मुंबई : मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. शिवाय, शासनाने कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात 10,000 हजार रुपयांची वाढ करत त्यांचे वेतन 16 हजार रुपये केले आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.
सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.
मंत्रिमंडळ निर्णय :
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृह होणार
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमिनीकरिता उत्पन्न मर्यादा वाढविली
पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये; जलदगती न्यायालयांना देखील मुदतवाढ
चिमूर, शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये
अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठीच्या निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ
प्रारुप विकास योजनांसाठी विविध शहरांतील प्राधिकरणांना मुदतवाढ.