जयंतराव : देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जिवलगांच्या तुटी...

    11-Jun-2023
Total Views |
article on Jayantrao Sahasrabuddhe

(डावीकडून दुसरे सुरेंद्र तालखेडकर, तिसरे माझे बाबा, चौथे जयंतराव, सातवे स्व.मुकुंदराव कुमली, आमपाती, गारो हिल्स मेघालय)

पहिल्याच भेटीत जयंतराव इतके भावले की, कित्येक वर्षं मी त्यांना भेटत आलोय असं वाटायला लागलं. समोरच्याने कितीही रटाळ, निरुपयोगी, पाल्हाळ लावलं तरी ते शांतपणे, मनापासून ऐकून घ्यायचं; कुणी आगपाखड करत बोलत राहिला तरी त्याला पूर्ण ऐकून घ्यायचं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याला शांत करायचं, असा त्यांचा स्वभाव होता. ते कुणावर चिडलेले, संतापून काही बोललेले किंवा त्यांच्या बोलण्यातून कधी कटुता आलेली कुणी कधी बघितली नाही.


शुक्रवार, दि. २ जूनला पहाटे जयंतराव सहस्रबुद्धे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. योगायोग असा की, मी २००० साली बरोबर त्याच दिवशी जयंतरावांना पहिल्यांदा भेटलो होतो. मे २०००च्या शेवटी माझी ‘बी.एस.सी. हॉर्टिकल्चर’ची परीक्षा संपली आणि ‘रिझल्ट‘ मिळायच्या आधीच दोन दिवस मुर्डीला घरी राहून लगेच आयुष्यातल्या पहिल्या प्रचारक बैठकीला हरंगुळ बुद्रुक, लातूरच्या निवासी शाळेत पोहोचलो. प्रचारक बैठकीसाठी तयार केलेल्या व्यासपीठाच्या मागे भव्य पडदा होता आणि त्यावर समर्थ रामदासांचं वचन लिहिलेलं होतं - ‘देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जिवलगांच्या तुटी!‘ सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा! समोर तत्कालीन प्रांत प्रचारक मुकुंदराव पणशीकर आणि सह प्रांत प्रचारक सुहासराव हिरेमठ होते, बहुधा डॉ. काका कुकडे ही होते. धीरगंभीर मुकुंदराव आणि हसतमुख सुहासराव असं मिश्रण समोर असताना मागची वाक्य माझ्यात चलबिचल करून गेली.

 
आई-बाबांना आणि गावाला सोडून कधीही नं राहिल्यामुळे पडाव्या जिवलगांच्या तुटी वाचून मला अस्वस्थता आली. प्रचारक म्हणून आपण कसे टिकणार? किती काळ घर सोडून दूर राहू शकणार? अशा विचारांची डोक्यात गर्दी सुरू असताना खूप वर्षांपासून आपापल्या जिवलगांच्या तुटी पडलेले आणि तरीही आनंदात असलेले एकेक तरुण, वरिष्ठ प्रचारक तिथे भेटत गेले आणि माझी अस्वस्थता कधी संपली कळलंच नाही.अनेक प्रचारकांची नाव ऐकून होतो, त्यातलेच एक जयंतराव, त्यांना प्रत्यक्ष भेटलो. पुढचा योगायोग असा की, माझी पहिलीच नियुक्ती दक्षिण गोव्यात केपे तालुका प्रचारक म्हणून झाली आणि जयंतराव गोमंतक विभाग प्रचारक होते. त्यामुळे बैठकीच्या शेवटी गोव्यात आधीपासून असलेले आणि नवीन नियुक्त झालेले अशा प्रचारकांची एक छोटी बैठक तिथेच झाली. परिचय, गप्पाटप्पा झाल्या. डॉ. पंकज दिघे दक्षिण गोवा जिल्हा प्रचारक होते, ते आणि जयंतराव यांनी कुठे आणि कसे पोहोचा, वगैरे वगैरे सूचना दिल्या. दोघेही कमालीचे शांत आणि प्रसन्न असल्यामुळे नव्या जबाबदारीचा सगळा ताणतणाव निघून गेला.


पहिल्याच भेटीत जयंतराव इतके भावले की, कित्येक वर्षं मी त्यांना भेटत आलोय असं वाटायला लागलं. समोरच्याने कितीही रटाळ, निरुपयोगी, पाल्हाळ लावलं तरी ते शांतपणे, मनापासून ऐकून घ्यायचं; कुणी आगपाखड करत बोलत राहिला तरी त्याला पूर्ण ऐकून घ्यायचं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याला शांत करायचं, असा त्यांचा स्वभाव होता. ते कुणावर चिडलेले, संतापून काही बोललेले किंवा त्यांच्या बोलण्यातून कधी कटुता आलेली कुणी कधी बघितली नाही.गोव्यात एकच वर्ष झाल्यावर माझी २००१च्या डिचोली बैठकीत गारो हिल्स, मेघालयात बदली झाली आणि २००२ला मुकुंदराव, जयंतराव, माझे बाबा गारो हिल्सला आले. जयंतरावांनी केपे-कुडचड्याच्या अक्षरशः प्रत्येकाची मला खुशाली सांगितली आणि अनेकांनी माझ्यासाठी पाठवलेली पत्र, भेटवस्तू आठवणीने मला दिल्या, तेव्हा ते कोकण प्रांत प्रचारक होते, तरीही माझ्यासारख्या नव्या प्रचारकासाठी हे करणं, याचं मला आता फार नवल वाटतं.

पुढच्याच वर्षी २००३ साली माझे बाबा अपघातात गेले आणि गारो हिल्समध्ये मला बातमी कळून मी मुर्डीला घरी पोहोचायला पाच दिवस लागले त्यावेळीही मी मुंबईत पोहोेचून तिथून कोकणात जाईपर्यंत कुठेही अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी अनेकांना आधीच कळवून ठेवलं होतं, हे ही माझ्या कायम स्मरणात राहील.वराहमिहिराच्या दववृष्टी आणि पाऊस याच्या संबंधातल्या पर्जन्य अनुमानाच्या मॉडेलवर मी २०१४ ते २०१६ अशी सलग न वर्षं मी रोजची निरीक्षणं नोंदवली होती आणि ते जयंतरावांना समजल्यावर त्यांचा मला एक दिवस ई-मेल आला. यासंदर्भात त्यांनी मला विस्तृत रिसर्च पेपर तयार कर, तो कुठे प्रेजेंट करायचा ते मी नंतर सांगतो, असा सल्ला दिला होता. पण, २०१६ ला मी परत गुवाहाटीला राहायला गेल्यामुळे आणि तिथला पावसाचा पॅटर्न कोकणापेक्षा खूप वेगळा असल्यामुळे तो विषय कायमचा मागे पडला.चमौलीच्या ढगफुटीनंतर झालेला भीषण संहार आणि त्यावरून होणार्‍या चर्चा यावरून ‘झशपझशपपू‘ नावाच्या साईटवर ‘Climate Change or China, What caused glacier burst in Chamoli?’ असा एक लेख माझ्या वाचनात आला, तो मी जयंतरावांना ई-मेल केला. कारण, त्यांनी कधीही व्हॉट्सअ‍ॅप वापरलाच नाही. ई-मेल मिळताच मला त्यांचा फोन आला आणि आम्ही जवळजवळ पाऊणतास बोललो.

आजपर्यंत चीनच्या ‘Weaponization Of Weather Climate’ या विषयावर खूप लोकांनी चीनबद्दल अनेक शंका, शक्यता वर्तवल्या आहेत. पण, जेव्हा जयंतरावांनी याबद्दल शंका व्यक्त केली ती बघता त्यात बरंच तथ्य असावं असं वाटतं. कारण, जयंतराव ‘Conspiracy Theorist’ कधीही नव्हते, तर शुद्ध वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे होते आणि देशाच्या वैज्ञानिक जगतातल्या सर्वोच्च व्यक्तींचा त्यांच्याशी जीवंत संपर्क होता. त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना पराकोटीच्या स्पष्ट होत्या. त्यामुळे कित्येक दिग्गज शास्त्रज्ञ जयंतरावांबद्दल मोठा आदर बाळगून होते. यामुळेच भारतातील टोकाचे वातावरण बदल, सततच्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती आणि चीनची भूमिका याबद्दल भारतीय संशोधकांनी काहीतरी ठोस निष्कर्ष काढलेले असावेत, असा माझा समज होतो आहे.
 
जयंतराव नावाचा एक जाजाबोर

भूपेन हजारीकांचं एक सुंदर असमिया गाणं आहे ‘मोई एटी जाजाबोर.‘ ‘जाजाबोर‘ म्हणजे भटका! त्यात भूपेनदांनी स्वतःचं वर्णन एक ‘भटका‘ असं केलंय. त्यात त्यांनी समाजाची कशी विविध रूपं बघितली, टोकाची गरिबी ते उच्चकोटीची श्रीमंती, विविध भौगिलिक प्रदेशातली सुंदर विविधता, सांस्कृतिक भिन्नतेतली अभिन्नता याचं सुंदर वर्णन केलंय. जयंतराव मला तसेच एक ‘जाजाबोर‘ वाटले- सामान्य स्वयंसेवकाचं भावनिक संघकाम ते फॅक्टस, फिगर्स वर आधारित भारतीय वैज्ञानिक समुदाय अशा विशाल, व्यापक, टोकाच्या भिन्न क्षेत्रात सहजतेने वावरणारा आणि तरीही सगळ्यापासून अलिप्त तरीही भावनिक आणि आनंदी राहणारा जाजाबोर!अशा जयंतरावांना भावपूर्ण श्रद्धांजली!



-विनय जोशी