एक सद्गुण तारा निखळला...!

    11-Jun-2023
Total Views | 98
article on Jayant Sahasrabuddhe

कोणताही विज्ञान किंवा अन्यदेखील विषय आणि त्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नाही, असे कधीच अनुभवायला मिळाले नाही. इतक्या सुसूत्रतेत ते माहिती सांगायचे की, अगदी मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. मग स्वामी विवेकानंदांचे संगीतातले सखोल ज्ञान असेल की, ‘टेस्ला’च्या तंत्रज्ञानाची माहिती असेल.... इतका परिपूर्ण माहितीचा साठा एकावेळी कसं काय ते डोक्यात साठवून ठेवतात, याचं कौतुक असायचं.


वर्ष १९९२ किंवा ९३ असेल, गोव्यात जयंतरावांनाच भेटण्यासाठी प्रवास होता. विषय स्वाभाविक ‘ईशान्य भारत!‘ पणजीतील संघ कार्यालयात पहिल्यांदाच भेट होत होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, गेल्या गेल्या अगोदर हातपाय धुवायला सांगून, सोबत जेवणाच्या पंगतीला बसवले. गोवा विभाग प्रचारक म्हणून जबाबदारी असल्याचं कळलं. ओळखपाळख झाल्यावर, ज्या उद्देशाने भेट ठरली होती ते म्हणजे, ईशान्य भारतातील पर्यटन विषयक काही कल्पना घेऊन, पर्यटकांचे आवागमन करण्यासाठी कशा व्यवस्था निर्माण करावयास हव्यात, यावर सविस्तर चर्चा झाली. वामकुक्षी झाल्यावर लगेच दुचाकीवरून राजू सुकेरकर, रघुनंदन सामंत, सलील सावकार इत्यादींबरोबर भेट-परिचय करून देण्यासाठी स्वतः जयंतराव आले होते. हळुवार आवाजातील उमटणार्‍या प्रत्येक शब्दाच्या आपुलकीतून, मतितार्थासाहित त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा मनावर सहजपणे कधी कोरली गेली कळलंच नाही.

संघशिक्षा वर्गात आवर्तन ध्यानाची तासिका घेताना अजून एका वेगळ्या जयंतजींचा परिचय झाला. शवासनाच्या स्थितीत कानावर पडणारा प्रत्येक शब्द अंतरात्म्यात भिनभिनत होता. ते सूचना देत होते त्याप्रमाणे मेंदूसहित शरीराचा प्रत्येक अवयव आज्ञा स्वीकारून शांत निश्चल आणि ताजेतवाना होत होता. शब्दांवरील प्रभुत्व आणि त्याचे प्रसारण यावर जयंतजींची अद्भुत पकड असल्याची साक्षात अनुभूती मिळाली.त्यानंतर कालांतराने कोकण प्रांताची प्रचारक म्हणून जयंतरावांना जबाबदारी मिळाल्यावर बर्‍याच वेळा भेटीगाठी होऊ लागल्या. हळुवार आवाजातील तोच गोडवा कालपर्यंत तसाच होता. ‘मुंबई आयआयटी’मधून ‘बी टेक’ पदवी संपादन केल्यावर संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रचारक म्हणून कार्याला सुरुवात केल्याचं समजलं. प्रत्येक विषयातील तंत्रशुद्ध अभ्यास आणि ज्ञान त्यांच्याशी होणार्‍या गप्पांमधून अगदी सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा सहज उमजणारे होते. तेव्हा सातत्याने वाटायचं की, संघाने या व्यक्तीने मिळविलेल्या शिक्षणाच्या दृष्टीने जबाबदारी देण्याची नितांत गरज आहे. अनेक जणांकडे हा विषय त्यावेळेस स्पष्टपणे बोलूनही दाखवला होता.

जयंतरावांशी १९९६ ते २००६ दरम्यानच्या काळात अचानक संपर्क तुटला होता. पण, ते स्मरणातून जाणे केवळ अशक्य होते. एका शैक्षणिक संस्थेत सक्रिय असताना, विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबविताना जयंतजींची स्वाभाविक आठवण व्हायची. जेव्हा त्यांच्याकडे ‘विज्ञान भारती’ या संघटनेची ‘अखिल भारतीय संघटनमंत्री‘ म्हणून जबाबदारी आल्याचे कळलं, तेव्हा अत्यानंदच झाला होता. २०१३ रोजी ’नवनिर्मित डिजिटल मायक्रोस्कोप’ काही शाळांना वाटपाच्या निमित्ताने ‘विज्ञान विषयक स्कोप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदस्यांशी चर्चा करताना, स्वाभाविकपणे जयंत सहस्रबुद्धे यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवायचं का, असा शब्द बाहेर पडताच लागलीच भावे म्हणाले, “अहो, मी त्यांना अगदी जवळून ओळखतो, आमच्या गिरगावातलेच ते. त्यांच्याशी भेट घेऊन सविस्तर विषय बोलताना, बाल्यावस्थेपासून विद्यार्थ्यांच्या तनामनावर विज्ञान विषय हसतखेळत कोरण्यासाठी संशोधन प्रोत्साहन प्रकल्पाची कल्पना मांडली. ती ऐकताच त्यांनी अशी काही प्रेरणा आमच्या मनात भरली की, आम्ही जोमाने त्या पूर्ततेच्या कामात विविध लोकांना जोडायला सुरुवात केली. त्या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तृत्वाने जवळपास ६० शाळांतील आलेल्या सर्व शिक्षकांसहित उपस्थित सर्वजण भारावून गेले होते. त्यातील अनेक शिक्षकांना संघ, ‘विज्ञान भारती‘ काय ते माहीत नव्हते. पण, जयंतरावांच्या त्या वक्तृत्वाने संघाचा विज्ञान विषयीचा दृष्टिकोन सहजरित्या उमगला होता.

 
काही दिवसांनी जयंतरावांनी आम्हाला एक ‘विज्ञान भारती‘च्या सर्वसाधारण सभेला बोलावले. सभा संपल्यावर आमच्याकडे दोन अर्ज देत, हे पूर्ण भरून द्या आणि ‘विज्ञान भारती‘चे आजीव सदस्य व्हा, असे जणू आदेशच दिले. त्यांच्या शब्दाच्या पुढे बोलणे ते कसले!कालांतराने ‘विज्ञान भारती‘ आयोजित ‘स्मार्ट सिटी’ कार्यक्रमाच्या आयोजनात आणि कोकण प्रांताच्या कार्यकारिणीत सहकार्यवाह पदाची जबाबदारी दिली गेली. जयंतजींना म्हटलं, “अहो, मी साधा विज्ञानाचा विद्यार्थीसुद्धा नाही. माझ्याकडे का ही जबाबदारी दिली आहे?“ त्यावर त्यांचे उत्तर होते, “संघात सांगितलेलं करायचं असतं, त्यावर चर्चा नाही करायची.“ कालांतराने व्यक्तिगत अडचणींमुळे जबाबदारी पार न पाडल्याची खंत त्यांच्याकडे बोलल्यावर म्हणाले, “जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच.‘’

जयंतराव जेव्हा जेव्हा ‘पितृछाया’ कार्यालयात येत, तेव्हा आवर्जून त्यांचा फोन असायचा. बेकरीतील काही ताजे पदार्थ त्यांना खायला आवडतात, हे जाणले होते. तेथील चौकाच्या शेजारील असलेल्या एका हॉटेलमध्ये अनेक वेळा जाण झालं. त्यांच्याशी सुरू झालेल्या गप्पा कधीही संपू नयेत, असंच वाटायचं. कोणताही विज्ञान किंवा अन्यदेखील विषय आणि त्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नाही, असे कधीच अनुभवायला मिळाले नाही. इतक्या सुसूत्रतेत ते माहिती सांगायचे की, अगदी मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. मग स्वामी विवेकानंदांचे संगीतातले सखोल ज्ञान असेल की, ‘टेस्ला’च्या तंत्रज्ञानाची माहिती असेल.... इतका परिपूर्ण माहितीचा साठा एकावेळी कसं काय ते डोक्यात साठवून ठेवतात, याचं कौतुक असायचं. बिनधास्त विचारलंसुद्धा, त्यावेळी त्यांनी आवर्तन ध्यानाची आठवण करून दिली. म्हणाले, “आपल्या मेंदूला एका विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित केलं की, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे फार काही कठीण नसतं. त्या एकाग्रततेच्या माध्यमातून अभ्यास आणि सराव केल्यावर कालांतराने आपसूक होऊन जातं.“ जयंतरावांच्या अजून कितीतरी सहज आठवणी कळत-नकळत मनात साठविल्या गेल्यात. विशेषतः त्यांच्या स्वभावाने कितीतरी माणसं लोहचुंबकासारखी जोडली गेली.

त्यांना राग येत नव्हता असं नाही बरं का!
 
 
त्यांनी एकदा अभ्यासपूर्ण सांगितलेल्या कामात जेव्हा कोणी स्वतःच्या मनाने बदल केला, तर त्यांचे रौद्र रूपसुद्धा पाहायला मिळाले आहे. एका बातमीच्या बाबतीत त्यांनी सूचना दिल्या होत्या की, कशाप्रकारे त्या एका कार्यक्रमाची माहिती छापून येणे गरजेचे आहे. त्यांचा तसाच्या तसा निरोप मी आमच्या पत्रकार मित्रापर्यंत पोहोचवला. पण, तो पत्रकार मित्रसुद्धा विज्ञान क्षेत्रातील असल्याने, त्याने त्या बातमीत काही बदल स्वतःच्या मनाने केले आणि मला जयंतरावांचा तो राग अनुभवण्याची संधी मिळाली होती, अशा संधीसुद्धा भाग्यवंतांनाच मिळतात! नंतर त्यांनी शांतपणे समजावूनसुद्धा सांगितले. तेव्हा, वस्तुस्थिती सांगितल्यावर त्यांनी मला समजून घेतले.

जयंतरावांची शाबासकी मिळालेली एक घटना आठवते. चार एक वर्षांपूर्वी नागपूरला ‘विज्ञान भारती‘चे अखिल भारतीय अधिवेशन झाले होते. आम्ही मुंबईचे काही कार्यकर्ते सहभागी झालो होतो. मुंबईकरांनी एक छोटासा पुस्तकांचा स्टॉल लावला होता. त्यात आकर्षणाचा बिंदू ठरलेले पुस्तक 'ancient science of india ' हातोहात विक्री झाले. दुसर्‍या दिवशी विक्रीस एकही पुस्तक उरले नव्हते. काही वरिष्ठ मंडळी म्हणाली की, “तुम्हाला आधीच सांगितले होते की, जास्तीची पुस्तके घ्या, पाहिलं न आत्ता!“ मागणी आहे, पण पुस्तकं नाहीत, अशी स्थिती होती. पालेकरांच्या मी कानात सांगितलं, “जर उद्या पुस्तकं हवी असतील, तर सकाळी साधारण १० वाजेपर्यंत नागपूरला पोहोचतील.“ पालेकरांनी विचारलं, “कसं काय? विमानाने पण इतक्या लवकर शक्य नाही.“ मी म्हणालो, “तुम्हाला काय करायचंय ते, पोहोचली म्हणजे झालं नं. तुम्ही फक्त ‘पितृछाया‘ मधून कोणाला तरी दादर स्थानकावर पोहोचवयाला सांगा, बाकी मी पाहतो.“ त्यांना साधारण कल्पना सांगितली, त्यांनी विश्वास ठेवला आणि तशी व्यवस्था केली. दरम्यान, रात्री अविनाशला फोन करून माझी कल्पना सांगितली होती.


त्याने त्याचे तंतोतंत पालन केले. रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ‘दूरांतो एक्सप्रेस‘ सुटते. त्या गाडीच्या पेंट्रीमधील अमुक एका व्यक्तीला तो पुस्तकांचा गठ्ठा दे, आणि त्यांना माझा मोबाईल क्रमांक पण दे. ‘दूरांतो‘ १२ तासांत कोठेही न थांबता नागपूरला पोहोचते माहीत होतं, आम्ही त्याच गाडीने आलो होतो. ओळख काढून पेंट्रीमधील एका व्यक्तीशी बोलणं केलं, त्याच व्यक्तीकडे अविनाशला पुस्तक द्यायला सांगितली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही दोघे नागपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि पुस्तकांचा गठ्ठा ताब्यात घेतला. सकाळी स्टॉल लागण्याच्या वेळेत मुबलक पुस्तकं उपलब्ध होती. सर्वांना आनंद झाला. जयंतरावांना ही घटना कळल्यावर, त्यांच्या भुवया उंचावून स्मितहास्य देण्याच्या स्टाईल सोबत, पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणाले, “कल्पना, इच्छाशक्ती आणि उपलब्ध साधनांची जोड यांची समीकरणं जुळविल्यास असाधारण गोष्टीदेखील सहज साध्य करता येतात, असे अनेक खछछजतअढजठड सर्वसामान्यांत सुद्धा असतात.“पुढे म्हणाले.....


अमंत् अक्षरं नास्ति:
नास्ति मुलं अनौषधम्।
अयोग्य: पुरुषो नास्ति:
योजकस्त्र दुर्लभ:।

 
जयंतरावांनी अनेकांना असे प्रोत्साहन देता देता, सहज कामात सामावून घेतले होते. काही वेळा महत्त्वाच्या कामानिमित्त, हातातली कमी महत्त्वाची कामं सोडून जाण्याचा प्रसंग आला. जयंतराव म्हणाले, “जेथे असशील तेथून तातडीने निघून ये. प्रतिप्रश्न न करता गेलो आणि जे सांगितले ते काम पूर्ण केले. पण, दरम्यानच्या एका मीटिंगमध्ये जाण्यास उशीर होईल, असे एक सहकार्‍याला सांगितले होते. पण दुसर्‍या सहकार्‍याने मुद्दामहून घातलेला गोंधळ आणि त्यामुळे अस्वस्थ झालेले मन जयंतजींकडे मोकळे करताना ते म्हणाले, “हे बघ, समाज आणि संघ हे काही वेगळे नाही. समाजातील व्यक्तिमत्व ही संघातसुद्धा आहेतच. त्यामुळे अशांकडे दुर्लक्ष करण्याची कला आपण अवगत केली पाहिजे. त्यांना समजावणे किंवा बदलणे हे कदापि आपल्या हातात नाही, म्हणून उगाच अस्वस्थ होण्यापेक्षा अशांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होत नाही.“ मी नि:शब्द होतो. दुर्लक्ष कला कशी शिकायची त्याकडे मनाला समजावत होतो.काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांच्या गंभीर अपघाताची बातमी कानावर आली आणि त्या अपघाताची गांभीर्यता विस्तृत ऐकल्यावर मन राहून राहून विषण्णं व्हायचं. कधी एकदा पुन्हा त्या दादरच्या बेकरीत जयंतरावांसोबत जाण्यास आसुसलं होतं.घरी आल्यावर तर अगदी जमिनीवर बसून घट्ट बालमित्रासारखे सोबत जेवणारे जयंतराव...आता तुम्ही कोणात, कधी, कोठे दिसाल!


-दयानंद सावंत


 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121