या व्याख्येत बसणारे व्यक्तित्व होते. ते शोधक होते. तर्कशुद्ध मांडणी करणारे तत्वज्ञान जगणारे आणि कोणत्याही गोष्टीच्या मूलभूत उत्पत्तीकडे जाणारे ते व्यक्तिमत्व होते. जयंतराव कालिदासाने वर्णन केलेली संत ही संकल्पना जयंतरावांना तंतोतंत लागू पडते. प्रचारकी जीवनाचा ते आदर्श होते. अनुशासन, संघटन कौशल्य, शिस्त याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी काढले.
निमित्त होते ज्येष्ठ संघ प्रचारक तथा विज्ञान भारतीचे संघटन सचिव स्व. जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या श्रद्धांजली सभेचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित या श्रद्धांजली सभेसाठी फर्ग्युसन महाविद्यालयाचे अँफी थिएटर खचाखच भरलेले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. जयंतरावांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी पाठविलेले शोकसंदेश वाचून दाखविण्यात आले.
यावेळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदराव कुंटे म्हणाले, “जयंतराव प्रत्येक घटनेशी एकरूप व्हायचे. त्यांनी विज्ञान भारताशी जोडून काम पुढे नेले. स्वामी विवेकानंदांविषयी त्यांचा विशेष अभ्यास होता.” त्यांनी श्रद्धा व निष्ठेने आपले काम केले, तर अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, “नेमकेपणा, सातत्य, अभ्यास हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ते नेहमी ’टू द पॉईंट’ बोलायचे. प्रचारक कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते. जयंतराव हे प्रचारक 2.0 होते. सध्याच्या संघ कार्यपद्धतीमधील सर्व गुण त्यांच्यात होते. ‘टेक फॉर सेवा’ हे सर्व त्यांनी सुचविलेली संकल्पना होती. सेवा कार्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड त्यांनी दिली. ते नेहमी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेतून बघायचे.”
विज्ञान भारतीचे प्रा. आर. व्ही. कुलकर्णी यांनी, मूर्तिमंत साधेपणा म्हणजे जयंतराव. त्यांनी कार्याचा बडेजाव कधी केला नाही. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. सातत्याने अनेकांना कामासाठी प्रेरणा दिली. ‘विज्ञान भारती’च्या कामात आल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा, शिक्षणसंस्था, विज्ञानसंस्था त्यांनी जोडल्या. त्यामुळे कामाचे जाळे निर्माण केल्याचे सांगितले. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय अधिकारी शिरीष राव भेडसगावकर यांनी आपल्या प्रचारकी आयुष्यातील जयंतरावांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. संस्कृतमधील विज्ञान ग्रंथ आणि आधुनिक विज्ञान, विज्ञान जगतात काय काय सुरू आहे? याविषयी ते विश्लेषणात्मक माहिती देत असत, असे ते म्हणाले.यावेळी लीना बावडेकर यांनी आपला कौटुंबिक स्नेह आणि जिव्हाळ्याबाबत आठवणी जागवताना त्यांच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता होती असे सांगितले.पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमरकर म्हणाले की, “नवे शैक्षणिक धोरण लागू होत असताना जयंतरावांची उणीव भासत आहे. त्यांची आज सर्वाधिक आवश्यकता होती.”
विज्ञान भारतीच्या कार्यकर्त्या शर्वरी कुलकर्णी यांनी जयंतराव म्हणजे तत्वज्ञान जगणारा आणि कोणत्याही वातावरणात समरस होणारा माणूस. त्यांचा परिसस्पर्श झाल्याने अंतर्बाह्य बदलून गेल्याचे सांगितले, तर वैद्य वेंडाळे यांनी कोणत्याही क्षेत्रातील माणूस उचलून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा द्यायची हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आयुर्वेदावर त्यांचे विशेष प्रेम आपुलकी होती. आयुर्वेद काँग्रेसच्या कामात प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले म्हणाले, “माझी ‘एनसीएल’च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘कोविड’ काळातही ते मला भेटायला आले. आमच्या पहिल्याच भेटीत अर्ध्या तासाच्या बैठकीत त्यांनी मला खूप प्रभावित केले. हे असामान्य व्यक्तिमत्व असल्याची जाणीव दोन मिनिटांत झाली. त्यांच्याकडे तल्लख बुद्धिमता होती. त्यांच्याकडे मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व होते. विद्वान, तत्वज्ञानी, तत्वनिष्ठ असा हा माणूस होता. ’मी’ पेक्षा काम कोठे अशी जडणघडण झालेला कार्यकर्ता मी त्यांच्या रूपाने अनुभवला.”
जयंतरावांनी देशभरात कामासाठी जिथे जिथे प्रवास केला तिथली कुटुंब आपलीशी केली. त्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनले. आपले विज्ञान लोकांसमोर मांडून त्याबद्दल आदर निर्माण करण्याचे कार्य करण्याची प्रेरणा ते सतत देत होते. भारतीय विज्ञानालादेखील इतिहास आहे. हा इतिहास गौरवशाली सांगायला हवा, असे ते म्हणत. प्रफुल्लचंद्र रे, विवेकानंद यांच्याविषयी त्यांचा उत्तम अभ्यास होता. (शेखर मांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, विज्ञान भारती)
जयंतदादा 1989 मध्ये प्रचारक म्हणून निघाल्यानंतर पहिल्यांदाच नऊ महिने एकत्र राहण्याचा योग आला. हे दुर्भाग्य की सौभाग्य हे समजत नाही. पण, यांच्यासोबत राहण्याचे भाग्य लाभले. घरातल्या आणि शाखेचा संस्कार परिपाक म्हणूनच त्यांच्यात सेवाभाव निर्माण झालेला होता. त्यांच्यात संघाच्या थोर प्रचारकांची परंपरा आणि कार्यकर्त्यांची प्रेरणा होती.(विनायक सहस्रबुद्धे, धाकटे बंधू)
जयंतरावांच्या व्यक्तिमत्वाला खूप पदर होते. बहुगामीत्व असलेले व्यक्तिमत्व होते. उत्तुंग विचार करणारे व्यक्तिमत्व, प्रचारकी जीवन तंतोतंत जगले. त्यांचे अनुभव संपन्न जीवन होते. ते अनुशासनप्रिय होते. कार्यकर्त्यांसोबतचा व्यवहार उत्तम होता. क्षमाशीलतेने न्याय देणारे आणि संघटन कौशल्य असलेले थोर व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम पद्य गायक होते. अलिप्तपणा असूनही कधीही प्रेमाचा अभाव नव्हता. कर्तव्यप्रति कर्मठता असली तरी वागण्यात तुटकपणा नव्हता. स्नेह तसाच कायम ठेवणारे जयंतराव प्रचारक आपला वारसा पाठीमागे ठेवून गेले आहेत.(अनिरुद्ध देशपांडे, अ. भा. कार्यकारिणी सदस्य, रा. स्व. संघ)
जयंतारावांचे जाणे म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांवर वज्राघात होता. त्यांचा अपघात झाल्याची वार्ता मिळाली. त्यानंतर ते पुन्हा कामात येतील. त्यांचे सानिध्य मिळेल असे वाटत होते. पण, लाखो स्वयंसेवकांच्या प्रार्थनेनंतरही दुर्दैवाने दुःखद घटना घडली. कार्यकुशलता, मधुर स्वभाव, स्मितवदन, गायन, समर्पण, नेतृत्व कुशलता हे त्यांचे विषेश गुण होते. त्यांच्या स्मृतीस रा. स्व. संघ आणि सर्व स्वयंसेवकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. (डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक)